फार मोठा अपघात टळला, मरेच्या पायाखालची जमीनच सरकली

मध्य रेल्वेने येथे आपात्कालिन ब्लॉक जाहीर करीत ट्रॅकचे काम हाती घेतले. त्यानंतर हळूहळू वाहतूक पूर्ववत झाली.

फार मोठा अपघात टळला, मरेच्या पायाखालची जमीनच सरकली
Kasara - Umbarmali
Image Credit source: socialmedia
| Updated on: Mar 09, 2023 | 12:12 PM

मुंबई : मध्य रेल्वेच्या कसारा आणि उंबरमाळी स्थानकादरम्यान रेल्वे रूळाच्या खालील जमीन धसल्याने अप दिशेची वाहतूक सकाळी लवकर बाधित झाल्याचे उघडकीस आले आहे, पहाटे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाल्याचे उघडकीस आले आहे. रेल्वे ट्रॅकचे काम करण्यासाठी सकाळी इमर्जन्सी ब्लॉक घेण्यात आला होता. त्यानंतर सकाळी 7.21 वाजता या अप मार्गावरील वाहतूक हळूहळू पूर्ववत केल्याचा दावा मध्य रेल्वेने केला आहे. तरीही या बिघाडामुळे ऐन परीक्षांच्या काळात मध्य रेल्वेची वाहतूक तासभर ठप्प झाल्याने प्रवाशांसह विद्यार्थ्यांचेही प्रचंड हाल झाले.

रेल्वेच्या रूळाखालील भाग कोसळला

मध्य रेल्वेच्या कसारा-उंबरमाळी दरम्यान तांत्रिक बिघाडा झाल्यामूळे गुरूवारी पहाटे पाचच्या सुमारास अप दिशेची वाहतूक अचानक बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. सकाळी सहा नंतर येथे रेल्वेने ट्रॅकखालीस बंधारा घसरल्याचे निर्दशनास आले. त्यामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत कसारा ते सीएसएमटी दरम्यानची अप दिशेची वाहतूक थांबविण्यात आली होती. या मार्गावरील ट्रॅकखाली माती धसल्याचे उघडकीस आले. त्यामुळे घटनास्थळी मध्य रेल्वेचे अभियंते आणि टीम पोहचल्याचे मध्य रेल्वेच्या सूत्रांनी सांगितले.

भूस्खलनाचे प्रकार

गेले काही दिवस मुंबई आणि महाराष्ट्रात अवकाळी पावसाचा फटका बसला आहे. मात्र रेल्वेच्या रूळांखाली भाग अचानक कोसळण्यामागे नेमके कोणते कारण आहे आहे हे समजू शकलेले नाही. या भागात 26 जुलै 2005 च्या अतिवृष्टीत रेल्वे रूळांच्या खालील जमिन धसल्याचे प्रकार घडले होते. तसेच कसारा घाटाची जमिन मुरूमाची असल्याने येथे भूस्खलनाचे प्रकार वारंवार घडत असतात. परंतू हे प्रकार अतिवृष्टीत होत असतात, अशी माहिती मध्य रेल्वेच्या सूत्रांनी दिली आहे.

उंबरमाळी स्थानकात 21 जुलै 2022 च्या अतिवृष्टीत प्रचंड नुकसान झाले होते. हा परिसर निसर्गाचे रौद्र रूप दाखविणारा आहे. येथे अतिवृष्टीत नुकसान होतच असते. त्यामुळे येथील रेल्वे रूळांना आता अधिक सुरक्षा आणि लक्ष पुरविणे गरजेचे असल्याचे सूत्रांनी सांगितले. हवामान तज्ज्ञ कृष्णानंद होसाळीकर यांनी 21 जुलै 2022 च्या अतिवृष्टीत उंबरमाळी स्थानकाच्या झालेल्या नुकसानाचे ट्वीट केले होते.

हेच ते ट्वीट – उंबरमाळी स्थानक नदी झाले – 

 

हळूहळू लोकलसेवा रूळावर

मध्य रेल्वेने येथे आपात्कालिन ब्लॉक जाहीर करीत ट्रॅक खालील खडी आणि मातीचा बंधरा पुन्हा पूर्ववत केला. त्यानंतर सकाळी साडे सातच्या सुमारास वाहतूक पूर्ववत करण्यात आली. मात्र रेल्वे ट्रॅकचे काम नुकतेच झाले असल्याने या मार्गावर सावधानता म्हणून लोकलच्या वेगावर निर्बंध घातल्याने लोकलच्या वेगावर मर्यादा लादल्याने लोकलचे रांगा लागल्या आहेत.