Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?

Mumbai Watermelon Death : सध्या सगळीकडे बिर्याणी त्यानंतर कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू होऊ शकतो का? याची चर्चा आहे. मुंबईत पायधुनी भागात हा प्रकार घडला आहे. एकाच कुटुंबातील चौघांचा मृत्यू झाला आहे. डॉक्टर, आहारतज्ज्ञ यावर काय म्हणतात? कलिंगड खाण्याची योग्य वेळ कुठली? या बद्दल जाणून घ्या.

Mumbai Watermelon Death : बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यामुळे माणसाचा मृत्यू होऊ शकतो का? डॉक्टर काय म्हणतात?
Mumbai Family Watermelon Death
| Updated on: Apr 28, 2026 | 3:38 PM

सध्या मुंबईत पायधुनी येथे घडलेल्या घटनेची सगळीकडे चर्चा आहे. महाराष्ट्रात सगळ्यांनाच यामुळे धक्का बसला आहे. शनिवारी 25 एप्रिल रोजी डोकाडिया कुटुंबाने रात्री साडेदहाच्या सुमारास बिर्याणी खाल्ली. त्यानंतर ते घरी आले. रात्री एकच्या सुमारास मुलांना पुन्हा भूक लागली. म्हणून त्यांनी कलिंगड कापून खाल्लं. त्यानंतर चौघांना पहाटेच्या सुमारास उलट्या-जुलाबाचा त्रास सुरु झाला. त्यांना तातडीने उपचारासाठी जे. जे. रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं, परंतु उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. बिर्याणी त्यावर कलिंगड खाल्ल्यानंतर चौघांना त्रास सुरु झाला. यामध्ये अचानक चौघांचा मृत्यू झाल्याने एकच खळबळ उडाली आहे. कलिंगड खाल्ल्यामुळे मृत्यू कसा होऊ शकतो? असा प्रश्न अनेकांना पडला आहे. पोलिसांनी या प्रकरणात अन्नातून विषबाधेचा संशय व्यक्त केला आहे.

चौघांना लगेच रुग्णालयात हलवण्यात आलं होतं. पण तिथे त्यांचा मृत्यू झाला. जेजे मार्ग पोलीस स्टेशनने अपघाती मृत्यूची नोंद केली आहे. वैद्यकीय आणि फॉरेन्सिक रिपोर्टमधून मृत्यूचं नेमकं कारण स्पष्ट होईल. बिर्याणीमुळे अन्नातून विषबाधा होणं ही असामान्य बाब नाहीय. शिजवलेलं अन्न दूषित होण्याची शक्यता जास्त असते. कलिंगडने चिंता जास्त वाढवली आहे. कलिंगडामुळे फूड पॉयजनिंग होऊन त्याचे इतके गंभीर परिणाम होऊ शकतात का? हा खरा प्रश्न आहे.

..तर त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात

न्यूट्रिशनिस्ट म्हणजे पोषणतज्ज्ञ रुपाली दत्ता यांच्यामते, कलिंगडामुळे फूड पॉयजनिंग होऊ शकते. काही प्रकरणात आरोग्याच्या गंभीर समस्या निर्माण होऊन त्यात मृत्यू होऊ शकतो. हे सर्व परिस्थितीवर अवलंबून आहे. कलिंगडामध्ये पाण्याची मात्रा आणि नैसर्गिक साखर मोठ्या प्रमाणात असते, कलिंगड जर दूषित झालं तर त्यात बॅक्टेरिया वेगाने वाढू शकतात. त्यामुळे फूड पॉयजनिंगचा धोका वाढतो असं रुपाली दत्ता यांनी सांगितलं. कलिंगडमध्ये लाल रंगाची भडकता आणि गोडवा वाढवण्यासाठी त्यात ग्लुकोजच पाणी टाकलं जातं असे अनेक रिपोर्ट्स आहेत. नैसर्गिक कलिंगडामध्ये अशा पद्धतीचे लिक्विडस असतील, तर बॅक्टेरियाच्या वाढीसाठी हे अनुकूल खाद्य आहे असं दत्ता यांनी सांगितलं.

अवयवांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो

डायटीशियन आणि प्रमाणित मधुमेह शिक्षक डॉ. अर्चना बात्रा यांच्यानुसार, फळांमध्ये जर धोकादायक रोगजंतू असतील तर त्यामुळे साल्मोनेला संसर्ग, लिस्टिरिओसिस किंवा कोलाई इन्फेक्शन होऊ शकतं. या आजारांमध्ये शरीरातील पाणी कमी होतं, सेप्सिस होऊ शकतो. शरीरातील महत्वाच्या अवयवांना यामुळे धोका निर्माण होऊ शकतो. वेळेत वैद्यकीय उपचार घेतले नाहीत, तर हे संसर्ग जीवघेणे ठरु शकतात.

वैद्यकीय उपचार किती वेळेत होतात?

अन्नातील विषबाधेचा संबंध कलिंगडाशी असणं यात असामान्य काही नाहीय. यामध्ये अतिसार, उलटी आणि पोटात मळंमळ, क्रॅम्प असा त्रास होतो. बॅक्टोरिया कुठल्या प्रकारचा आहे, त्या व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती, वैद्यकीय उपचार किती वेळेत होतात? यावर गंभीरता अवलंबून असते.

डॉ अजीत जैन काय म्हणाले?

“मृत्यूचं खरं कारण पोस्टमार्टम रिपोर्ट आल्यानंतरच समजेल. या दोन्ही गोष्टी एकत्र खाणं किंवा काही तासांच्या फरकाने खाणं हे मृत्यूचं कारण असू शकतं. पण असंच असेल असं नाही. हे पदार्थ उघड्यावर ठेवले असतील, तर त्यामुळे फूड पॉयजनिंग होण्याचा धोका आहे” असं राजीव गांधी रुग्णालयाचे असोसिएट प्रोफेसर डॉ अजीत जैन म्हणाले.

“खाण्याचे पदार्थ जेव्हा तुम्ही अनेक तास उघड्यावर ठेवता, तेव्हा त्यात बॅक्टेरिया प्रवेश करतात. फळं असो किंवा बिर्याणी हे पदार्थ तु्म्ही उघड्यावर ठेवता, तेव्हा त्यात स्टॅफिलोकोकस ऑरियस, साल्मोनेला एंटरिटिडिस आणि एस्चेरिचिया कोलाई सारखे बॅक्टेरिया प्रवेश करतात. हे सर्व बॅक्टेरिया खूप धोकादायक आहेत. असे पदार्थ खाल्ल्यानंतर हे बॅक्टेरिया शरीरात प्रवेश करतात. फूड पॉयजनिंगपासून सेप्सिस होण्याचा धोका यामुळे असतो” असं डॉ. जैन म्हणाले.

अन्नातून विषबाधेचा धोका का वाढतो?

खासकरुन लहान मुलांच्या बाबतीत जुलाब, पोटाचे त्रास होऊ शकतो. काहीवेळा जीवाला धोका निर्माण होतो. दूषित फळं, अस्वच्छ ठिकाणी आणि अयोग्य पद्धतीने बनवलेलं जेवणं किंवा असुरक्षित वातावरणात जास्त काळ अन्न साठवून ठेवणं म्हणजे शिळं अन्न यामुळे अन्नातून विषबाधेचा धोका वाढतो.

या बाबतीत कुटुंबाने रात्री उशिरा कलिंगड खाल्लं. कलिंगड खाण्याची वेळ महत्वाची असते का?

तुम्ही जेव्हा कलिंगड खाता तेव्हा वेळ महत्वाची असते, असं दत्ता यांनी सांगितलं. रात्री उशिरा फळं किंवा जड अन्नं टाळलं पाहिजे. खासकरुन रात्री 8 वाजल्यानंतर. झोपेच्या काळात तुमच्या पचन संस्थेची गती मंदावलेली असते.

कलिंगड खाण्याची उत्तम वेळ कुठली?

सकाळी, जेवणादरम्यान, नाष्ट्याची वेळ कलिंगड खाण्यासाठी उत्तम आहे.

रात्री तुम्ही उशिरा खाल्लं म्हणून फूड पॉयजनिंग होतं असं नाहीय. पण खाल्लेलं फळ दूषित असेल किंवा शरीराची प्रक्रिया करण्याची क्षमता नसेल तर पंचन संस्थेचा त्रास वाढू शकतो.

अधिकारी अहवालाच्या प्रतिक्षेत

मुंबईच्या घटनेत तपास सुरु आहे. या मृत्यूमागे नेमकं कारण काय आहे? त्यासाठी अधिकारी अहवालाच्या प्रतिक्षेत आहेत. एक्सपर्ट्स अन्न सुरक्षा, स्वच्छता, सुरक्षित स्टोरेज आणि ताजं अन्नं, फळं यावर भर देत आहेत.

Follow Us