Amruta Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान हवं! अमृता फडणवीस यांचं विधान

| Updated on: Aug 15, 2022 | 1:33 PM

अमृता फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी बोलले त्याच्याविषयी आपल्या राज्यातीलच एक जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचे उदाहरण देताना त्यांनी त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

Amruta Fadnavis : मंत्रिमंडळ विस्तारात महिलांना स्थान हवं! अमृता फडणवीस यांचं विधान
Follow us on

मुंबईः ज्या दिवसांपासून राज्यात शिंदे-फडणवीस सरकार आले आहे, त्यादिवसांपासून हे सरकार चर्चेत आले आहे. कोणत्या ना कोणत्या मुद्यावरून नेहमीच चर्चेत असलेले हे शिंदे सरकार (Shinde-Fadnavis Government) आता मंत्रिमंडळाच्या विस्तारानंतर पुन्हा एकदा चर्चेत आले आहे, कारण मंत्रिमंडळाचा (Cabinet expansion) झालेला विस्तार आणि त्या विस्तारामध्ये महिलांना स्थान देण्यात आले नसल्याने विरोधकांनी पहिल्या दिवसापासूनच त्यावर झोड उठवली आहे. त्यानंतर आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस (Amruta Fadnavis) यांनी विरोधकांचीच री ओढत त्यांनी क्षेत्र कोणतंही असो महिलांना स्थान हे दिलच पाहिजे अशा टिप्पणी त्यांनी केली आहे. त्यामुळे शिंदे-फडणवीस सरकारला हे एक प्रकारे घरचेच आहेर मिळाले आहे.

अमृता फडणवीस यांनी माध्यमांशी बोलताना सांगितले की, माझीही महिला म्हणून इच्छा हीच आहे की, महिलांना मंत्रिमंडळ असो किंवा इतर क्षेत्र असो त्यांच्या हिम्मतीवर त्यांना स्थान दिलं पाहिजे, त्यांनी मागणी करतात म्हणून नाही तर त्यांच्या कार्यशैलीवर, कामाच्या प्रभूत्वावर त्यांना सर्व ठिकाणी स्थान दिलं पाहिजे असंही त्यांनी यावेळी सांगितले.

महिलांच्या कौशल्यावर पद द्या

महिलांनी मागणी करुन मिळवलेल्या पदापेक्षा त्यांनी त्यांच्या कामाच्या कौशल्यावर म्हणजे कामातील प्रभूत्वावर मिळवलेल्या जागेवर नेहमीच त्यांचा आदर राखला जातो आणि तो आदर वेगळाच असतो असंही त्यांनी यावेळी सांगितले. मागणीनुसार पद न देता त्यांच्या कामाच्या कौशल्यावर त्यांना पद दिले पाहिजे असंही त्यांनी आपले मत मांडले.

घराणेशाहीवर एकनाथ शिंदेंचे उदाहरण

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवानिमित्त पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिल्लीतील लाल किल्ल्यावरून देशाला संबोधित करताना अनेक विषयांना त्यांनी स्पर्श केला. डिजिटल इंडिया, सेंद्रिय शेती, महिलांचा विकास आणि राजकारणावर बोलताना त्यांनी सांगितले की, देशाच्या राजकारणातील घराणेशाही संपली पाहिजे, तरच चांगली माणसं लोकांसमोर येतील असं वक्तव्य त्यांनी केले होते. त्याविषयी अमृता फडणवीस यांनी बोलताना सांगितले की, नरेंद्र मोदी बोलले त्याच्याविषयी आपल्या राज्यातीलच एक जिवंत उदाहरण म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. त्यांचे उदाहरण देताना त्यांनी त्यांना कोणताही राजकीय वारसा नसतानाही ते मुख्यमंत्री झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

‘सामना’चे विचार वेगळे

शिवसेनेचे मुख्यपत्र असलेल्या सामनाविषयी बोलताना त्या म्हणाल्या की, सामना मी वाचतच नाही. सामनाचे विचार वेगळे असल्याचेही त्यांनी यावेळी स्पष्टपणे सांगितले.