आदित्य ठाकरेंच्या ‘नाईट लाईफ’ला गृहमंत्री देशमुखांचा ‘दे धक्का’?

| Updated on: Jan 19, 2020 | 4:00 PM

राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी नाईट लाईफ (मुंबई 24 तास) या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे (Anil Deshmukh on Night Life Mumbai).

आदित्य ठाकरेंच्या नाईट लाईफला गृहमंत्री देशमुखांचा दे धक्का?
Follow us on

मुंबई : राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या महत्त्वकांक्षी नाईट लाईफ (मुंबई 24 तास) या योजनेबाबत मोठं विधान केलं आहे (Anil Deshmukh on Night Life Mumbai). 26 जानेवारीला नाईट लाईफ सुरू करणं शक्य होणार नाही. पोलीस यंत्रणांवर याचा किती ताण येईल याचा आढावा घेतला जाईल, असं मत अनिल देशमुख यांनी व्यक्त केलं. यानंतर देशमुख यांनी आदित्य ठाकरेंच्या योजनेला खो घातल्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे (Anil Deshmukh on Night Life Mumbai).

अनिल देशमुख म्हणाले, “आम्ही लवकरात लवकर या योजनेबाबत आढावा घेऊ. यानंतर या योजनेती अंमलबजावणी करायची की नाही यावर आम्ही निर्णय घेऊ. 26 जानेवारीपर्यंत या योजनेची अंमलबजावणी होऊ शकेल असं मला वाटत नाही. अखेर हा विषय कॅबिनेटमध्ये येईल. तेथे यावर सविस्तर चर्चा होईल. त्याचा यंत्रणेवर किती परिणाम होऊ शकतो, यंत्रणा किती वाढवावी लागेल याचा विचार होईल. यानंतरच या योजनेची अंमलबजावणी करायची की नाही यावर निर्णय होईल.”

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी आदित्य ठाकरेंच्या या योजनेला पाठिंबा दिला आहे. तसेच ज्यांना मुंबईची माहिती नाही तेच याला विरोध करत असल्याचा आरोप केला. ते म्हणाले, “मी मुंबईत नाईट लाईफमध्येच जगलो आहे. त्यामुळे या योजनेमुळे पोलिसांवर फार ताण येईल असं नाही. मुंबईमधील एका वर्गाला सामाजिक जीवनच नाही. त्याचं सामाजिक जीवन रात्रीच्या वेळी असतं. मुंबईमध्ये राहणाऱ्या माणसाला सामजिक जीवन असावं की नसावं? माझं म्हणणं आहे असावं आणि ते त्याच्या सोयीने असावं. त्याची सोय रात्रीची आहे. म्हणून या योजनेची अंमलबजावणी व्हावी.”

आदित्य ठाकरेंची भूमिका काय?

आदित्य ठाकरे म्हणाले, “मुंबईकरांनी मुंबई 24 तासचं स्वागत केलं आहे. जगभरात पाहिलं तर लंडनची नाईट टाईम इकॉनॉमी 5 बिलियन पाऊंडची आहे. दुकानं, हॉटेल्स आणि थिएअटरसोबत बीएसटीच्या बस ओला, उबर, टॅक्सी, रिक्षा यांच्याही उत्पादनात वाढ होणार आहे. आत्ताही मुंबई 24 तास सुरुच राहते. कितीतरी अशी ठिकाणं आहेत जिथं रात्रभर हॉटेल्स सुरु असतात. या इकॉनॉमिला अधिकृत करणं गरजेचं आहे. म्हणजे यांच्या उत्पादनासोबत राज्याकडेही कर येईल. यामुळे रोजगारही तिप्पट होऊ शकतो.”

“मुंबई 24 तासमुळे रोजगार तिप्पट होऊ शकतो”

लंडनसोबतच इंदोरमध्ये सराफा मार्केटला गेलं तर दिवसा तेथे दुकानं असतात, रात्री याच दुकानांच्या जागेवर चॅट मिळतात. इंदौरी चॅट आणि असे अनेक पदार्थ येथे मिळतात. अहमदाबादमध्ये देखील मागच्या वर्षी ही योजना राबवण्यात आली. मी तर ही मागणी 2013 लाच केली होती. मात्र, आत्ता ही योजना प्रत्यक्षात आली. मागील सरकारने पाच वर्षे मागासलेल्या विचारांमुळे यावर अंमलबजावणी केली नाही. मात्र, आता ही योजना राबवली जाईल. जगभरात या गोष्टी होत असताना विरोधकांना केवळ मुंबईने मागे राहावं असं वाटत असेल तर त्यांनी ते मनात घेऊन बसावं. मात्र, मुंबई 24 तास चालणारं शहर आहे. दिवसरात्र कष्ट करणारे लोकं मुंबईत राहतात. म्हणून मुंबईत 24 तास या सेवा मिळाव्यात हा निर्णय घेण्यात आला आहे, असंही आदित्य ठाकरे यांनी नमूद केलं.

यावेळी आदित्य ठाकरे यांनी ड्राय डे आणि मुंबई 24 तास निर्णयाचा काहीही संबंध नसल्याचं स्पष्ट केलं. ते म्हणाले, “एक्साईजचा कायदा अगदी वेगळा आहे. त्याचा आणि मुंबई 24 तासचा संबंध नाही. त्या कायद्याशी आमचं काहीही देणंघेणं नाही. आम्ही लोकांना केवळ आवश्यक गोष्टींची खरेदी करण्यासाठी सुविधा देत आहोत. यात गार्डन-पार्कमध्ये जाणं, चित्रपटगृह, हॉटेल, रेस्टॉरन्टमध्ये जाणं, आपल्या कुटुंबीयांसोबत आनंदी वेळ घालवणं याचा यात समावेश आहे. दारुचा आणि मुंबई 24 तासचा संबंध नाही. तुम्ही कधीही बाहेर जाऊन कपडे खरेदी करु शकतात, जेवण करु शकतात.”