VIDEO: शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंसोबत रियाझ भाटीचे फोटो; आशिष शेलारांच्या आरोपांनी खळबळ

| Updated on: Nov 10, 2021 | 1:19 PM

रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव आहे. तेव्हापासून तो गायब आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? असा आमचा संशय आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. (ashish shelar denies riyaz bhati connection with devendra fadnavis)

VIDEO: शरद पवार, उद्धव ठाकरेंपासून आदित्य ठाकरेंसोबत रियाझ भाटीचे फोटो; आशिष शेलारांच्या आरोपांनी खळबळ
ashish shelar
Follow us on

मुंबई: रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव आहे. तेव्हापासून तो गायब आहे. आपलं बिंग फुटू नये म्हणून राष्ट्रवादीने तर त्याला गायब केलं नाही ना? असा आमचा संशय आहे, असा खळबळजनक दावा भाजप नेते आशिष शेलार यांनी केला. तसेच रियाज भाटी यांचे राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार ते मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंपर्यंतचे फोटो दाखवून शेलार यांनी एकच खळबळ उडवून दिली.

आशिष शेलार यांनी पत्रकार परिषद घेऊन रियाझ भाटीबाबतचे नवे खुलासे केले. पंतप्रधान कार्यालय किंवा पंतप्रधानांच्या कार्यक्रमाशी रियाझ भाटीचा काहीही संबंध नाही. फोटोवरूनच संबंध प्रस्थापित करायचे असतील तर त्याच्यासोबत अनेकांचे फोटो आहेत, असं शेलार म्हणाले. यावेळी त्यांनी राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख, पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्यासोबतचे फोटो दाखवून खळबळ उडवून दिली. फोटो दाखवून कुणालाही बदनाम करण्याचा धंदा करू नका. तुम्ही एक बोट दाखवाल तर तुमच्याकडे चार बोटं येतील, असा इशाराच त्यांनी दिला.

भाटीला पळवून तर लावले नाही ना?

रियाझ भाटी गायब असल्याचं सांगितलं जातं. तो गायब आहे की त्याला पळवलं गेलं. रियाझ भाटीला पळवून नेण्याचं काम तर राष्ट्रवादीने केलं नाही ना हा आमचा आरोप आहे. वाझेच्या वसुली गँगमध्ये जी नावे समोर आली. त्यात रियाझचं नावही आलं आहे. याचा अर्थ स्पष्ट आहे. रियाझ कोठडीत आला तर सत्यबाहेर येईल. त्यामुळे राष्ट्रवादीने त्यांना पळवून लावले नाही ना अशी शंका येत आहे, असा गंभीर आरोप शेलार यांनी केला.

क्रिकेटच्या जगात रियाझला राजाश्रय कुणी दिला?

देवेंद्र फडणवीसांचा रियाझ भाटीशी संबंध आणि संपर्कही नाही. क्रिकेटच्या राजकारणात रियाझला राजाश्रय कुणी दिलं? असा सवाल करतानाच पण आम्ही कोणत्याही बड्या नेत्याचं नाव घेऊन सेन्सेशन करणार नाही. ती आमची प्रथा. परंपरा नाही. आम्ही ते करणार नाही, असं ते म्हणाले.

मलिक यांचं मानसिक संतुलन बिघडलं

नवाब मलिक यांची आम्हाला चिंता वाटत आहे. दिवसागणिक त्यांचं मानसिक संतुलन बिघडतंय की काय ही आशंका आमच्या मनात आहे. कदाचित हर्बल तंबाखूचा सप्लाय बंद पडला असेल. मलिकजी स्वत:ला शांत करा. राजकारण आपल्या जागी आहे. जावयाच्या प्रेमापोटी आणि स्वत:चं म्हणणं खरं करण्यासाठी राजकारणाच्या नीच पातळीवर जाऊ नका. राजकारणाच्या नीच पातळीचं वर्णन करायचं झालं तर त्याला नवाबी पातळी म्हणता येईल. या नवाबी पातळीपर्यंत आपण जाऊ नये ही आमची इच्छा आहे, असा चिमटाही त्यांनी काढला.

अल्पसंख्यात नेतृत्व संपवण्याचा डाव

राज्यातील अल्पसंख्याक नेतृत्व, कार्यकर्त्यांना नेस्तानाबूत करण्याचं काम मलिक यांच्याकडून होत आहे का? असा सवाल करतानाच मुंबईतील अल्पसंख्याकांची नावं वेचून वेचून काढून त्यांना बदनाम केलं जात आहे. आर्यन खान, शाहरुख खान यांना मलिक यांनीच अडचणीत आणलं. अस्लम शेख यांचं नाव घुसडलं. आता स्वपक्षाची नावे संपल्यावर विरोधी पक्षातील हाजी अराफत, हाजी हैदर या नव्या नेतृत्वाला बदनाम करण्याचं काम सुरू आहे. अजून एका अल्पसंख्याक मंत्र्याचं नाव आणण्यासाठीच मलिक यांचा प्रयत्न आहे. हा शुद्ध कट आहे. मलिक यांनी त्याचं उत्तर द्यावं. अल्पसंख्याक समाजाने त्याची दखल घ्यावी. याला सरकारच्या इतर दोन पक्षांचा राजाश्रय आहे की नाही हे त्यांनी सांगावं, असं आव्हानच त्यांनी केलं.

संबंधित बातम्या:

रियाझ भाटीचं सचिन वाझे प्रकरणात नाव, राष्ट्रवादी काँग्रेसनं त्याला लपवलंय का? आशिष शेलार यांचा सवाल

नवाब मलिकांच्या हायड्रोजन बॉम्बनंतर देवेंद्र फडणवीसांचं लगेचच ट्विट; म्हणाले, डुकराशी कुस्ती…

सदाभाऊ खोत, गोपीचंद पडळकर पगाराची जबाबदारी घेणार का? एसटी कर्मचाऱ्यांनी कामावर हजर व्हावं, अनिल परब यांचं आवाहन

(ashish shelar denies riyaz bhati connection with devendra fadnavis)