BIG NEWS | शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांवर संकट? थेट मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा

महाराष्ट्राच्या राजकारणातील मोठी बातमी समोर आली आहे. राज्य मंत्रिमंडळाचा लवकरच विस्तार होणार आहे. पण या मंत्रिमंडळ विस्तारात शिवसेनेच्या काही मंत्र्यांना डच्चू मिळणार असल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे या मंत्र्यांची नावे देखील सध्या चर्चेत आहे.

BIG NEWS | शिवसेनेच्या या मंत्र्यांवर संकट? थेट मंत्रिमंडळातून डच्चू मिळण्याची चर्चा
Image Credit source: tv9
Chetan Patil | Updated on: Jun 30, 2023 | 7:21 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणातला सध्या सर्वात जास्त चर्चेचा मुद्दा म्हणजे मंत्रिमंडळ विस्तार. मंत्रिमंडळ विस्ताराच्या मुद्द्यावरुन विरोधक गेल्या अनेक दिवसांपासून सरकारला घेरण्याचा प्रयत्न करत आहेत. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडून लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचं सांगितलं जात आहे. राज्यात सत्तांतर होऊन आता वर्ष उलटलं आहे. पण तरीही मंत्रिमंडळाच्या दुसऱ्या टप्प्यातील विस्तार न झाल्यामुळे सत्ताधारी शिवसेना पक्षातील आमदारांमध्ये देखील धुसफूस आहे. शिवसेनेच्या काही आमदारांनी तर जाहीरपणे नाराजी देखील व्यक्त केली आहे. पण आता लवकरच मंत्रिमंडळ विस्तार होणार असल्याचे संकेत मिळत आहेत. विशेष म्हणजे या मंत्रिमंडळात शिवसेनेच्या काही नेत्यांना डच्चू देखील मिळणार असल्याची चर्चा आहे. तर काही नेत्यांना थेट केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे.

शिवसेनेच्या ‘या’ मंत्र्यांना डच्चू मिळणार?

मंत्रिमंडळ विस्तारात काही मंत्र्यांना डच्चू मिळण्याच्या चर्चा सध्या जोर धरु लागल्या आहेत. विशेष म्हणजे वाचाळविरांना डच्चू द्या किंवा त्यांच्याबाबत योग्य तो निर्णय घ्या, असे संकेत भाजपने याआधीच शिवसेनेला दिले होते. त्यानंतर आता एकनाथ शिंदे यांच्याकडून थेट कारवाई केले जाणार असल्याची चर्चा आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मंत्रिमंडळाच्या विस्तारात कृषीमंत्री अब्दुल सत्तार, मंत्री संजय राठोड, आरोग्य मंत्री तानाजी सावंत, मंत्री संदीपान भुमरे, पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील या मंत्र्यांना डच्चू दिला जाणार असल्याची चर्चा आहे. पण नेमकं काय होतं ते मंत्रिमंडळाच्या विस्तारातूनच स्पष्ट होणार आहे.

शिवसेनेच्या ‘या’ नेत्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी?

दुसरीकडे पुढच्या वर्षी देशात लोकसभेची निवडणूक पार पडणार आहे. या निवडणुकीआधी केंद्रात देखील मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे. या विस्तारातही काही नेत्यांना डच्चू दिला जाणार आहे. तर नव्या नेत्यांना संधी दिली जाणार आहे. विशेष म्हणजे एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाच्या आमदार-खासदार आणि पदाधिकाऱ्यांना खूश करण्यासाठी शिवसेनेच्या काही खासदारांना केंद्रीय मंत्रिमंडळात संधी मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे केंद्रात एकनाथ शिंदे यांच्या पक्षाच्या कोणत्या नेत्याची वर्णी लागणार? हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. दरम्यान, एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे राहुल शेवाळे, प्रतापराव जाधव, गजानन कीर्तीकर, श्रीरंग बारणे, भावना गवळी या नेत्यांची नावे मंत्रिमंडळ विस्तारासाठी चर्चेत आहेत.

देवेंद्र फडणवीस मंत्रिमंडळ विस्ताराबाबत काय म्हणाले?

राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलैमध्ये होणार असल्याची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे काल दिल्लीच्या दौऱ्यावर गेले होते. दिल्लीतील बैठकीनंतर ते रात्री उशिरा मुंबईमध्ये परतले. त्यानंतर त्यांनी जुलै महिन्यात मंत्रिमंडळाचा विस्तार होईल, असं सांगितलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लवकरच मंत्रिमंडळ विस्तारावर निर्णय घेतील, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे.

“राज्यातील अनेक प्रश्न असतात. त्या संदर्भात आपल्याला भेट घ्यावी लागते. पाठपुरावा करावा लागतो. अनेकवेळा त्या संदर्भात बैठका असतात. तसेच मंत्रिमंडळाचा विस्तार देखील आम्हाला करायचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे त्याबाबत निर्णय घेतीलच. केंद्राचा आणि राज्याच्या विस्ताराचा आपापसात काहीच संबंध नाही. केंद्राचा विस्तार कधी होणार ते आम्हाला माहिती नाही. आम्ही राज्याच्या विस्ताराबाबत जास्त उत्सुक आहोत. राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार जुलै महिन्यात होईल”, असं देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.

एकनाथ शिंदे मंत्रिमंडळ विस्तारावर काय म्हणाले?

“मंत्रिमंडळाचा विषय लवकरच होईल. त्यामध्ये काही अडचण नाही. सरकारचं एक वर्षाचं कामकज आपण पाहिलेलं आहे. वेगवान आणि गतीमान कामं होत आहेत. सर्वसामान्यांना न्याय देण्यासाठीच आमचं सरकार निर्णय घेणार”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us