‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती, भाजपची मागणी फेटाळली

| Updated on: Nov 20, 2019 | 7:48 AM

'वंदे मातरम्' सभागृहात सुरु झाल्यास समाजवादी पक्ष, एमआयएम आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांसाठी ते अडचणीचं ठरत असल्याचं म्हटलं जातं.

वंदे मातरम् म्हणण्याची सक्ती, भाजपची मागणी फेटाळली
Follow us on

मुंबई : महापालिकेच्या विविध समित्यांमध्ये ‘वंदे मातरम्’ हे भारताचं राष्ट्रीय गीत गाण्यात यावं, अशी मागणी करणारी भाजपची ठरावाची सूचना शिक्षण समितीच्या बैठकीत मंगळवारी फेटाळण्यात आली. यापूर्वीही पालिकेच्या शाळांमध्ये ‘वंदे मातरम्’ गीत गाण्यावरुन वाद रंगला होता. ‘वंदे मातरम्’ म्हणण्याची सक्ती करण्याबाबतचा निर्णय आता पालिकेतील गटनेत्यांच्या बैठकीत (Vande Mataram Compulsion) होणार आहे.

महापालिकेच्या शाळांमध्ये आठवड्यातून दोन वेळा ‘वंदे मातरम्’ गाण्याची सक्ती करण्यावरुन रणकंदन झालं होतं. पालिका शाळांमध्ये शाळा सुटताना दररोज हे गीत गायलं जातं. आता ते पालिकेतील समित्यांच्या बैठकांमध्येही गायलं जावं, अशी मागणी भाजपचे नगरसेवक संदीप पटेल यांनी ठरावाच्या सूचनेद्वारे केली होती. शिक्षण समितीच्या पटलावर चर्चेसाठी ही सूचना मांडण्यात आली होती.

शिवाजी नाही, छत्रपती शिवाजी महाराज, शरद केळकरच्या उत्तरावर टाळ्यांचा कडकडाट

मुंबई महापालिका सभेच्या कामकाजाला ‘वंदे मातरम्’ने सुरुवात करण्यात येते, तर सभेची सांगता ‘जन गण मन’ या राष्ट्रगीताने करण्यात येते. मात्र ‘वंदे मातरम्’ सभागृहात सुरु झाल्यास (Vande Mataram Compulsion) समाजवादी पक्ष, एमआयएम आणि विरोधी पक्षातील नगरसेवकांसाठी ते अडचणीचं ठरत असल्याचं म्हटलं जातं.

पालिका महासभेतच याबाबत निर्णय घेण्याची सूचना प्रशासनाने केली होती. त्यानुसार बुधवारी गटनेत्यांच्या बैठकीत यावर चर्चा होणार आहे. त्यानंतर महासभेतही याबाबत चर्चा होणार आहे.

‘वंदे मातरम्’चा इतिहास

प्रख्यात लेखक बंकिमचंद्र चॅटर्जी यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’ या कादंबरीत ‘वंदे मातरम्’ हे गीत आहे. 1870 मध्ये या गाण्याची रचना झाली. बंकिमचंद्र चॅटर्जी हे सरकारी अधिकारी होते. त्यांनी लिहिलेल्या ‘आनंदमठ’, ‘दुर्गेशनंदिनी’, ‘कपालकुंडला’ यासारख्या कादंबऱ्या गाजल्या आहेत. रविंद्रनाथ टागोरांनी ‘वंदे मातरम’ गीताला चाल लावली आणि ते लोकप्रिय झालं.

विद्यार्थ्यांमध्ये देशभक्तीची भावना रुजावी म्हणून सर्व शाळा, कॉलेज आणि शैक्षणिक संस्थांनी आठवड्यातून एकदा तरी ‘वंदे मातरम्’ म्हणावं, असा निकाल मद्रास हायकोर्टाने दिला होता. वंदे मातरम् हे राष्ट्रीय गीत म्हणून मान्यताप्राप्त असलं, तरी राज्यघटनेत ‘वंदे मातरम्’ बाबत तसा उल्लेख नसल्यामुळे अनेकदा विरोध (Vande Mataram Compulsion) होतो.