1700 कोटींच्या घोटाळ्याचा दावा, ‘मातोश्री’त पैसे पोहोचवण्याचा आरोप, किरीट सोमय्या यांचे नवे आरोप काय?

| Updated on: May 29, 2023 | 5:45 PM

किरीट सोमय्या यांनी दहीसरमध्ये 1700 कोटी रुपयांचा जमीन घोटाळा झाल्याचा आरोप केला आहे. विशेष म्हणजे त्यांनी याप्रकरणी एसीबीकडे तक्रार करत जबाबदेखील नोंद केल्याची माहिती समोर येत आहे.

1700 कोटींच्या घोटाळ्याचा दावा, मातोश्रीत पैसे पोहोचवण्याचा आरोप, किरीट सोमय्या यांचे नवे आरोप काय?
फाईल फोटो
Image Credit source: tv9
Follow us on

मुंबई : भाजप नेते किरीट सोमय्या (Kirit Somaiya) यांनी आज मुंबईतील वरळी स्थित लाचलुचपत प्रतिबंधक विभागात (ACB) तक्रार दिली. दहिसर येथील एक जमीन मुंबई महानगर पालिकेने भूसंपादित केली आहे. त्या संदर्भात झालेल्या आर्थिक व्यवहारात (Dahisar land scam) तब्बल 1722 कोटी रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप भाजप नेते किरीट सोमय्या यांनी केला आहे. या प्रकरणी किरीट सोमय्या यांचा आज जबाब नोंदवला गेला. सोमय्या यांनी जबाब नोंदवण्यात आल्यानंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. त्यामुळे आता या प्रकरणात नेमकी काय माहिती समोर येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

किरीट सोमय्या नेमकं काय म्हणाले?

“बिल्डर अल्पेश अजमेरानी 2.55 कोटी रुपयात जमीन खरेदी केली. बीएमसीने 349 कोटी रुपये पेमेंट केले. बिल्डरने कोर्टात अपील केले आहे, 1722 कोटींची मागणी केली आहे”, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली. किरीट सोमय्या यांनी या प्रकरणावरुन ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत.

“दहिसर भूखंड घोटाळ्याची आजपासून अधिकृत चौकाशी सुरु झालीय. या प्रकरणी बोरिवलीत तक्रार दाखल केली आहे. विकासक अल्पेश अजमेरा यांनी मुंबई महापालिकेच्या अधिकाऱ्यांना हाताशी धरून 2 कोटीत जमीन घेतली. प्रथम दर्शनी हे अधिकाऱ्यांना दिसत आहे, मंत्रालयात चौकशीसाठी अधिकारी परवानगी मागणार आहेत”, असं किरीट सोमय्या यांनी सांगितलं.

हे सुद्धा वाचा

सोमय्या यांचा ठाकरेंवरही निशाणा

“माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ निवासस्थानी घोटाळ्याचे पैसे पोहचवण्यासाठी हे केलं. तत्कालीन जिल्ह्याधिकाऱ्याना माहीत होतं. दरम्यान, बिल्डरने 1700 कोटी रुपये व्याजासह देण्याची मागणी न्यायालयात केली आहे”, असं किरीट सोमय्या म्हणाले.

“मी याप्रकरणी लोकायुक्त, कॅगला तक्रारी दिल्या. मुंबई पोलिसात तक्रार दिली. आता आज माझं स्टेटमेंट घेतलं आहे”, अशी माहिती किरीट सोमय्या यांनी दिली.

सोमय्या यांची अनिल परब यांच्यावरही टीका

दरम्यान, ठाकरे गटाचे नेते अनिल परब यांच्यावरही किरीट सोमय्या यांनी प्रतिक्रिया दिली. “त्यांनी ऑर्डर वाचली नाही. डीमोलिशन करायचं सांगितलं आहे. उच्च न्यायालयात चौकशी सुरू असल्याने अनिल परब यांना पुढील हिअरिंग पर्यंतच अटक न करण्याचं संरक्षण दिले आहे. त्यामुळे कोणतीही याचिका मागे घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. सदानंद कदम जेलमध्ये आणि अनिल परब बेलवर आहेत. अनिल परब यांना पुढच्या सुनावणीपर्यंतच संरक्षण दिले आहे”, असा दावा किरीट सोमय्या यांनी केला.