उद्धव ठाकरे आणि त्यांचा पार्टनर जमीन घोटाळा करणार होते; किरीट सोमय्यांचा नवा आरोप

| Updated on: Feb 03, 2021 | 4:18 PM

मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांचे भागीदार असणाऱ्या बिल्डरकडून जमीन खरेदी करणार होती. | Kirit Somaiya

उद्धव ठाकरे आणि त्यांचा पार्टनर जमीन घोटाळा करणार होते; किरीट सोमय्यांचा नवा आरोप
किरीट सोमय्या आणि उद्धव ठाकरे
Follow us on

मुंबई: भाजप नेते किरीट सोमय्या यांनी पुन्हा एकदा मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप केले आहेत. महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल आणि उद्धव ठाकरे यांच्या संगनमताने 2100 कोटी रुपयांची जमीन खरेदी केली जाणार होती. मात्र, भाजपने वेळीच हा घोटाळा समोर आणल्यामुळे मुख्यमंत्र्यांनी हा व्यवहारच रद्द केला, असा आरोप किरीट सोमय्या यांनी केला. (Kirit Somaiaya new allegations against CM Uddhav Thackeray)

ते बुधवारी मुंबईत प्रसारमाध्यमांशी बोलत होते. यावेळी त्यांनी कथित घोटाळ्याची कागदपत्रे प्रसारमाध्यमांसमोर सादर केली. या जमीन घोटाळ्यात मुंबई महानगरपालिका उद्धव ठाकरे यांचे भागीदार असणाऱ्या बिल्डरकडून जमीन खरेदी करणार होती. या माध्यमातून मिळणारे पैसे अर्धे-अर्धे वाटून घ्यायचेही ठरले होते. त्यासाठी मातोश्रीवर बैठकही झाली होती. मी आणि पालिकेतील काँग्रेसच्या गटनेत्यांनी हे प्रकरण लावून धरले होते. त्यामुळे हा घोटाळा झाला नाही. मात्र, या प्रकरणातील संबंधितांवर तातडीने कारवाई झाली पाहिजे, अशी मागणी किरीट सोमय्या यांनी केली.

जमीन प्रकरणात सोमय्यांचे ठाकरेंवरील आरोप काय?

किरिट सोमय्या यांनी कथित जमीन खरेदी प्रकरणावरून नोव्हेंबरमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि त्यांच्या कुटुंबावर गंभीर आरोपांची मालिका सुरु केली आहे. ठाकरे कुटुंबांनी आतापर्यंत जमिनीचे 40 व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 व्यवहार एकट्या अन्वय नाईक यांच्याशी केले आहेत. नाईक यांच्यासोबत एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार करण्याचे कारण काय? मुख्यमंत्र्यांचा रिअल इस्टेटचा बिझनेस आहे का?, अशी प्रश्नांची सरबत्तीच किरीट सोमय्या यांनी मुख्यमंत्र्यांवर केली होती.

ठाकरे कुटुंब आणि अन्वय नाईक यांचे संबंध काय आहेत?, ठाकरे कुटुंब आणि माजी मंत्री रवींद्र वायकर यांचे आर्थिक संबंध काय आहेत? असे सवाल सोमय्या यांनी केले. ठाकरे परिवाराने एकूण 40 जमिनींचे व्यवहार केले आहेत. त्यापैकी 30 जमिनींचे व्यवहार एकट्या अन्वय नाईकसोबत झाले आहेत. एका व्यक्तीशी जमिनीचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर व्यवहार कसे काय झाले? असा सवाल सोमय्या यांनी केला. मी ठाकरे कुटुंबाला केवळ पाच प्रश्न विचारले आहेत. त्याची त्यांनी उत्तरं द्यावीत. महाराष्ट्रातील जनतेला या व्यवहारांची माहिती हवी आहे, असं आव्हान सोमय्या यांनी केलं होतं.

दहिसर भूखंड घोटाळा

अजमेरा बिल्डर्सनी 2 कोटी 55 लाखांना विकत घेतलेली जमीन आता मुंबई महानगरपालिका विकत घेणार आहे. मात्र, मुंबई महागनरपालिकेला या जमिनीसाठी 900 कोटी रुपये मोजावे लागणार आहेत. या व्यवहारासाठीचे 300 कोटी रुपये अजमेरा बिल्डर्सला देण्यात आले आहेत. मी पुराव्याशिवाय बोलत नाही. आता संजय राऊत आणि शिवसेनेच्या प्रवक्त्यांमध्ये हिंमत असेल तर या आरोपांवर बोलावे, असे आव्हान किरीट सोमय्या यांनी केलं होतं.

संबंधित बातम्या:

मुलाच्या चौकशीनंतर किरीट सोमय्या आक्रमक, कथित जमीन घोटाळा प्रकरणात कर्जत तहसीलदारला भेटणार

किरीट सोमय्यांनी पुन्हा वात पेटवली; ठाकरे सरकारच्या कथित तीन घोटाळ्यांची कागदपत्रे जाहीर

(Kirit Somaiaya new allegations against CM Uddhav Thackeray)