
राज्यात काल 29 महानगर पालिकांचे निकाल जाहीर झाले. यात मुंबई महापालिकेच्या निवडणूक निकालाकडे सगळ्या देशाचं लक्ष लागलं होतं. कारण मुंबई महापालिका ही देशातीलच नाही तर आशियातील सर्वात श्रीमंत महापालिका आहे. यंदाची पालिका निवडणूक सर्वच पक्षांसाठी प्रतिष्ठेची लढाई होती. कारण मागच्या चार वर्षात महाराष्ट्राचं राजकारण पूर्णपणे बदलून गेलं आहे. ठाकरे बंधुंसाठी अस्तित्वाची लढाई होती तर भाजप आणि एकनाथ शिंदेंसाठी प्रतिष्ठेचा विषय होता. यात भाजपने बाजी मारली. मुंबई महापालिकेत आता भाजप-एकनाथ शिंदे शिवसेना महायुतीचा महापौर बसणार आहे. आपल्याकडे जी शिवसेना आहे ती खरी शिवसेना आहे असं एकनाथ शिंदे सांगतात. मुंबई हा शिवसेनेचा बालेकिल्ला होता. त्यामुळे मराठी मतदार शिंदेंच नेतृत्व स्वीकारणार का? याकडे लक्ष लागलं होतं.
मुंबईकरांनी महायुतीला कौल दिला. पण ठाकरे बंधुंचं नेतृत्व नाकारुन पूर्णपणे एकनाथ शिंदे यांचं नेतृत्वही मान्य केलं नाही. मराठी बहुल वस्त्यांमध्ये ठाकरेंच्या उमेदवारांनी विजय मिळवले. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला 29 जागांवर समाधान मानावं लागलं. ठाकरे बंधुंनी त्यांच्यापेक्षा दुप्पट जागा जिंकल्या. त्यामुळे मुंबईतला मराठी मतदार आजही ठाकरेंसोबत असल्याचं स्पष्ट झालं. यावर आता भाजपचे नेते प्रवीण दरेकर यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
महापालिकेत चमत्कार घडवला
“देवा भऊंचं कुशल मार्गदर्शन, भाषणांचा झंझावात, सुष्म नियोजन तसंच रविंद्र चव्हाण यांचं पडद्यामागचं नियोजन याचा भाजपला फायदा झाला.देवेंद्र आणि रविंद्र या जोडगोळीने महाराष्ट्राच्या महापालिकेत चमत्कार घडवला” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “मुंबईकरांना वाटत नाही जर वाटत असतं तर मतदान केलं नसतं. मराठी आणि हिंदू महापौर होणार. मुंबईच्या विकासासाठी काम करु” असं प्रवीण दरेकर म्हणाले.
ही वस्तुस्थिती आहे
“खरं आहे, शिंदेंच्या शिवसेनेला कमी जागा मिळाल्या ही वस्तुस्थिती आहे. अनेकांनी ठाकरेंना झुकतं माप दिलं. मराठीच्या स्पिरीटचा शिंदेंना फटका बसला” असं प्रवीण दरेकर यांनी कबूल केलं. “शिंदे साहेब आत्मचिंतन, आत्मपरिक्षण करणारा नेता आहे. ते डगमगणारे नाहीत. त्यामुळे भविष्यात युतीत लढल्यानेच फायदा आहे. महायुती अभेद्य ठेवली तर त्याचा परिपाक चांगला असेल” असं दरेकर म्हणाले. “संजय राऊत यांनी गद्दार, खुद्दार विश्लेषण करणं कमी करावं, आत्मपरिक्षण करावे. त्यांना जनतेनं त्यांची जागा दाखवलीय” असं प्रवीण दरेकर म्हणाले. “भाजप 24 तास निवडणुकीसाठी तयार असतो. यांचं ताकदीने जास्त यश झेडपीमध्ये आम्हाला मिळेल” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.