भाजपचे नेते राज्यपालांकडे जाणार, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली? ‘नाराज’ पोलीस अधिकाऱ्यांना घातली साद

| Updated on: Mar 22, 2021 | 12:17 PM

आम्ही केवळ राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले. | BJP Bhagat Singh Koshyari

भाजपचे नेते राज्यपालांकडे जाणार, राष्ट्रपती राजवटीच्या हालचाली? नाराज पोलीस अधिकाऱ्यांना घातली साद
परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्रासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला पाहिजे.
Follow us on

मुंबई: परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतरही ठाकरे सरकार (Thackeray govt) विरोधकांच्या मागणीला भीक घालत नसल्याने आता भाजपने राज्यपाल भगतसिंह कोश्यारी (Bhagatsingh Koshyari) यांच्याकडे जाण्याचा निर्णय घेतला आहे. येत्या 24 तारखेला भाजपचे सर्व नेते राज्यपालांकडे जाणार आहे. यावेळी पोलीस दलातील नाराज अधिकाऱ्यांनीही न घाबरता आपल्या तक्रारी राज्यपालांकडे द्याव्यात, अशी साद भाजपने घातली आहे. (BJP leader Sudhir Manguntiwar demands Governor Bhagat Singh Koshyari to intervene)

भाजपचे नेते सुधीर मुनगंटीवार यांनी सोमवारी मुंबईत पत्रकारपरिषद घेतली. यावेळी त्यांच्या बोलण्याचा एकूण रोख पाहता भाजपने महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट आणण्यासाठी हालचाली सुरु केल्याचे संकेत मिळत आहेत. मात्र, सुधीर मुनंगटीवार यांनी आपण राष्ट्रपती राजवटीची कोणतीही मागणी केलेली नाही, हे निक्षून सांगितले आहे. आम्ही केवळ राज्यपालांकडे जाऊन महाराष्ट्रातील परिस्थिती त्यांच्यासमोर मांडणार आहोत, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

‘राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवावा, राष्ट्रपतींशीही बोलावे’

डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहलेल्या घटनेनुसार राज्यपाल हे राज्याचे प्रमुख असतात. परमबीर सिंह यांनी गृहमंत्र्यांवर केलेले आरोप गंभीर आहेत. राज्यपालांनी या घटनेची दखल घ्यावी. राज्य सरकार कायदा व सुव्यवस्था राखण्यात किंवा कृती करण्यास असमर्थ असेल तर राज्यपालांनी राष्ट्रपतींसमोर सत्य मांडले पाहिजे. परमबीर सिंह यांनी लिहलेल्या पत्रासंदर्भात राज्यपालांनी मुख्यमंत्र्यांकडून अहवाल मागवला पाहिजे, अशी मागणीही सुधीर मुनगंटीवार यांनी केली.

भाजपची नाराज पोलीस अधिकाऱ्यांना साद

या पत्रकारपरिषदेत सुधीर मुनगंटीवर यांनी पोलीस दलातील नाराज अधिकाऱ्यांना साद घालण्याचा प्रयत्न केला. सरकारमधील मंत्री तुम्हाला चुकीची कामं करायला सांगत असतील तर त्या अधिकाऱ्याने कोणाच्याही दबावाखाली न येता राज्यपालांकडे तक्रार दाखल करावी, असे आवाहन सुधीर मुनगंटीवार यांनी केले. अनेक अधिकारी असे असतील जे सरकारच्या भीतीपोटी माहिती देण्यास मागेपुढे पाहत असतील. मात्र, त्यांनी न घाबरता पुढे यावे, असे मुनगंटीवार यांनी सांगितले.

महाराष्ट्रातील चार पक्षांचं राज्यपालांना साकडं, राष्ट्रपती राजवट लागू करण्याची आग्रही मागणी

परमबीर सिंह यांच्या खळबळजनक पत्रानंतर महाराष्ट्रातील चार पक्षांनी आतापर्यंत राष्ट्रपती राजवटीची मागणी केली आहे. यामध्ये नवनीत राणा, रामदास आठवले, प्रकाश आंबेडकर आणि नारायण राणे या नेत्यांचा समावेश आहे. देशातील कोणत्याही राज्यात शासकीय कारभार संविधानानुसार चालणे शक्य नसल्याचा अहवाल संबंधित राज्याच्या राज्यपालांनी राष्ट्रपतींना दिला किंवा तसा अहवाल नसतानाही राष्ट्रपतींची स्वत:ची तशी खात्री पटली, तरी राष्ट्रपती त्या राज्यात राष्ट्रपती राजवट लागू करु शकतात. संविधानाच्या कलम 356 नुसार, एखाद्या राज्यातील प्रशासन घटनात्मक पद्धतींने चालत नसल्यास राष्ट्रपती राजवट लागू केली जाऊ शकते.

संबंधित बातम्या 

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; राणेंपाठोपाठ नवनीत राणा यांचेही अमित शहांना पत्रं

महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लागू करा; रामदास आठवले गृहमंत्र्यांची भेट घेणार

Special Report | राज्यात राष्ट्रपती राजवट लागू होणार?

राष्ट्रपती राजवट म्हणजे काय? महाराष्ट्रात कधी-कधी लागू झाली?

(BJP leader Sudhir Manguntiwar demands Governor Bhagat Singh Koshyari to intervene)