मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण

लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया इक्बालसिंह चहल यांनी दिली.  (BMC Commissioner Iqbal singh Chahal On Mumbai Local)

मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय 15 डिसेंबरनंतरच, मुंबई महापालिका आयुक्तांचं स्पष्टीकरण
| Updated on: Nov 24, 2020 | 3:23 PM

मुंबई : मुंबईची लाईफलाईन अशी ओळख असणारी मुंबई लोकल सर्वसामान्यांसाठी कधी सुरु करणार, असा प्रश्न गेल्या काही दिवसांपासून सातत्याने केला जात आहे. मात्र गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे. त्यामुळे लोकल सुरु करण्याबाबतचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ, अशी प्रतिक्रिया मुंबई महापालिका आयुक्त इक्बालसिंह चहल यांनी दिली. (BMC Commissioner Iqbal singh Chahal On Mumbai Local)

“मुंबईत सध्या दिवाळीनंतर कोरोना रुग्ण वाढत आहेत. त्यामुळे सध्या आमचं याकडे लक्ष आहे. यामुळे मुंबई लोकल सुरु करण्याचा निर्णय हा 15 डिसेंबरनंतर घेऊ,” असे इक्बालसिंह चहल म्हणाले.

“राज्य सरकारने आपल्या राज्यात येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लादले आहेत. त्यामुळे जर कोणाला मुंबई किंवा महाराष्ट्रात यायचं असेल, तर कोरोना चाचणीचा रिपोर्ट दाखवणे बंधनकारक असणार आहे. मुंबईत सुद्धा मोठ्या प्रमाणात प्रवासी विमान आणि रेल्वे येत असतात. पालिका प्रशासन त्याची अंमलबजावणी करत आहे. त्यामुळे कोणालाही कोरोना निगेटिव्ह रिपोर्ट नसेल, तर मुंबईत घेतलं जाणार नाही,” असे मुंबई महापालिका आयुक्तांनी स्पष्ट केलं.

“मुंबईतील रेल्वेच्या स्टेशनवरही तपासणी सुरू केली आहे. मुंबईत सध्या कोरोनाची स्थिती ही नियंत्रणात आहे. बेड योग्य प्रकारे उपलब्ध आहेत. त्यामुळे कोरोनाची लाट येईल की नाही हे माहीत नाही. पण पालिकेने याचे नियोजन सुरू केले आहे. त्यामुळे आता लोकांनी जे नियम दिले ते पाळणं गरजेचे असणार आहे,” असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.

पालिकेकडून मास्कचं वाटप

मुंबई मास्क न वापरणाऱ्यांविरोधात योग्य प्रकारे कारवाई होत आहे. पण तरीही काही लोक ऐकत नाही. त्यामुळे लोकांनी आता सुधारलं पाहिजे. याच पार्श्वभूमीवर आता मास्क कारवाईत जमलेल्या रकमेतून नागरिकांना पालिका मास्क विकत घेऊन वाटप करणार आहे, असेही इक्बालसिंग चहल म्हणाले.

मुंबई महापालिका कोरोनाचे नियोजन योग्य प्रकारे करत आहे. कोरोना लसीचे वितरणाचे नियोजन सुरु आहे. त्यामुळे सध्या तरी लॉकडाऊनबाबत काही चर्चा झाली नाही. पण बाहेरून येणाऱ्या प्रवाशांवर निर्बंध लावण्यात आले आहेत. आता लोकांनी सहकार्य केलं पाहिजे, तर सर्व सुरळीत राहील, असेही पालिका आयुक्तांनी सांगितले.(BMC Commissioner Iqbal singh Chahal On Mumbai Local)

संबंधित बातम्या : 

सर्वसामान्य मुंबईकरांना ‘बेस्ट’ दिलासा, यावर्षी कोणतीही भाडेवाढ नाही!

Mumbai Corona | मुंबई महापालिका कोरोना संसर्गाविरुद्ध अ‌ॅक्शन मोडमध्ये, मिशन धारावी सुरु