
Uddhav Thackeray on Election Commission: मुंबई महापालिका निवडणुकीकडे (BMC Election 2026) सर्वच देशाचं लक्ष लागले आहे. लोकशाहीच्या या उत्सवात बड्या नेत्यांनी ही सहभाग नोंदवला. कलानगरमध्ये उद्धव ठाकरे यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. उद्धव ठाकरे, रश्मी ठाकरे,आदित्य ठाकरे, तेजस ठाकरे, अनिल परब हे त्यांच्यासोबत होते. यावेळी उद्धव ठाकरे यांनी राज्य निवडणूक आयोगाला सोलपटून काढले. त्यांनी आयोगाच्या कारभारावर तोंडसुख घेतले. निवडणुकीतील गोंधळावर त्यांनी जाहीर नाराजी व्यक्त केली.
निवडणूक आयुक्त पगार कसला घेतात?
निवडणुकीतील गोंधळावर त्यांनी टीका केली. या प्रकारांमुळे वैषम्य वाटत असल्याचे ते म्हणाले. मुंबईसह राज्यातील इतरही महापालिकेमधून निवडणूक आयोगाच्या गोंधळाविषयी फोन येत असल्याचे उद्धव ठाकरे म्हणाले. नाव वगळली जात आहे. मतदार याद्यांमध्ये गोंधळ तर आहेच. आता बोटावरील शाईसुद्धा पुसल्या जात असल्याची माहिती समोर येत आहे. मग निवडणूक आयुक्त हे पगार कशासाठी घेतात? असा सवाल करत याचा खुलासा व्हायला हवा असे उद्धव ठाकरे म्हणाले. निवडणूक आयुक्तांवर एक बंधन हवे. मुंबई महापालिका निवडणुका या 9 वर्षांनी होत आहे, मग इतक्या वर्ष निवडणूक आयोग, आयुक्त आणि कर्मचारी काय करत होते असा परखड सवाल त्यांनी विचारला.
तर निवडणूक आयुक्तांनी रोज काय काम केलं हे त्यांनी निवडणूक आयोगाच्या साईटवर टाकणं बंधनकारक केलं पाहिजे अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली. अन्यथा राजकीय पक्षांचे कार्यकर्ते हे निवडणूक आयुक्त्यांच्या कार्यालयात बसवण्यात यायला हवेत, जेणेकरून ही जी दादागिरी सुरू आहे, भाईगिरी सुरू आहे, तेव्हा वर्षभर हे आयोगातील माणसं काय करतात हे समोर येईल. निवडणूक याद्यांचा घोळ ताबडतोब थांबवला गेला पाहिजे. नाहीतर निवडणूक आयुक्तांवर कारवाई झाली पाहिजे, असे उद्धव ठाकरे यांनी सुनावले.
मराठी माणूस आणि मुंबईकरांनी मोठ्या संख्येने मतदानासाठी बाहेर पडावे आणि ही जुलमी, भ्रष्टशाही उलथून टाका असे आवाहन त्यांनी केले. तर इतर भाषिकांनी अनुभवावरून त्यांच्या अडचणीच्या काळात कोण मदतीला धावून आले याची आठवण ठेवा आणि अनुभवावरून मतदान करा असे आवाहन उद्धव ठाकरे यांनी यावेळी केले. तर यापूर्वी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी शाई ऐवजी मार्कर पेनाचा वापर होत असल्याबाबत निवडणूक आयोगावर टीका केली. बोटावरची मार्करची खूण पुसून पुन्हा मतदानाचा प्रकार होत असून संपूर्ण यंत्रणाच सत्ताधाऱ्यांसाठी कामाला लागल्याचा गंभीर आरोप राज ठाकरे यांनी केला.