ना फटाके, ना हलगर्जी, दुसरी लाट थोपवण्यास BMC सज्ज, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई

| Updated on: Nov 09, 2020 | 6:18 PM

कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज असल्याचे आयुक्त इक्बालसिंग चहल यांनी सांगितले.

ना फटाके, ना हलगर्जी, दुसरी लाट थोपवण्यास BMC सज्ज, विनामास्क फिरणाऱ्यांवर कडक कारवाई
Follow us on

मुंबई : अवघ्या काही दिवसांवर दिवाळी (Diwali 2020) सण आल्याने मुंबईतील मार्केटमध्ये खरेदीसाठी मुंबईकरांची प्रचंड झुंबड उडाली आहे. त्यामुळे कोरोनाचा संसर्ग (Corona infection) वाढण्याची शक्यता असल्याने हा संसर्ग रोखण्यासाठी मुंबई महापालिकेने (BMC) कंबर कसली आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईत यंदा दिवाळीत फटाके फोडण्यास आणि आतषबाजी करण्यास बंदी घातली आहे. शिवाय फटाके फोडणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशाराही देण्यात आला आहे. तसेच कोरोनाची दुसरी लाट (second wave of corona pandemic) येण्याची शक्यता असल्याने मुंबई महापालिका पूर्णपणे सज्ज असल्याचे महापालिका आयुक्त इक्बालसिंग चहल (Iqbal Singh Chahal) यांनी सांगितले.

आयुक्त चहल म्हणाले की, “प्रशासनाने जारी केलेल्या नियमावलीचं पालन झालं नाही तर कोरोनाचा धोका आणखी वाढेल. त्यामुळे लोकांनी मास्क, सॅनिटायझरसह सोशल डिस्टन्सिंगच्या नियमांचे पूर्णपणे पालन करायला हवे. तसेच कोरोनाची दुसरी लाट आली तर ती थोपवण्यासाठी महापालिका प्रशासन सज्ज आहे. महापालिकेकडे सध्या पुरेसे बेड उपलब्ध आहेत”.

आयुक्त म्हणाले की, “कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या आता कुठे कमी होऊ लागली आहे. परंतु ती पुन्हा वाढू नये यासाठी नियमावलीची दिवाळीत कडक अंमलबजावणी करणार आहोत. मास्क न घालता फिरणाऱ्यांवर कडक कारवाई केली जाईल. दररोज 25 हजार लोकांवर कारवाई केली जाणार आहे. आधी दररोज 9 ने 10 हजार लोकांवर कारवाई केली जात होती. परंतु कारवाईची तीव्रता आता वाढणार आहे”.

मुंबई पोलिस आणि महापालिका प्रशासनाने सकाळी झालेल्या बैठकीत मुंबईतील क्राऊड स्पॉट (गर्दीची ठिकाणं) निश्चित केले आहेत. अशा गर्दीच्या ठिकाणांवरील पोलीस बंदोबस्त वाढवला जाणार आहे. लक्ष्मीपूजन वगळता इतर दिवशी फटाके फोडण्यावर बंदी आहे. तसेच सार्वजनिक ठिकाणीदेखील फटाके फोडण्यास मनाई करण्यात आली आहे. त्यामुळे यंदा मरिन ड्राईव्ह, वरळी सीफेस परिसरात आतषबाजी होणार नाही.

…तर कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते; मुख्यमंत्र्यांचा सतर्कतेचा इशारा

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी महाराष्ट्राच्या जनतेला पुन्हा एकदा सतर्कतेचा इशारा दिला आहे. जगभरात येत असलेली कोरोनाची दुसरी लाट त्सुनामी ठरू शकते, आपल्याकडे ती येऊ द्यायची नसेल तर गाफील राहून चालणार नाही, असा इशारा देतानाच मास्क लावणे, हात धुणे आणि शारीरिक अंतराचे पालन करणे या त्रिसुत्रीचा अवलंब प्रत्येकाला करावाच लागेल, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितले.

दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी काल (08 नोव्हेंबर) राज्यातील जनतेशी संवाद साधून कोरोनाच्या आगामी संकटाची चाहूल दिली. दिवाळीचा सण प्रकाशपर्वाचा सण असल्याने प्रदूषण आणि गर्दी टाळून हा उत्सव साधेपणाने आणि आनंदाने साजरा करा. सुख समृद्धीसाठी उघडलेल्या आपल्या घराच्या दारातून कोरोनाला आतू येऊ देऊ नका, असे आवाहन त्यांनी केले. मुख्यमंत्र्यांनी फटाक्यांवर बंदी घालून आपल्यावर आणीबाणी लादायची नसून परस्पर विश्वासातून आपल्याला पुढे जायचे आहे, असंही त्यांनी सांगितलं.

संबंधित बातम्या

मुंबई महापालिकेचा मोठा निर्णय, दिवाळीत फटाके फोडण्यास बंदी, फक्त लक्ष्मीपूजनाला फुलबाजांना परवानगी

यंदाची दिवाळी वेगळी, फटाके न फोडता साधेपणाने साजरी करा, मुंबईच्या महापौरांचे आवाहन

(BMC is ready to fight with second wave of corona pandemic says commissioner iqbal chahal)