मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिका आपत्कालीन परिस्थितीच्या प्रसंगी बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्राबाहेर देखील तत्परतेने मदत कार्याला तयार झालीय. याच अनुषंगाने आज (24 जुलै) बृहन्मुंबई महानगरपालिकेची 2 पथकं रायगडच्या व कोल्हापूरच्या दिशेने रवाना झाली आहेत. रायगड व कोल्हापूरच्या दिशेने मार्गस्थ झालेल्या पथकांचे नियोजन हे अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (प्रकल्प) पी. वेलरासू आणि अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (पश्चिम उपनगरे) सुरेश काकाणी यांच्या मार्गदर्शनात करण्यात येत आहे.
मुंबई महानगरपालिकेचा एक चमू रायगड जिल्ह्यातील महाड येथे मदत कार्य करण्यास रवाना झाला आहे. यामध्ये दोन वैद्यकीय चमू, 1 फिरती वैद्यकीय प्रयोगशाळा, घन कचरा व्यवस्थापन खात्यातील सुमारे 75 कर्मचारी, पाण्याचे 4 टँकर, 1 टोइंग लॉटरी इत्यादींचा समावेश आहे. याबाबत वैद्यकीय विषयक बाबींचे व्यवस्थापन हे बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या लोकमान्य टिळक सर्वोपचार रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी हे करीत आहेत. आपत्कालीन व्यवस्थापन विषयक कार्यवाही ही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या आपत्कालीन व्यवस्थापन कक्षाचे संचालक महेश नार्वेकर करीत आहेत.
आपत्कालीन प्रसंगी मदत कार्यासाठी तत्पर असणाऱ्या बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या २ चमू ह्या अनुक्रमे रायगड व कोल्हापूरच्या दिशेने रवाना.
(१/९) pic.twitter.com/kipvop2WvA
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) July 24, 2021
कोल्हापूर येथील पूर बाधित परिसरातील पर्जन्य जलवाहिन्या आणि मलनिस्सारण वाहिन्यांविषयी आवश्यक ती कार्यवाही करण्याच्या दृष्टीने बृहन्मुंबई महानगरपालिकेची आणखी एक चमू आज कोल्हापूरकडे रवाना झाला आहे. कोल्हापूरच्या दिशेने प्रस्थान केलेल्या संबंधित कर्मचाऱ्यांच्या चमुसोबत ‘रिसायकल मशीन’ आणि इतर आवश्यक यंत्रसामग्री देखील पाठविण्यात आली आहे. महापालिकेची यंत्रणा वापरत असताना यासाठी घनकचरा व्यवस्थापन विभागाचे उप मुख्य अभियंता सुनील सरदार यांचीही मदत घेण्यात येत आहे.
सन 2019 मध्ये कोल्हापुरात अशाच स्वरूपाची पूर परिस्थिती निर्माण झाली होती. त्यावेळीही बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या विविध विभागांतर्फे कोल्हापुरात विविध नागरी सेवा सुविधा सुसज्ज करण्यासाठी बृहन्मुंबई महानगरपालिकेचे कर्मचारी अहोरात्र मेहनत घेत होते.