Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?

| Updated on: Apr 18, 2022 | 3:33 PM

Raj Thackeray : मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांना केंद्रातून सुरक्षा वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांचा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे.

Raj Thackeray : राज ठाकरेंना केंद्राची सुरक्षा? हालचाली सुरू; राज यांचे महत्त्व वाढवण्याचे प्रयत्न?
सामनातून राज ठाकरें आणि भाजपवर घणाघात
Image Credit source: ani
Follow us on

मुंबई: मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांना केंद्रातून सुरक्षा वाढवण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. राज ठाकरे यांनी गेल्या काही दिवसांपासून भोंग्यांचा विषय हाती घेतला आहे. त्यामुळे महाराष्ट्रातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. त्यातच महापालिकेच्या (municipal corporation) निवडणुका जवळ आल्या असून राज ठाकरे यांना सोबत घेण्याचा भाजपचा प्रयत्न आहे. या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांची सुरक्षा वाढवून त्यांचं महत्त्व वाढवण्याचं घटत असल्याचं सांगितलं जातं. शिवसेनेच्या (shivsena) राजकारणाला शह देण्यासाठीच राज ठाकरे यांना भाजपकडून बळ देण्याचा हा प्रयत्न असल्याचंही सांगितलं जात आहे. राज यांना बळ देऊन महाविकास आघाडीला सक्षमपणे टक्कर देण्यासाठी भाजपच्या हालचालीचा एक भाग म्हणूनही याकडे पाहिले जात आहे. त्यामुळे केंद्र सरकारकडून राज ठाकरे यांना कोणत्या दर्जाची सेक्युरिटी दिली जातेय याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.

मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्यासाठी तीनदा इशारा दिला आहे. मुंबईतील शिवाजी पार्कवरील सभा, त्यानंतर ठाण्यातील सभा आणि आता पुण्यातील पत्रकार परिषदेतून राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे हटवण्याचा इशारा दिला आहे. भोंगे न हटवल्यास आम्ही जशास तसे उत्तर देऊ. मशिदीसमोरच हनुमान चालिसा लावू, असा इशारा राज ठाकरे यांनी दिला आहे. त्यामुळे राज्यातील राजकीय वातावरण ढवळून निघालं आहे. राज ठाकरे यांच्या या इशाऱ्यामुळे दोन समाज आमनेसामने येण्याची भीतीही व्यक्त केली जात असून या पार्श्वभूमीवर राज ठाकरे यांना सुरक्षा देण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत.

राज यांच्या जवळ जाण्याचा प्रयत्न?

राज्यात मुंबई, ठाणे, पुण्यासह महत्त्वाच्या महापालिकेच्या निवडणुका आहेत. त्यामुळे एकट्याने निवडणुका लढवून आघाडीला पराभूत करणं कठिण असल्याचं भाजपच्या लक्षात आलं आहे. म्हणूनच भाजपने मनसेला जवळ करण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. शिवसेना आणि भाजपमध्ये प्रचंड वितुष्ट निर्माण झालं आहे. शिवसेना आता भाजप सोबत युती करण्याची शक्यता मावळली आहे. त्यामुळे भाजपला नवा भिडू सोबत हवा आहे. राज ठाकरे हे शिवसेनेची उणीव भरून काढू शकतात. त्यामुळे त्यांना बळ देण्याचे भाजपकडून प्रयत्न सुरू आहेत. त्याचाच एक भाग म्हणून भाजपकडून राज यांच्या प्रत्येक भाषणाचं कौतुक केलं जात आहे. उघडपणे समर्थन केलं जात आहे. त्यातून अनेक राजकीय अर्थ काढले जात आहेत.

भेटीगाठी आणि तर्कवितर्क

राज ठाकरे यांच्या गुढीपाडव्याच्या सभेनंतर भाजप नेत्यांनी त्यांच्या भेटीगाठी सुरू केल्या आहेत. केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी नुकतीच राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर केंद्रीय रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे आणि शायना एनसी यांनीही राज यांची भेट घेतली. भेटीची कारणं वेगवेगळी सांगितली जात असली तरी राज यांच्या भाषणानंतरच भाजप नेत्यांच्या भेटीगाठी वाढल्याने अनेक तर्क लढवले जात आहेत.

संबंधित बातम्या:

Rajesh Tope : महाविकास आघाडीतील धुसफूस पुन्हा बाहेर, राजेश टोपेंची शिवसेनेवर उघड नाराजी

Raj Thackeray | तो येईल भाषण करून जाईल, थोडं एंटरटेनमेंट होईल… राज ठाकरेंच्या सभेचा प्रश्न सुप्रिया सुळेंनी पुन्हा उडवून लावला

Maharashtra News Live Update : महाविकास आघाडीत पुन्हा नाराजीचे सूर, आता कोण नाराज?