मुंबई पाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाईट लाईफ’ सुरु होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात…

"मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही, पण तरीही मुंबईच्या काही भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हा प्रयोग करुन पाहणार आहोत", असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Nightlife) म्हणाले.

मुंबई पाठोपाठ संपूर्ण महाराष्ट्रात नाईट लाईफ सुरु होणार? मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणतात...
| Updated on: Jan 21, 2020 | 8:54 AM

मुंबई : आदित्य ठाकरे यांच्या ‘नाईट लाईफ’च्या संकल्पनेवर त्यांचे वडील आणि महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Nightlife) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. “मला नाईट लाईफ हा शब्दच मुळात आवडत नाही, पण तरीही मुंबईच्या काही भागांमध्ये प्रायोगिक तत्वावर आपण हा प्रयोग करुन पाहणार आहोत”, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आयपीएस अधिकाऱ्यांच्या एका कार्यक्रमात ते बोलत होते. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री अजित पवार, गृहमंत्री अनिल देशमुख, राज्यमंत्री सतेज पाटील, राज्याचे मुख्य सचिव अजॉय मेहता, अतिरिक्त मुख्य सचिव संजय कुमार आणि पोलीस महासंचालक सुबोध जयस्वाल उपस्थित होते.

“महाराष्ट्रातील प्रत्येक जिल्ह्याला, शहराला विशिष्ट असा इतिहास आणि संस्कृती आहे. त्यामुळे संपूर्ण महाराष्ट्रात ‘नाईट लाईफ’ सुरु करता येणार नाही. मुंबईतील काही भागांमध्येच नाईट लाईफ सुरु करण्यात येत असून ते फक्त प्रायोगिक तत्वावर असणार आहे. खरंतर मला नाईट लाईफ हा शब्दच आवडत नाही”, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray on Nightlife) म्हणाले. याशिवाय “सुरुवातीला हॉटेल्स, रेस्टॉरंट आणि मॉल यांना 24 तासांचा परवाना मिळणार आहे”, असेदेखील उद्धव ठाकरे म्हणाले.

येत्या 26 जानेवारीपासून मुंबईमध्ये बीकेसी, नरिमन पॉईंट, कालाघोडा या ठिकाणचे हॉटेल, पब, मॉल्स, थिएटर 24 तास खुले राहणार आहेत. हे सर्व सध्या प्रायोगिक तत्त्वावर सुरु करण्यात येत आहे.

मुंबईत ‘नाईट लाईफ’ असावं ही संकल्पना सगळ्यात आधी आदित्य ठाकरे यांनी मांडली होती. भाजप शिवसेना युती सरकारच्या वेळी आदित्य ठाकरेंनी ही संकल्पना मांडली होती. त्यावेळी याबाबत कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. मात्र आता महाविकासआघाडीचे सरकार आल्यानंतर प्रायोगिक तत्वावर यावर निर्णय घेण्यात आला आहे.

यामुळे आदित्य ठाकरेंच्या स्वप्नपूर्तीच्या दिशेने हे पहिले पाऊल पडलं आहे. या निर्णयानंतर आता मुंबईतील हॉटेल्स, मॉल्स 24 तास सुरु राहू शकतात. ज्यांची इच्छा असेल ते 24 तास व्यवसाय करु शकतात.