परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वे तिकीट आकारु नये, मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती

| Updated on: May 04, 2020 | 12:07 AM

परराज्यातील मजूर आणि कामगार यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळत आहे.

परराज्यातील मजूर, कामगारांकडून मानवतेच्या दृष्टीने रेल्वे तिकीट आकारु नये, मुख्यमंत्र्यांची केंद्राला विनंती
Follow us on

मुंबई : परराज्यातील मजूर आणि कामगार (Uddhav Thackeray To Central Govt) यांना लॉकडाऊन काही प्रमाणात शिथिल झाल्यानंतर बऱ्याच दिवसांनी त्यांच्या त्यांच्या घरी जायला मिळत आहे. हे सर्व गरीब असून कोरोनामुळे त्यांची आर्थिक परिस्थिती खालावलेली आहे, याचा मानवतेच्या दृष्टीने विचार करुन रेल्वेने त्यांच्याकडून तिकीट शुल्क आकारु नये, अशी विनंती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी केंद्राला केली आहे. आज राज्यातील विभागीय आयुक्त, जिल्हाधिकारी, मंत्रालयातील सचिव , पोलीस अधिकारी यांच्याशी व्हिडीओ कॉन्फरन्स (Uddhav Thackeray To Central Govt) बैठकीत ते बोलत होते.

गेल्या दोन दिवसांपासून राज्यातील अडकलेल्या मजूर, कामगार आणि श्रमिकांची पाठवणी त्यांच्या त्यांच्या राज्यात सुरु झाली आहे. भिवंडी, नाशिकहून विशेष रेल्वे रवाना झाल्या आहेत. मंत्रालय नियंत्रण कक्षाद्वारे या सगळ्यावर देखरेख आणि समन्वय ठेवण्यात येत आहे. राज्यात अडकलेल्या मजुरांमध्ये उत्तर प्रदेश, बिहार, राजस्थान, पंजाब, कर्नाटक, पश्चिम बंगाल, छत्तीसगड अशा राज्यातील मजूर मोठ्या संख्येने आहेत. सुमारे 5 लाख परप्रांतीय मजुरांची राज्य शासनाने त्यांना निवारा देऊन तसेच जेवणाखाण्याची साधारणत: 40 दिवस व्यवस्था केली, तसेच जोपर्यंत सर्वजण आपापल्या ठिकाणी जात नाहीत तोपर्यंत ती व्यवस्था सुरुच आहे.

हे मजूर हातावर पोट असणारे आहेत. ते गरीब असून कोरोनामुळे हतबल झाले आहेत, अशा परिस्थितीत त्यांना रेल्वेचे तिकीट काढण्यासाठी पुरेसे पैसेही नसतील. काही ठिकाणी तर स्वयंसेवी संस्था आणि संघटना यांनी तिकिटाचे कमी पडलेले पैसे भरुन या मजुरांना दिलासा दिला आहे. त्यामुळे त्यांना जर तिकिटाचे पैसे माफ केले, तर या काळात त्यांना आधार मिळेल असेही मुख्यमंत्र्यांचे म्हणणे आहे.

सध्या या राज्यांतील कामगारांना त्यांच्या राज्यात पाठविण्यासाठी रेल्वेशी देखील चांगला समन्वय ठेवण्यात आला आहे. इतर राज्य सरकारांशी सुद्धा चांगला समन्वय ठेवावा तसेच त्यांची वैद्यकीय तपासणी आणि इतर कागदपत्रे यांची पूर्तता करुन घेऊन त्यांना पाठवावे. यामध्ये कुठेही गोंधळ होऊ नये, असे निर्देश (Uddhav Thackeray To Central Govt) मुख्यमंत्र्यांनी दिले.

निवारा केंद्रातील सर्व कामगारांची यादी अद्ययावत करावी. तसेच, आज ना उद्या मुंबई, ठाणे, पुणे येथून विशेष रेल्वे सोडण्याचा निर्णय झाल्यास या कामगारांच्या प्रवासाचे व्यवस्थित नियोजन जिल्हाधिकारी तसेच इतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी करावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

राज्यांतर्गत ठिकठिकाणी अडकलेल्या व्यक्ती आणि प्रवाशांचे गट यांना त्या-त्या जिल्ह्यांत जाण्याची परवानगी ही सर्व बाबींचा विचार करुन आणि लॉकडाऊन नियमाप्रमाणे करावी. तसेच, यात तक्रारी येऊ देऊ नये. अडकलेल्या व्यक्ती या नागरिक आहेत, परिस्थितीमुळे त्यांना थांबावे लागले आहे त्यादृष्टीने याकडे पाहावे असेही मुख्यमंत्री म्हणाले.

परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली, ही गरिबांची चेष्टा : रोहित पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार रोहित पवार यांनी लॉकडाऊनच्या काळात अडकलेल्या परराज्यातील मजुरांना त्यांच्या गावी पोहचवताना होणाऱ्या तिकिटाच्या पैशांच्या वसुलीवरुन केंद्र सरकारवर सडकून टीका केली आहे. पोटाची खळगी भरण्यासाठी जे मजूर परराज्यात जातात, त्यांना आता लॉकडाऊनच्या काळात दिवस कसा भागवायचा अशी भ्रांत आहे. अशा मजुरांकडून तिकिटाचे पैसे वसूल केले जात आहेत, ही गरिबांची घोर चेष्टा असल्याचं मत रोहित पवार यांनी व्यक्त केलं. याबाबत ट्विट करत त्यांनी थेट पंतप्रधान कार्यालयाला प्रश्न विचारला आहे.

Uddhav Thackeray To Central Govt

संबंधित बातम्या :

महाराष्ट्रात 2115 जण कोरोनामुक्त, एकूण कोरोना रुग्णांचा आकडा 12 हजार 974 वर

परराज्यातून घरी जाणाऱ्या मजुरांकडून तिकिटांच्या पैशाची वसुली ही गरिबांची घोर चेष्टा : रोहित पवार

Navi Mumbai Corona : नवी मुंबईत एकाच दिवसात 25 नवे रुग्ण, कोरोनाबाधितांची संख्या 300 पार

फोटो मॉर्फ करुन खालच्या पातळीवरील टीका करणाऱ्यांना पैसे कोणी पुरवले? जयंत पाटलांचा भाजपला सवाल