भारतीय जनता पक्षाचा आत्मा ईव्हीएममध्ये, काँग्रेस नेत्याचा भाजपला टोला

| Updated on: Feb 03, 2021 | 7:11 PM

भारतीय जनता पक्षाची पोटदुखी वेगळी आहे त्यांचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे, अशी टीका काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी केली. (Sachin Sawant BJP EVM)

भारतीय जनता पक्षाचा आत्मा ईव्हीएममध्ये, काँग्रेस नेत्याचा भाजपला टोला
सचिन सावंत, काँग्रेस नेते
Follow us on

मुंबई : विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीतही ईव्हीएमऐवजी मतपत्रिकेचा पर्याय असावा म्हणून पुढाकार घेतला आहे. महाराष्ट्रातील मतदारांना विधानसभा आणि स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत मतपत्रिकेचा पर्याय मिळावा म्हणून महाराष्‍ट्र विधानमंडळाने कायदा तयार करावा, अशा स्पष्ट सूचना महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष नाना पटोले यांनी दिल्यानंतर राजकीय नेत्यांच्या प्रतिक्रिया येत आहेत. भाजप नेते विधानसभेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी निवडणूक कोणत्या पद्धतीनं घ्यावं हा निवडणूक आयोगाचा प्रश्न असल्याचं सांगितलयं. आता काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पार्टीचा आत्मा ईव्हीएमध्ये असल्याचा आरोप केलाय. ( Congress leader Sachin Sawant slams BJP over EVM and Ballot voting)

सचिन सावंत काय म्हणाले?

भारतीय जनता पक्षाची पोटदुखी वेगळी आहे त्यांचा आत्मा ईव्हीएममध्ये आहे. मोदी सरकार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींची लोकप्रियता दाखवण्याचा जो प्रयत्न होत आहे, त्याचं मूळ ईव्हीएम आहे. विधानसभा अध्यक्ष नाना पटोले संविधानिक पदावर आहेत त्यांना जे अधिकार प्राप्त झालेल्या त्या अन्वये त्यांनी सध्या परिस्थितीचा आढावा घेऊन राज्य सरकारला सूचना केली आहे. मतपत्रिकांचा वापर व्हावा यासाठी कायदा करावा. निवडणूक प्रक्रिया पारदर्शक व्हावी यासाठी निवडणूक आयोगाची देखील भूमिका आहे. असं सचिन सावंत म्हणाले.

शिवसेनेवर भाजपनं पाठीमागून वार केले

शिवसेनेवर आतापर्यंत भाजपने पाठीमागून वार केले हे सर्व राज्याने पाहिले आहे. ही वस्तुस्थिती समोर आहे. ठाकरे कुटुंबीयांवर सुशांतसिंग राजपूत प्रकरणी वैयक्तिक हल्ले केले गेले. त्यामुळे भाजप हा पाठीत खंजीर खुपसणारा पक्ष आहे. त्यामुळे भाजपवर विश्वास ठेवण्यासारखे काही नाही, असं सचिन सावंत म्हणाले.

उलटा प्रवास करु नये, प्रविण दरेकरांची भूमिका

विधानसभा आण विधानसभा अध्यक्षांनी काय करावं हे नियम घालून देण्यात आलेले आहेत.निवडणूक हा विषय केंद्र सरकारच्या निवडणूक आयोगाच्या अंतर्गत येत असतो. आपला देश सुधारणेकडे जाणारा आहे. त्यामुळं मतपत्रिकेवरुन आपण ईव्हीएम आणलं. आता उलटा प्रवास करण्याचा प्रयत्न दिसतोय. नियम सर्वांना सारखे असतात, सरकारं येतात आणि जातात. त्यामुळे पूर्वग्रहानं भूमिका घेऊ नये. भाजपला देशभरात यश मिळतं आहे. विरोधी पक्ष त्यांचं अपयश लपवण्यासाठी अशा भूमिका घेत आहे. देश प्रगतीकडं जात असताना आधुनिक तंत्रज्ञान स्वीकारलं पाहिजे, अशी भूमिका प्रविण दरेकरांनी मांडली.

जनभावनेचा आदर करणं सरकारचं काम: नवाब मलिक

नाना पटोले यांच्याकडे एक याचिका आली होती, त्यावर त्यांनी आदेश दिले आहेत. लोकसभा, विधानसभा निवडणुकीसाठी कायदे करण्याचे अधिकार केंद्र सरकारला आहेत. स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीबाबत अधिकार राज्यांना आहेत.जनभावनेचा आदर करणे हा सरकारमधील लोकांचे काम आहे. जगातील अनेक प्रगत देशात ईव्हीएमचा वापर केला जात नाही. त्यामुळे इथे मतपत्रिकेद्वारे मतदान घ्यावे अशी भावना आहे, असं राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक म्हणाले.

संबंधित बातम्या:

मतपत्रिकेद्वारे मतदान असावं की नसावं?; भाजपमध्येच संभ्रम?

महाराष्ट्रातील मतदारांना आता मतत्रिकेचाही पर्याय?; पटोलेंनी दिल्या कायदा बनविण्याच्या सूचना

( Congress leader Sachin Sawant slams BJP over EVM and Ballot voting)