निजामाच्या अत्याचाराचं काँग्रेस समर्थन करत आहेत का?; सावंतांच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा सवाल

| Updated on: Jan 15, 2021 | 6:37 PM

उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. (congress praises nizam, people trolling)

निजामाच्या अत्याचाराचं काँग्रेस समर्थन करत आहेत का?; सावंतांच्या ट्विटवर नेटकऱ्यांचा सवाल
सचिन सावंत, काँग्रेस प्रवक्ते
Follow us on

मुंबई: उस्मानाबादचे धाराशिव नामांतर करण्यास काँग्रेसने विरोध केला आहे. मात्र, हा विरोध करताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांनी निजामांचा उदोउदो केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनी काँग्रेसवर टीकेची झोड उठवली आहे. काँग्रेस निजामांच्या अत्याचाराचं समर्थन करत आहे का? असा सवाल नेटकऱ्यांनी केला आहे. तसेच सावंतच्या या ट्विटरून मराठवाड्यातील लोकांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे. (congress praises nizam, people trolling)

मुख्यमंत्र्यांचं ट्विट अन्….

मुख्यमंत्री उद्वव ठाकरे यांनी त्यांच्या ट्विटर हँडलवरून आधी औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर असा केला होता. त्यावर काँग्रेसने आक्षेप घेतला होता. या मुद्द्यावरून शिवेसनेनेही काँग्रेसवर निशाणा साधला होता. तर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगजेब धर्मनिरपेक्ष नव्हता अशा शब्दात काँग्रेसला सुनावले होते. हा वाद थांबत नाही तोच दोन दिवसांपूर्वी मुख्यमंत्र्यांनी उस्मानाबादचा उल्लेख धाराशिव केला आहे. त्याला उत्तर देताना काँग्रेस नेते सचिन सावंत यांचीच कोंडी झाली आहे.

सावंतांनी काय म्हटलं

सावंतांनी ट्विट करून उस्माबादच्या नामांतरावर पक्षाची भूमिका मांडली आहे. ‘उस्मानाबाद हे‌ नाव ७ वे निजाम नवाब मीर उस्मान अली खान बहादुर यांच्या नावावरून पडले. या निजामांनी आपली १४००० एकर जमीन आचार्य विनोबा भावे यांच्या भूदान चळवळीला दान केली. जी सामान्य गोरगरीबांच्या नावे करण्यात आली. तसेच १९६५ च्या भारत पाकिस्तान युद्धासाठी नॅशनल डिफेन्स फंडासाठी ५ टन सोने (ज्याची आजची किंमत ₹१६०० कोटी आहे) दान केले. हे जगाच्या इतिहासातील आजवरचे सर्वात मोठे दान आहे. अनेक इस्पितळे, विद्यापीठ, धरणे, रस्ते त्यांच्या दानातून उभे राहिले. शिवाजी विद्यापीठालाही त्यांची मदत झाली. इतिहास व ऐतिहासिक व्यक्तिमत्त्व काळा पांढरा रंगात नसतात. परंतु, ध्रुवीकरणाचे राजकारण समाजावर दूरगामी दुष्परिणाम करत असते एवढं मात्र नक्की!,’ असं ट्विट सावंत यांनी केलं आहे.

इतिहास काय सांगतो

उस्मानाबादचे मूळ नाव धाराशिवच होते. उस्मानाबादचे धाराशिव हे सांस्कृतिक नाव आहे. त्यामुळे निजामांचं कौतुक करणं काँग्रेसला अडचणीचं ठरू शकतं. औरंगाबादचं संभाजीनगर करणं आणि उस्मानाबादचं धाराशिव करणं हे दोन वेगळे मुद्दे आहेत, असं जाणकारांनी सांगितलं. एदलाबादचे मुक्ताईनगर करण्यात आले. अंबेजोगाईचे मोमिनाबाद आणि पुन्हा अंबेजोगाई करण्यात आलं. कुलाबा, मुक्ताई नगर आणि अंबेजोगाई ही नावे काँग्रेसनेच बदलली. याकडेही जाणकारांनी लक्ष वेधलं आहे.

नेटकरी काय म्हणतात?

एका नेटकऱ्यांनी चुकीची माहिती पसरवू नका, असं आवाहन केलं आहे. तर निजामांनी जमीन आणि पैसा कुठून आणला? अफगाणिस्तानातून की सौदीतून? असा सवाल दुसऱ्या नेटकऱ्याने केला आहे. तुम्हाला मराठवाडा मुक्तीसंग्रमाचा लढा माहीत आहे का? निजामाने हिंदूंवर केलेले अत्याचार माहीत आहेत का?, असा सवाल काही नेटकऱ्यांनी केला आहे. एकाने तर धाराशिवचे उस्मानाबाद हे नाव कुणी व का बदलले? असा सवाल केला आहे. एका नेटकऱ्याने सावंतांचा दावा फेटाळून लावला आहे. निजामाकडे 5 हजार किलो नाही तर 425 किलो सोनं होतं. हे सर्व सोनं लुटलेलं होतं. शिवाय निजामाने हे सोनं दान केलं नव्हतं तर 6.5 टक्के व्याजाने दिलं होतं, असा दावा केला आहे.

 

एखाद्याने जमीन दिली म्हणून गौरव करायचा का?

उस्मानाबादच्या नामांतरावरून सुरू असलेल्या वादावर मराठावाड्यातील विचारवंत प्रा. डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी संताप व्यक्त केला आहे. हे सर्व विषय कालबाह्य आहेत. या भूतकालीन घटना बाहेर काढणं म्हणजे मराठवाड्यातील समाजिक सलोखा बिघडवण्यास आवतन देण्यासारखं आहे. त्यामुळे कायदा आणि सुव्यवस्था राखण्याचं काम ज्यांच्या हाती आहे, त्यांनी हे मुद्दे उकरून काढणं योग्य नाही, असं सांगतानाच केवळ जमीन दिली म्हणून एखाद्याचा गौरव करायचा का?, निजाम जुलमी होता म्हणूनच मराठवाड्यातील लोक लढले ना? असा सवाल डॉ. जी. के. डोंगरगावकर यांनी केला आहे. (congress praises nizam, people trolling)

 

मग पोलीस अॅक्शन चुकीची होती का?

निजमाच्या अत्याचाराविरोधात मराठवाड्यातील जनता रस्त्यावर उतरली होती. स्वामी रामानंदतिर्थ यांच्या नेतृत्वात हा लढा उभारला. निजाम अन्यायी असल्यानेच लोक रस्त्यावर उतरले, असं सांगतानाच निजाम चांगला होता तर त्यावेळी पोलिसांनी घेतलेली अॅक्शन चुकीची होती का?, असा सवालही डोंगरगावकर यांनी केला. मराठवाड्यातील विद्यापीठं, गाव, शहरांची नावं बदलण्याचा मुद्दा पुढे रेटून मराठवाड्यातील समाजिक सलोखा बिघडवू नये, मराठवाड्यात अशा मुद्दयांनी दंगे भडकवू नये, असं सांगतानाच अहमदनगरच्या नामांतराचा मुद्दा का छेडला जात नाही? असा सवालही त्यांनी केला. (congress praises nizam, people trolling)

 

संबंधित बातम्या:

एकनाथ खडसेंची साडे सहातास चौकशी; तपासानंतर दिली ‘ही’ प्रतिक्रिया

अमोल मिटकरींना कोरोना लसीवर शंका, मोदींनी मीडियासमोर कोरोना लस घ्यावी, मिटकरींचे आवाहन

धनंजय मुंडे राजीनामा द्या, भाजप महिला मोर्चाचं सोमवारपासून राज्यव्यापी आंदोलन

(congress praises nizam, people trolling)