मुंबईः राज्यात आज 1 हजार 81 कोरोना रुग्णांची (Corona) नोंद झाली असून राज्यात कोरोना रुग्णसंख्येने हजारीचा आकडा पार केला आहे. आजच्या दिवशी 524 रुग्ण बरे होऊन घरी परतले असून आजपर्यंत 77, 36, 275 कोरोना बाधित रुग्ण बरे झाले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण आता 98.7 टक्के एवढे झाले आहे. आजच्या दिवशी एकाच दिवसात एक हजारपेक्षा जास्त रुग्ण संख्या वाढल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे. राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे (Rajesh Tope) यांनी आजच पावसाळ्याच्या धर्तीवर नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन केले होते. त्यातच आज कोरोना रुग्णांनी हजारीचा आकडा पार करण्यात आल्याने आरोग्य विभागाकडून नागरिकांनी काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
राज्यात आजपर्यंत 4032 एवढे रुग्ण कोरोना बाधित असून मुंबईतील (Mumbai) बाधित रुग्णांचा आकाडा 10,65, 619 एवढा असून सिंधुदुर्ग जिल्ह्यात सगळ्यात कमी नोंद झाली आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यात कोरोना बाधितांची संख्या घटली असली तरी राज्यातील इतर जिल्ह्यातील रुग्णसंख्या मात्र वाढायला सुरुवात झाली आहे. मात्र राज्यात आज एकही कोरोना बाधित रुग्णांच्या मृत्यूची नोंद झालेली नाही. त्यामुळे सध्या राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के एवढा आहे.
राज्यातील कोरोना बाधितांची संख्या आता 78,88,167 इतकी झाली आहे. तर जिल्हा आणि महानगरपालिकानिहाय रुग्णांची संख्या काही ठिकाणी वाढताना दिसून येत आहे तर काही ठिकाणची कोरोनाबाधितांचा संख्या स्थिर राहिली आहे. मात्र राज्यातील आजची कोरोना बाधितांची आकडेवारी ही वाढलेली दिसून आली आहे.
मुंबई महानगरपालिकेत 739 बाधित रुग्ण संख्या असून एकूण कोरोना बाधितांचा आकडा जास्त आहे तर ठाणे, नवी मुंबई, कल्याण डोंबवली, उल्हासनगर, भिवंडी निजामपूरमध्ये एकाही रुग्णांची नोंद झाल्याचे दिसून आले नाही.