रत्नागिरी: राज्यातील वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर आता ठाकरे सरकारने एक मोठा निर्णय घेतला आहे. त्यानुसार शिमग्याच्या उत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांसमोर विघ्न उभे राहण्याची शक्यता आहे. कारण, होळीसाठी कोकणात (Konkan Holi) येणाऱ्या चाकरमन्यांची कोरोना चाचणी (Coronavirus) केली जाणार आहे. ही चाचणी नेगेटिव्ह आली तरच चाकरमन्यांना आपल्या गावात प्रवेश मिळेल. (Coronavirus test will be mandatory for peoples going in Konkan village for Holi festival)
त्यासाठी प्रशासनाकडून जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी नाके उभारण्यात येणार आहेत. येत्या दोन ते तीन दिवसांत यासंदर्भातील आदेश काढले जातील. त्यानंतर कोकणात जाणाऱ्या नागरिकांची कोरोना टेस्ट करण्याच्या प्रक्रियेला प्रारंभ होईल, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी दिली.
गेल्यावर्षी कोरोनाचा प्रादुर्भाव शिगेला पोहोचल्यामुळे चाकरमान्यांना कोकणात येण्यासाठी बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे अनेकजण गावी जाऊ शकले नव्हते. गपणती आणि होळी हे कोकणातील दोन मोठे सण मानले जातात. होळीच्या काळात कोकणातील गावांमध्ये ग्रामदेवतेच्या पालख्या निघतात. त्यासाठी शहरातील लोक मोठ्याप्रमाणावर कोकणातील आपल्या गावी जातात.
यंदाही होळीच्या काळात कोकणात अशीच गर्दी होण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रशासनाकडून आतापासूनच योग्य ती खबरदारी घेतली जात आहे. मात्र, प्रशासनाने येत्या दोन-तीन दिवसांची डेडलाईन देण्यासाठी आता उर्वरित दिवसांमध्ये कोकणाकडे जाणाऱ्यांची गर्दी वाढण्याची शक्यता आहे.
बृहन्मुंबई महानगरपालिका क्षेत्रात मागील काही दिवसांपासून कोविड19 विषाणू बाधित रुग्णांची संख्या पुन्हा वाढत असल्याने प्रशासनाने प्रतिबंधक उपाययोजना अधिकाधिक कठोर केल्या आहेत. दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्या यांच्या तुलनेत रहिवासी इमारतीमधील रुग्ण संख्येचे प्रमाण अधिक असल्याने प्रतिबंधित निवासी इमारतीमधील उपाययोजना अतिशय कठोर केल्या जात आहेत.
केंद्रीय पथकाने देखील मागील आठवड्यात मुंबईतील एम पूर्व, एम पश्चिम, एन, एस आणि टी विभाग क्षेत्रांमध्ये दौरा करून पाहणी केली. दाट, अरुंद वस्ती आणि झोपडपट्ट्यांपेक्षा रहिवासी इमारतींमधील रुग्ण संख्या तुलनेने जास्त असल्याने अशा निवासी इमारतींमध्ये नियम मोडलेले आढळल्यास सक्त कारवाईचा बडगा उगारण्याचे निर्देश सर्व विभाग कार्यालयांना देण्यात आले आहेत. जानेवारी आणि फेब्रुवारी 2021 या दोन महिन्यात एकूण 23,002 रुग्ण महानगरपालिका क्षेत्रात आढळले. यापैकी सुमारे 90 टक्के रुग्ण हे निवासी इमारतींमध्ये राहणारे आहेत. तर उर्वरित म्हणजे सुमारे 10 टक्के हे झोपडपट्टी आणि तत्सम वस्तीत राहणारे आढळले आहेत. हा मुद्दा लक्षात घेऊन रहिवासी इमारतींमधील उपाययोजना सक्त करण्यात येत आहेत.
संबंधित बातम्या :
राज्यात 9 हजार 927 नव्या कोरोना रुग्णांची वाढ, मुंबई, पुणे, नाशिकमधील स्थिती काय?
‘त्या’ इमारतीतील कोरोना रुग्णांचा घर क्रमांक सूचना फलकावर लिहिणं बंधनकारक; पालिकेचे आदेश
मुंबईत काळजी वाढली, 90 टक्के रुग्ण रहिवासी इमारतींत, कोरोनासंबंधी संपूर्ण नियमावली एका क्लिकवर
(Coronavirus test will be mandatory for peoples going in Konkan village for Holi festival)