ब्रेक फेल नाही तर…; दादर बेस्ट बस अपघातामागचे खरं कारण समोर, आरटीओच्या तपासणीत धक्कादायक खुलासा

दादर येथील भीषण बेस्ट बस अपघाताला नवं वळण मिळालं असून, बसचे ब्रेक फेल झाले नसल्याचा खुलासा आरटीओ अहवालात करण्यात आला आहे. चालकाच्या चुकीमुळेच हा अपघात झाल्याचा प्राथमिक अंदाज आहे.

ब्रेक फेल नाही तर...; दादर बेस्ट बस अपघातामागचे खरं कारण समोर, आरटीओच्या तपासणीत धक्कादायक खुलासा
Dadar BEST Bus Accident
| Updated on: Jun 11, 2026 | 8:00 AM

मुंबईतील बेस्ट अपघाताचे प्रमाण दिवसेंदिवस वाढू लागले आहे. त्यातच काही दिवसांपूर्वी दादर येथील वीर कोतवाल उद्यानाजवळ झालेल्या भीषण बेस्ट बस अपघाताला आता एक नवे वळण मिळाले आहे. या अपघातानंतर बस चालकाने ब्रेक निकामी झाल्यामुळे नियंत्रण सुटल्याचा दावा केला होता. मात्र, ताडदेव आरटीओच्या (RTO) प्रथमदर्शनी अहवालाने हा दावा खोडून काढला आहे. आरटीओच्या अहवालानुसार, अपघातग्रस्त इलेक्ट्रिक बसचे ब्रेक्स पूर्णपणे कार्यन्वित आणि सुस्थितीत असल्याची माहिती समोर आली आहे.

आरटीओचा धक्कादायक खुलासा: नेमकं काय घडलं?

ताडदेव आरटीओ अधिकाऱ्यांनी दादरमधील अपघातग्रस्त बसची तांत्रिक तपासणी केल्यानंतर प्राथमिक अहवाल सादर केला आहे. या अहवालातील महत्त्वाचे मुद्दे समोर आले आहेत. या तपासणीत बसची मुख्य हायड्रॉलिक, इलेक्ट्रॉनिक ब्रेक यंत्रणा आणि इमर्जन्सी हँडब्रेक दोन्ही सुस्थितीत असल्याचे आढळून आले. त्यामुळे तांत्रिक बिघाड झाल्याचा चालकाचा दावा फेटाळण्यात आला आहे.

अधिकाऱ्यांनी व्यक्त केलेल्या अंदाजानुसार, हा अपघात पूर्णपणे मानवी चुकीमुळे घडला आहे. ऐनवेळी समोर आलेल्या वाहनाला पाहून चालक प्रचंड घाबरला असावा. या गडबडीत ब्रेक दाबण्याऐवजी त्याच्याकडून ॲक्सिलेटर दाबले गेले असावे, असा अंदाज आहे. या अपघाताच्या भीषणतेमुळे बसच्या समोरील भागाचे आणि अंतर्गत वायरिंगचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. मात्र, हा बिघाड अपघातापूर्वीचा नसून अपघाताच्या धडकेमुळे झाला असल्याचे स्पष्ट झाले आहे.

एका दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू, ६ जण रुग्णालयात

दादरमधील हा परिसर अत्यंत गजबजलेला असल्याने बस अनियंत्रित होताच तिने रस्त्यावरील वाहनांना चिरडले. या भीषण दुर्घटनेत एका निष्पाप दुचाकीस्वाराचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. तर इतर सहा जण गंभीररित्या जखमी झाले असून, त्यांना तातडीने जवळच्या महापालिका रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. जखमींपैकी दोघांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे.

चालकाचा परवाना कायमचा रद्द होणार?

या अपघाताची गंभीर दखल मुंबई पोलिसांनी घेतली असून चालकाविरुद्ध निष्काळजीपणाचा आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. पोलिसांचा अंतिम तपास अहवाल प्राप्त होताच, प्रादेशिक परिवहन कार्यालयाकडून (RTO) चालकाचा ड्रायव्हिंग लायसन्स (वाहन परवाना) कायमस्वरूपी रद्द केला जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले.

बसेसचा सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर

दरम्यान गेल्या काही महिन्यांत बेस्टच्या भाडेतत्त्वावरील (Wait-Lease) बसेसचे अपघात वाढल्यामुळे प्रवाशांमध्ये भीतीचे वातावरण आहे. या पार्श्वभूमीवर बेस्ट प्रशासनाने तातडीने मोठे निर्णय जाहीर केले आहेत.

या घटनेच्या सखोल चौकशीसाठी बेस्टने चार वरिष्ठ अधिकाऱ्यांची एक समिती स्थापन केली आहे. ही समिती बसचा दर्जा, चालकाची पार्श्वभूमी आणि अपघाताच्या वेळची परिस्थिती याचा अभ्यास करून ७ दिवसांत अहवाल देईल. तसेच खासगी कंत्राटदारांच्या सर्व बसेसची पुन्हा एकदा स्क्रिनिंग आणि फिटनेस चाचणी केली जाईल. त्यासोबतच कंत्राटी चालकांना आपत्कालीन परिस्थितीत मानसिक संतुलन कसे राखावे आणि इलेक्ट्रिक बसेसचे आधुनिक कंट्रोल कसे हाताळावेत, यासाठी विशेष प्रशिक्षण सक्तीचे केले जाणार आहे.

Follow Us