
शिवसेना पक्षाच्या 58 वा वर्धापन दिना दिवशी ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप नेते आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना टोला लगावला होता. पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहे की जाऊ द्या ना घरी आता वाजवले ना बारा, असं उद्धव ठाकरे म्हणाले होते. ठाकरेंच्या टीकेवर फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
पुन्हा येईन म्हणणारे आता म्हणत आहेत की जाऊ द्या घरी आता वाजवले ना बारा. आता वाजवले की बारा तुमचे. बारा वाजवले आहेत तरी सत्यानास करायचा आहे, असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं होतं. शिवसेनेच्या वर्धापन दिनाचा ठाकरे गटाचा कार्यक्रम षण्मुखानंद सबागृहात पार पडला होता. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या धागा पकडत भाजपसह फडणवीसांवर निशाणा साधला होता. यावर अमृता फडणवीस काय म्हणाल्या जाणून घ्या.
टीका करणारे करत राहतात पण आपण आपल्याला जे कर्म आहे ते करत राहायचं आहे. आपण कर्म हे कोणतेही अपेक्षा न ठेवता केलं तर सर्वांचंच चांगलं होईल, असं अमृता फडणवीस यांनी म्हटलं आहे. लोकसभा निवडणुकीमध्ये महायुतीला महाराष्ट्रात सत्तेत असूनही यश मिळालं नाही. पण महाविकास आघाडीने आपल्या जागा निवडून आणून दाखवल्या.
दरम्यान, राज्यातील दोन मोठे पक्ष राष्ट्रवादी आणि शिवसेना दोन्ही पक्षांमध्ये दोन गट तयार झालेत. त्यातील सर्वाधिक आमदार हे बंड केलेल्या गटात असून दोन्ही गट सत्तेत आहेत. मात्र महायुतीवर महाविकास आघाडी भारी पडल्याचं दिसून आलं. काही ठिकाणी तर भाजपच्या दिग्गज नेत्यांना पराभवाचा सामना करावा लागला. पंकजा मुंडे, रावसाहेब दानवे यांच्यासारख्या नेत्यांचा या निवडणुकीत पराभव झालेला आहे.