पोलीस दलातील बदल्यांची मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही, सरकारमध्ये कुरघोडीचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस

| Updated on: Jul 06, 2020 | 3:39 PM

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या प्रश्नावरुन आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे (Devendra Fadnavis on Police Transfer and CM).

पोलीस दलातील बदल्यांची मुख्यमंत्र्यांना माहितीच नाही, सरकारमध्ये कुरघोडीचे प्रयत्न : देवेंद्र फडणवीस
cm uddhav thackeray- devendra fadnavis
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पोलीस दलातील बदल्यांच्या निमित्ताने तयार झालेल्या स्थितीवरुन महाविकास आघाडी सरकारवर जोरदार टीका केली आहे (Devendra Fadnavis on Police Transfer and CM). आघाडी सरकारमध्ये कुरघोडीचा प्रयत्न सुरु आहे. त्यातूनच या बदल्यांची माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना दिलीच गेली नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्याचं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी राज्य सरकारच्या कोरोना नियंत्रणावरील कामावरही टीका केली.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “माझा जो अनुभव आहे त्या प्रमाणे पोलीस आयुक्तांच्या समितीला अंतर्गत बदलीचे अधिकार असतात. या बदल्यांबाबत आयुक्त गृहमंत्र्यांना माहिती देतात. गृहमंत्री आणि मुख्यमंत्री स्वतंत्र असताना गृहमंत्री या बदल्यांची माहिती मुख्यमंत्र्यांना देतात. यानंतर या बदल्या होतात. मात्र, या प्रकरणात आयुक्तांनी आणि गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलीच नाही. नंतर हे मुख्यमंत्र्यांच्या लक्षात आलं आणि त्यांनी या बदल्यांना स्थगिती दिली.”

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज! 

“मला वाटतं या प्रकरणात समन्वयाचा अभाव तर आहेच, मात्र, एक प्रकारचा अविश्वास देखील आहे. गृहमंत्री हे मुख्यमंत्र्यांच्या विश्वासातील असतात म्हणूनच ते मंत्री असतात. मात्र, आता जी परिस्थिती दिसते त्यावरुन गोंधळच असल्याचं दिसत आहे. या साथीच्या रोगाच्या स्थितीत गोंधळ योग्य नाही. अधिक समन्वय ठेवावा आणि विश्वासात घेऊन निर्णय घ्यावा,” असंही फडणवीस यांनी नमूद केलं.

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “ज्याला जे वाटेल ते ते करतात. कधी अधिकारी निर्णय घोषित करतात, कधी मंत्री तर कधी मुख्यमंत्री निर्णय घोषित करत आहेत. सामान्यपणे सर्व निर्णय घेण्याचे अधिकार मुख्यमंत्र्यांना असतात. त्यांनी मंत्र्यांना विश्वासात घेत निर्णय घ्यायचे असतात. मंत्र्यांनी देखील मुख्यमंत्र्यांकडून परवानगी घेऊन निर्णय घ्यायचे असतात. मात्र, इथं अविश्वासाचं वातावरण दिसत आहे आणि कुरघोडीचाही भाग आहे.”


“पोलीस आयुक्तांनी बदलीपूर्वी गृहमंत्र्यांना माहिती देणं अपेक्षित असतं आणि गृहमंत्र्यांनी याची माहिती मुख्यमंत्र्यांना देणं अपेक्षित असतं. तसेच राज्य सरकारमध्ये एकमेकांवर कुरघोडीचे प्रयत्न होत आहे. त्यातूनच  बदल्यावरुन बोलला आहे. कुरघोडीचा प्रकार वाटतोय, गृहमंत्र्यांनी मुख्यमंत्र्यांना या बदल्यांची माहिती दिलेली दिसत नाही त्यामुळेच मुख्यमंत्र्यांनी या बदल्या थांबवल्या,” असंही फडणवीस म्हणाले.

“महापालिकांकडे पैसे नाही, नातेवाईकांना 2-3 दिवस रुग्ण सापडत नाही हे धक्कादायक”

कोरोना रुग्ण दाखल होऊन 2-3 दिवस होतात तरी त्यांना आपला रुग्ण कोठे आहे हे कळत नाही ही स्थिती धक्कादायक आहे, असं मत देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. यावेळी त्यांनी महानगरपालिकांकडे पैसे नसल्याचाही मुद्दा उपस्थित केला. देवेंद्र फडणवीस, “ठाण्यात गायकवाड आणि खान नावाच्या रुग्णांचे नातेवाईक भेटले. त्यांना त्यांचा रुग्णच मिळत नाही. उपचारासाठी आणलेला आपला रुग्ण 2-3 दिवस नातेवाईकांना कुठं आहे हे कळत नसेल, तर हे धक्कादायक आहे. रुग्णांवर उपचार होत नाही अशाही तक्रारी आहेत. रुग्णांचं जिओ ट्रेकिंग केलं पाहिजे. पनवेलला व्हेंटिलेटरची गरज आहे. नवी मुंबईमध्ये नॉन कोविड रुग्णांची व्यवस्था नाही. उल्हासनगरमध्ये आयसीयू बेड नाहीत. तेथे रुग्ण वाढत आहेत. आगामी काळात या ठिकाणांवर समस्या वाढणार आहेत.”

“ठाणे जिल्ह्यामधील रुग्णसंख्या मुंबईच्याही पुढे”

“ठाणे जिल्ह्यामधील रुग्णसंख्या मुंबईच्याही पुढे गेली आहे. चाचण्याची संख्या खूप कमी आहे. ठाण्यात मुलभूत सुविधा चांगल्या आहेत. मात्र, तेथे डॉक्टरच नाहीत. मुंबईमध्ये साडेचार हजार चाचण्या केल्या जात आहेत. 60 टक्के रुग्ण मुंबई आणि एम. एम. आर. क्षेत्रात आहेत. 73 टक्के मृत्यू मुंबई आणि एमएमआर क्षेत्रात होत आहेत. एकूण संपूर्ण यंत्रणेचा समन्वय नाही, त्यात मोठी कमतरता आहे. टेस्टिंगचे रिपोर्ट वेळेवर येत नाहीत. रिपोर्ट उशिरा आल्यामुळे रुग्णांची स्थिती गंभीर होत आहे. कोरोना चाचणीचे रिपोर्ट 24 तासाच्या आत आले पाहिजे. लक्षणं असलेल्या रुग्णांवर कोरोना रुग्ण समजूनच उपचार केले पाहिजे. रिपोर्ट येण्याची वाट पाहू नये. जेव्हा रिपोर्ट येईल तेव्हा पुढील निर्णय घ्यावा. यामुळे मृत्यूंचं प्रमाण कमी करता येईल,” असंही फडणवीस म्हणाले.

“महापालिकांकडे पैसेच नाहीत, खासगी रुग्णालयांची लूट सुरु”

देवेंद्र फडणवीस म्हणाले, “जून महिन्याचा मृत्यू दर बऱ्याच ठिकाणी 24 टक्क्याने जास्त आहे. लॉकडाऊन शिथिल केल्यानंतर मृत्यूचा दर वाढला आहे. हे चुकीच्या पद्धतीने काम सुरु आहे. काही महापालिका सोडल्या तर महापालिकेकडे आरोग्य व्यवस्थाच नाहीत. त्यासाठी आर्थिक मदत केली पाहिजे. सर्व व्यवस्था महापालिकेने केली पाहिजे ही लोकांची अपेक्षा आहे. मात्र, महापालिकांकडे पैसेच नाहीत. खासगी रुग्णालयांची लूट सुरु आहे. त्यांचं ऑडिट झालं पाहिजे. सरकारी हॉस्पिटलमध्ये जागा नाही आणि खासगी रुग्णालय उपचार देत नाहीत, अशी परिस्थिती आहे.”

हेही वाचा :

मी ओबीसी म्हणून आरोपीच्या पिंजऱ्यात, मराठा मोर्चाच्या राजीनाम्याच्या मागणीवर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया

मराठा क्रांती मोर्चा आक्रमक, महाविकास आघाडीतील पहिल्या मंत्र्याच्या राजीनाम्याची मागणी

LIVE: गृहमंत्री अनिल देशमुख संध्याकाळी उद्धव ठाकरेंची भेट घेणार

Devendra Fadnavis on Police Transfer and CM