Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन् आपला खोटारडेपणा बंद करावा, देवेंद्र फडणवीसांची टीका

भाजपाशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. गुजरात, दमण दीव, गोवा या आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये पेट्रोल तब्बल 15 रुपयांनी कमी आहे. त्यामुळे राज्य सरकारने पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी करावेत, अशी मागणी देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे.

Devendra Fadnavis : पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करून जनतेला दिलासा द्यावा अन् आपला खोटारडेपणा बंद करावा, देवेंद्र फडणवीसांची टीका
Image Credit source: tv9
| Updated on: Apr 29, 2022 | 3:14 PM

मुंबई : महाविकास आघाडी (Mahavikas aghadi) सरकारने बहाणेबाजी न करता पेट्रोल-डिझेलवरचा व्हॅट कमी करून महाराष्ट्रातील जनतेला दिलासा दिला पाहिजे आणि आपला खोटारडेपणा बंद केला पाहिजे, अशी टीका भाजपा नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. ते मुंबईत बोलत होते. पेट्रोल-डिझेल दरावरून त्यांनी राज्य सरकारवर टीकास्त्र सोडले. ते म्हणाले, की राज्य सरकारचा याबाबत दृष्टीकोन अत्यंत लघु आहे. त्यांना केंद्रीय पेट्रोलियम मंत्र्यांनी उघडे पाडले आहे. एक लाख 20 हजार कोटी रुपये व्हॅटच्या रुपाने सरकारने कमावले. आता दराचा विषय आला तेव्हा केंद्रावर ढकलले जात आहे, अशी टीका त्यांनी केली. कोळसाटंचाई (Coal) तसेच केंद्राकडून योग्य सहकार्य मिळत नसल्याची टीका महाविकास आघाडीतील नेत्यांनी केली, त्या पार्श्वभूमीवर देवेंद्र फडणवीसांनी महाविकास आघाडीवर तोंडसुख घेत केंद्राची जबाबदारी झटकली आहे.

‘शेजारच्या राज्यांत दर कमी’

देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडीवर टीका करताना म्हटले, की भाजपाशासित सर्व राज्यांनी पेट्रोल-डिझेलचे दर कमी केले. गुजरात, दमण दीव, गोवा या आपल्या शेजारच्या राज्यांमध्ये पेट्रोल तब्बल 15 रुपयांनी कमी आहे. जीएसटीचे पैसे मिळाले नाहीत, अशी ओरड राज्य सरकार करत आहे. मात्र या पैशांबाबत वित्त राज्यमंत्र्यांनी हा दावा किती खोटा आहे, हे सांगितले आहे. जुलै-ऑगस्टपर्यंत ते पैसे देण्याचे ठरवले आहे. त्यामुळे राज्य सरकारने बहाणेबाजी करू नये. जनतेला दिलासा द्यावा, असे ते म्हणाले.

‘युतीच्या बातम्या कपोलकल्पित’

काही लोकांनी सोडलेल्या या बातम्या आहेत. आमची अजून अधिकृत चर्चाही झालेली नाही. तसा प्रस्तावही नाही. मात्र अलिकडच्या काळात राज ठाकरेंनी मांडलेल्या भूमिका भाजपाशी सहमत असलेल्या आहेत. मात्र तरीदेखील आमची कोणतीही चर्चा झालेली नाही. सध्या या विषयावर बोलणे उचित नाही, असे ते म्हणाले. तर दुसरीकडे 2017ला भाजपा-राष्ट्रवादी युती होणार होती, या गौप्यस्फोटावर जो बीत गयी वो बात गयी, असे म्हणत प्रश्नाचे उत्तर देणे टाळले.