जागते रहो… मुंबईसाठी पुढचे 3 तास रेड अलर्टचे, अतिमुसळधार पावसाचा इशारा, हेल्पलाईन नंबरही जारी
Mumbai Rain Helpline No : मुंबईकरांवरील पावसाचे संकट अजून टळलेले नाही, कारण हवामान विभागाकडून पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे प्रशासनाकडून हेल्पलाईन नंबरही जारी करण्यात आला आहे.

मुंबईत आज सकाळपासून मुसळधार पाऊस कोसळत आहे. अनेक ठिकाणी पाणी साचले असून नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे. अशातच आता मुंबईकरांवरील पावसाचे संकट अजून टळलेले नाही, कारण हवामान विभागाकडून पुढचे तीन तास मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. त्यामुळे नागरिकांनी योग्य ती खबरदारी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी पावसाबाबत महत्त्वाची माहिती दिली आहे. याबाबत सविस्तर माहिती जाणून घेऊयात.
पावसाबाबत हेल्पलाईन नंबर जारी
पुढील 3 तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर आणि ठाणे जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा शक्यता वर्तवण्यात आली आहे. यावर बोलताना मुंबईच्या महापौर रितू तावडे यांनी म्हटले की, पुढचे तीन तास पावसाचा रेड अलर्ट आहे. आपात्कालीन नंबर जारी करण्यात आलेलं आहे. 196 हा आपात्कालीन कक्षाचा नंबर आहे. मुसळधार पाऊस पडत आहे, त्यामुळे काम असेल तरच बाहेर पडा, पावसाचा आनंद जपून घ्या, काळजी घ्या.
जोगेश्वरी पश्चिमेत झाड कोसळले
जोगेश्वरी पश्चिम येथील ए.सी. रोडवर मुसळधार पावसादरम्यान एक मोठे झाड अचानक कोसळले. झाड पडल्याने रस्त्याच्या कडेला उभा असलेला टेम्पो त्याखाली सापडला आणि पूर्णपणे दबला गेला. या दुर्घटनेत जवळच असलेला वीज मीटर बॉक्सही खराब झाला. घटनेनंतर परिसरात काही काळ गोंधळाचे वातावरण निर्माण झाले होते. सध्या कोणतीही जीवितहानी झाल्याची माहिती नाही. माहिती मिळताच संबंधित यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या आणि झाड हटवून वाहतूक सुरळीत करण्याचे काम सुरू केले. सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचे आणि झाडांजवळ तसेच कमकुवत संरचनांजवळ विनाकारण उभे न राहण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
अंधेरी : मरोळमध्ये झाड कोसळले.
अंधेरीतील मरोळ रोडजवळ एका गाडीवर मोठे झाड कोसळले. या घटनेत दोन ते तीन गाड्यांचे नुकसान झाले आहे. सध्या कोणालाही दुखापत झाल्याची माहिती नाही.घटनेनंतर शिवसेना आमदार मुरजी पटेल यांनी हा मुद्दा विधानसभेत उपस्थित केला आहे.
मुंबईत अनेक ठिकाणी साचले पाणी
सकाळपासून सुरू असलेल्या पावसामुळे घाटकोपरमधील एलबीएस रोडवर रस्त्याला तळ्याचे स्वरुप आले आहे. यामुळे विक्रोळीपासून घाटकोपरच्या दिशेने जाणारी वाहतूक विस्कळीत झाली आहे. तसेच वरळी कोळीवाड्यातही पावसामुळे पाणी साचलं आहे, त्यामुळे नागरिकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
वाहतूक मंदावली
मुंबई जोरदार पावसाला सुरुवात झाली आहे, शहराला पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. पावसामुळे बोरिवली कडून मुंबईच्या दिशेने जाणाऱ्या गाड्यांची वाहतूक मंदावली आहे, तर मुंबईकडून बोरिवलीकडे जाणारी वाहतूक सुरळीत सुरू आहे. सध्या वाहतुकीवर मोठा परिणाम झाला नसला तरी वाहनचालकांना त्रासाचा सामना करावा लागत आहे.
