VIDEO | देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार

| Updated on: Sep 30, 2021 | 11:02 PM

मी यापूर्वी आकड्यासह सांगितले, यूपीए सरकारने 15 वर्षात जेवढे पैसे राज्याला दिले नाही त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकारने आपत्तीत राज्याला दिले, असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला.

VIDEO | देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार
Follow us on

मुंबई : विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस शनिवारपासून नुकसानग्रस्त भागाचा दौरा करणार आहेत. याबाबत फडणवीस यांनी मीडियाशी संवाद साधला. नुकसानग्रस्त भागाला तातडीची मदत करणे गरजेचे आहे. सरकार आपल्या पाठिशी आहे असा दिलासा मिळेल असं सरकारने काही केलं पाहिजे, असे देवेंद्र फडणवीस यावेळी म्हणाले. मागील पुरात सरकारने मदत केली नाही. पश्चिम महाराष्ट्र, कोकणात मदत केली पाहिजे. मी यापूर्वी आकड्यासह सांगितले, यूपीए सरकारने 15 वर्षात जेवढे पैसे राज्याला दिले नाही त्यापेक्षा जास्त पैसे मोदी सरकारने आपत्तीत राज्याला दिले, असा दावाही यावेळी फडणवीस यांनी केला. (Devendra Fadnavis will tour the damaged area from Saturday)

जलयुक्त शिवारला तज्ज्ञांनी म्हटलंय असं नाही. उच्च न्यायालयाने एक समिती नेमली होती त्यात तज्ज्ञ होते. त्या समितीने उच्च न्यायालयास रिपोर्ट दिला, तो उच्च न्यायालयाने स्वीकारला. एखाद दुसरा व्यक्ती काय बोलतोय त्याला महत्त्व नाही. उलट जलयुक्त शिवारमुळे जे नदी नाल्यांचे खोलीकरण केले त्यामुळे शेती, घरात पाणी कमी गेले अन्यथा यापेक्षा जास्त पाणी गेले असते. हे सरकार वेळकाढूपणा करते बोटचेपेपणा करतंय. सावित्रीबाई फुले नावाबद्दल मला माहिती नाही, असेही फडणवीस यांनी सांगितले.

अतिवृष्टीमुळे 14 दिवसांत 34 जणांचा मृत्यू

बदललेल्या हवामानामुळे मराठवाड्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये पावसाने कहर केला आहे. परभणी, नांदेड, बीडमध्ये (Parbhani, Nanded, Beed) पावसाने थैमान घातले होते. त्यामुळे अनेक जलसिंचन प्रकल्प पूर्णपणे भरल्याने त्यातून पाण्याचा विसर्ग सुरु आहे. परभणी, हिंगोली, बीड, नांदेडमधील महत्त्वाची धरणे भरली असून त्यातूनही मोठ्या प्रमाणावर पाणी नदीपात्रात सोडले जात आहे. त्यामुळे नदीकाठच्या परिसराला पूरस्थितीचा सामना करावा लागत आहे. सप्टेंबर महिन्यातील मुसळधार पावसाचा मराठवाड्याला सर्वाधिक फटका बसला. एक ते 14 सप्टेंबर या कालावधीत 34 जणांचा जीव गेला. तसेच लहान-मोठ्या अशा 414 दुधाळ जनावरांचा तसेच 3430 कोंबड्या आणि मोठ्या 18 जनावरांचा मृत्यू झाला. सगळ्यात जास्त मनुष्यहानी नांदेड जिल्ह्यात झाली.

मराठवाड्याला शाहीनचा धोका, आणखी चिंतेची बाब

मराठवाड्यासह महाराष्ट्राच्या अनेक भागांत सध्या महापूर, अतिवृष्टीने हाहाकार उडवला आहे. ही आपत्ती ज्या ‘गुलाब’ चक्रीवादळामुळे कोसळली ते आता थंडावले आहे. मात्र त्यामुळे महाराष्ट्रावर मुसळधार पावसाचे संकट कोसळले आणि त्यात शेती, पिकांचे व्हायचे ते नुकसान झालेच आहे. पुन्हा या वादळाचे रूपांतर ‘शाहीन’ या चक्रीवादळात होण्याचा आणि त्यामुळे आणखी काही काळ महाराष्ट्राला अतिवृष्टीचा धोका असल्याचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. हा धोका मराठवाड्याला जास्त सांगितला जात आहे. ही आणखी चिंतेची बाब आहे.

पाण्यासाठी वणवण करणाऱ्या मराठवाड्यात ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती

मुळात संपूर्ण सप्टेंबर महिना महाराष्ट्र अतिवृष्टी, ढगफुटी, महापूर अशाच संकटांखाली भरडला गेला आहे. ‘गुलाब’ चक्रीवादळ महाराष्ट्रावर ‘निसर्ग’ किंवा ‘तौकते’ चक्रीवादळाप्रमाणे थेट धडकले नाही तर त्याने अतिवृष्टीचा जो तडाखा दिला आहे तो महाभयंकरच आहे. मुंबई, ठाणे, कोकणसह मराठवाडा, विदर्भ, उत्तर महाराष्ट्र, खान्देश अशा सर्वच भागांत या तडाख्याने होत्याचे नव्हते करून टाकले आहे. मराठवाड्यात तर ‘पाणीच पाणी चहूकडे’ अशी स्थिती आहे.

धरणे ओव्हरफ्लो, नद्या कोपल्या, गावे जलमय, तलाव-बंधारे फुटले, ठिकठिकाणी महापूर, पूल, रस्ते आणि शेतीही पाण्याखाली असे भयंकर चित्र मराठवाड्यात जागोजागी दिसत आहे. एरवी पाण्यासाठी आसुसलेल्या आणि दुष्काळी म्हटल्या जाणाऱ्या मराठवाड्याचे हे दुसरे रूप थरकाप उडविणारे आणि काळजी वाढविणारे आहे.

गोदाकाठला इशारा, आभाळ फाटल्यासारखी स्थिती

मराठवाड्यातील जवळपास प्रत्येक धरण, बंधारा ‘ओव्हरफ्लो’ झाला आहे. ऑगस्ट महिन्यात 60-70 टक्के भरलेल्या जायकवाडी धरणाचे 27 पैकी 18 दरवाजे प्रत्येकी 6 इंच उघडण्याची वेळ या अतिवृष्टीने आली आहे. त्यामुळे प्रतिसेकंद 10 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग गोदावरीच्या पात्रात होत आहे. आधीच गोदावरी अतिवृष्टीने तुडुंब भरलेली; त्यात पाण्याचा हा विसर्ग! म्हणजे गोदाकाठचा संपूर्ण परिसर आणखी काही काळ धोक्याच्या इशाऱ्यातच राहणार हे उघड आहे. निसर्गाची लहर म्हणा किंवा ‘गुलाब’, ‘शाहीन’सारख्या चक्रीवादळामुळे आलेली आपत्ती म्हणा, महाराष्ट्रावर सध्या ‘जलसंकट’च कोसळले आहे. (Devendra Fadnavis will tour the damaged area from Saturday)