Dilip Walse Patil: स्थानिक पातळीवरचा प्रश्न राज्यस्तरावरचा करू नका; दिलीप वळसे पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करतात. एका लहान मोठ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर महाविकास आघाडीत गडबड आहे असं म्हणण्याचं कारण नाही.

Dilip Walse Patil: स्थानिक पातळीवरचा प्रश्न राज्यस्तरावरचा करू नका; दिलीप वळसे पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला
दिलीप वळसे पाटलांचा नाना पटोलेंना सल्ला
Image Credit source: tv9 marathi
| Edited By: | Updated on: May 17, 2022 | 1:19 PM

मुंबई: काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी (sonia gandhi) यांच्याकडे राष्ट्रवादीची तक्रार केली. त्यामुळे आघाडीत अलबेल नसल्याचं दिसून आलं आहे. मात्र, राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील (Dilip Walse Patil) यांनी आघाडीत बिघाडी असल्याच्या वृत्ताचा इन्कार केला आहे. तसेच स्थानिक पातळीवरचा प्रश्न राज्य स्तरावरचा करू नका, असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी पटोले यांना दिला आहे. त्यांनी त्यांच्या पक्षाच्या नेत्याकडे तक्रार केली असेल तर आमचे वरिष्ठ नेते बसून निर्णय घेतील. गोंदिया आणि भंडाऱ्यात जे काही घडलं तो स्थानिक प्रश्न आहे. स्थानिक लेव्हलाच प्रश्न आहे. स्थानिक लेव्हलला ते निर्णय घेतले गेले. हा राज्य लेव्हलाच इश्यू करण्याची गरज नाही. पटोले हे पक्षाचे अध्यक्ष आहेत. त्यांनीही जबाबदारी आणि समजदारीने भूमिका स्वीकारली पाहिजे. आपला शत्रू कोण आहे ते ओळखलं पाहिजे, असा सल्ला दिलीप वळसे पाटील यांनी दिला आहे.

दिलीप वळसे पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी ते बोलत होते. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेना हे तिन्ही पक्ष एकत्रित काम करतात. एका लहान मोठ्या प्रश्नावरून मतभेद झाला तर महाविकास आघाडीत गडबड आहे असं म्हणण्याचं कारण नाही. त्यांनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या असतील. आपल्याला भाजप विरोधात लढायचं आहे. त्यामुळे एकत्रित राहूनच काम केलं पाहिजे. हेच आम्हाला अपेक्षित आहे, असं दिलीप वळसे पाटील यांनी सांगितलं.

वरिष्ठ नेते निर्णय घेतील

दरम्यान, राज्यसभेच्या निवडणुकीवर त्यांनी भाष्य करण्यास नकार दिला. हा वरिष्ठ पातळीवरचा निर्णय आहे. वरिष्ठ नेते निर्णय घेतील. त्यावर मला काही म्हणायचं नाही. भाजपला टक्कर देण्यासाठी एक समर्थ पक्ष राष्ट्रीय स्तरावर असावा. पण तसं दिसत नाही. त्यामुळे भाजप विरोधी काम करणाऱ्या पक्षांनी एकत्र आलं पाहिजे आणि निवडणुका लढल्या पाहिजे, असं मत त्यांनी व्यक्त केलं.

निर्बंध नको, पण वॉच हवा

सोशल मीडियावर आक्षेपार्ह पोस्ट टाकल्या जात आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर निर्बंध आणले पाहिजे का? असा सवाल त्यांना करण्यात आला. दिलीप वळसे पाटील यांनी मात्र, अशा प्रकारच्या निर्बंधांना नकार दिला. सोशल मीडियावर निर्बंध घातले पाहिजे असं मी म्हणणार नाही. पोस्ट करणाऱ्यांनीच संयम ठेवला पाहिजे. मात्र, सोशल मीडियाला रेग्युलेट करणारी यंत्रणा असली पाहिजे. निर्बंध घालणं म्हणजे पूर्ण बंद करणे असं मी समजतो. तसं होऊ नये. पण सोशल मीडियावर वॉच हवा, असं मत त्यांनी व्यक्त केलं. सायबर सेल अशा गोष्टींकडे लक्ष देत असते. ते त्यांचं काम आहे. ते त्यावर कारवाई करतात, असंही त्यांनी स्पष्ट केलं.