
श्रावणात चिकन, मांस, अंडी अनेकांसाठी वर्ज्य असते. त्यामुळे अनेक जण श्रावणापूर्वीच त्यावर तुटून पडतात. एक महिना श्रावण पाळावा लागत असल्याने अनेक जण ऐन आषाढातच चंगळ करतात. पण अंडी प्रेमींची चिंता वाढली आहे, कारण अचानक अंड्यांचे भाव वधारले आहेत. उन्हाळ्यात धाराशीव, लातूरसह काही जिल्ह्यात कोंबड्यांना बर्ड फ्लूची लागण झाल्याने अनेक कोंबड्यांची शास्त्रीय पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आली. एकीकडे मागणी जास्त आणि उत्पादनावर परिणाम या व्यस्त प्रमाणामुळे अंड्यांचा भाव वधारला आहे. आषाढातच अंड्यांसाठी ग्राहकांच्या खिशावर बोजा पडला आहे. 12 नग अंडीसाठी आता जादा पैसा मोजावे लागत आहे. किती वाढली किंमत?
राज्यात अंडे महागले
श्रावण आल्याने आता उन्हाळा संपल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. तर दुसरीकडे अंड्यांच्या दरात विक्रमी वाढ झाली आहे. किरकोळ बाजारात दर ७८ ते ९० रुपये डझनपर्यंत पोहोचले आहेत. मार्चमध्ये मुंबईत १०० अंडींसाठी घाऊक दर ४७० रुपये होता, तो जूनच्या अखेरीस ५९१ रुपये इतका झाला आहे.
अधिक उष्म्यामुळे पक्ष्यांच्या मृत्यूमुळे उत्पादन घटले आणि पावसाळ्यात वाहतुकीतील अडथळ्यांमुळे पुरवठा साखळी विस्कळीत झाली, असे पोल्ट्री व्यवसायिकांचे म्हणणे आहे. लोखंडवाला येथे अंडी ९० रुपये, वांद्रे आणि बोरीवलीत ८० रुपये, तर वसईत ७८ रुपय दराने विकली जात आहेत. ऑनलाइन खरेदीदारांना चेंबूर आणि कांजुरमार्ग येथे ११७ रुपये डझन दर मोजावा लागत आहे. सहा ‘स्पेशल अंडी’च्या बॉक्सची किंमत ५७ रुपये अथवा त्यापेक्षा अधिक आहे.
ब्रेडकाफ्टचे सुरेश पासवान म्हणाले, “उन्हाळ्यात उष्म्यामुळे पक्षी मरतात, त्यामुळे उत्पादनात घट होते. नवीन पिल्लांना मोठं होण्यासाठी वेळ लागतो आणि सुरुवातीला लहान अंडी मिळतात.” ते म्हणाले की, १५-२० दिवसांनी दर कमी होण्याची शक्यता आहे. पुण्यात अंड्याचा दर १५ दिवसांत ६६ वरून ८४ रुपयांपर्यंत पोहोचले आहेत. एनईसीसीनुसार जून २०२५ मध्ये दर पाच वर्षांत सर्वोच्च पातळीवर आहे. त्यामुळे ग्राहकांच्या खिशाला भुर्दंड बसला आहे. इतकेच नाही तर अंडा भुर्जी आणि इतर खाद्यपदार्थासाठी सुद्धा ग्राहकांना जास्त पैसा मोजावा लागणार आहे.