BJP : शिंदेंचं ट्विट, सुप्रीम कोर्टात सुनावणी, आदित्य, राऊतांचे मेळावे, फडणवीसांच्या घरी भाजपाची लगबग, नेमका प्लॅन काय शिजतोय?

| Updated on: Jun 27, 2022 | 12:15 PM

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यात भाजपा नेत्यांची गर्दी वाढायला लागली आहे. नेमका काय प्लॅन शिजत आहे, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे.

BJP : शिंदेंचं ट्विट, सुप्रीम कोर्टात सुनावणी, आदित्य, राऊतांचे मेळावे, फडणवीसांच्या घरी भाजपाची लगबग, नेमका प्लॅन काय शिजतोय?
एकनाथ शिंदे (संपादित छायाचित्र)
Image Credit source: Twitter
Follow us on

मुंबई : शिवसेनेचे बंडखोर नेते एकनाथ शिंदे (Eknath Shinde) ट्विटवर ट्विट करत महाविकास आघाडी आणि शिवसेनेला आव्हान देत आहेत. आताच्या शेवटच्या वृत्तानुसार बंडखोर 38 आमदारांनी महाविकास आघाडी सरकारचा (Mahavikas Aghadi Government) पाठिंबा काढल्याचे पत्र दिल्याचा दावा शिंदे गटाकडून करण्यात येत आहे. या सगळ्या राजकीय घडामोडीत विरोधी पक्ष असलेल्या भाजपात मात्र खलबते सुरू आहे. विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्या सागर बंगल्यात भाजपा नेत्यांची गर्दी वाढायला लागली आहे. नेमका काय प्लॅन शिजत आहे, याविषयी तर्कवितर्कांना उधाण आले आहे. सध्या एकनाथ शिंदे आणि शिवसेना यांच्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात सुनावणी सुरू आहे. आधी ती साडे दहाला होणार होती, आता त्याची वेळ थोडी पुढे ढकलण्यात आली आहे. मात्र काही वेळानंतर चित्र स्पष्ट होणार आहे.

एकनाथ शिंदेंच्या तोंडून भाजपाची भाषा

एकनाथ शिंदेंचे काही वेळापूर्वीचे ट्विट पाहिल्यास भाजपा ज्याप्रमाणे शिवसेनेवर टीका करत आहे, तीच भाषा एकनाथ शिंदे वापरत असल्याचे स्पष्ट दिसत आहे. त्यांनी छगन भुजबळ, नवाब मलिक यांच्यासह राष्ट्रवादीवर टीका केली. त्यांनी म्हटले आहे, की हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांना अटक करणाऱ्या छगन भुजबळ यांच्यासोबत मांडीला मांडी लावून मंत्रिमंडळात बसताना आपल्याला काहीच यातना होत नाहीत का? असा सवाल शिवसेनेचे माजी आमदार सुभाष साबणे यांनी मुख्यमंत्री तथा शिवसेनापक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे साहेबांना विचारला आहे.

हे सुद्धा वाचा

‘दाऊदशी संबंध असणाऱ्यांचे समर्थन’

तर बाळासाहेब ठाकरे यांना अटक केल्यानंतर याबाबत विधानसभेत जाब विचारणाऱ्या साबणे यांना वर्षभरासाठी निलंबित करण्यात आले होते, असे ट्विट एकनाथ शिंदे यांनी केले. आणखी एका ट्विटमध्ये त्यांनी म्हटले आहे, की मुंबई बाँबस्फोट घडवून निष्पाप मुंबईकरांचा जीव घेणाऱ्या दाऊदशी थेट संबंध असणाऱ्यांना हिंदुहृदयसम्राट वंदनीय बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना समर्थन कशी करू शकते…? असा सवाल करत यालाच विरोध म्हणून उचललेले हे पाऊल; आम्हा सर्वांना मृत्यूच्या दारात घेऊन गेले तरी बेहत्तर.., असे ट्विटमध्ये त्यांनी म्हटले होते.

भाजपाची खलबते

विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांच्या मुंबईतील सागर बंगल्यात भाजपाच्या नेत्यांची गर्दी वाढायला लागली आहे. दोन-तीन दिवसांत आमचेच सरकार येणार आहे, असे वक्तव्य रावसाहेब दानवे यांनी केले होते. त्या पार्श्वभूमीवर भाजपाचा नेमका प्लॅक काय, विषयी तर्क लढवले जात आहेत. या संपूर्ण प्रकरणी अद्याप देवेंद्र फडणवीस यांनी काहीही प्रतिक्रिया दिलेली नाही. त्यांच्या केवळ दिल्ली वाऱ्या सुरू आहेत. तर दुसरीकडे संजय राऊत, आदित्य ठाकरे यांचे मेळावे जोरात सुरू आहेत. बंडखोरांना परत येण्याचे आवाहन करतानाच त्यांच्याविषयी आक्रमक भाषाही शिवसेनेकडून वापरली जात आहे.