Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video

राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

Tv9 मराठीचा स्पेशल रिपोर्ट | अवकाळी पावसाने तोंडचा घास पळवला, पंचनामे कधी, मदत कधी? Video
| Updated on: Mar 11, 2023 | 11:54 PM

मुंबई : अवकाळी पावसानं शेतकऱ्यांच्या तोंडचा घास हिरावलाय. द्राक्षबागा आडव्या झाल्या आहेत. पपई, केळीचंही मोठं नुकसान झालंय. पण राज्यातल्या काही जिल्ह्यात मात्र अद्याप पंचनाम्यांनाच सुरुवात झालेली नाही. त्यामुळं शेतकऱ्याला मदत कधी मिळणार हाच प्रश्न निर्माण झालाय.

एकीकडे शेतमालाला कमी भाव मिळत असल्यानं शेतकरी अडचणीत आलाय आणि दुसरीकडे तो अवकाळीच्या फेऱ्यातही सापडलाय. अवकाळी पावसानं नाशिक जिल्ह्यातल्या जवळपास 4 हजार हेक्टरवरील पिकांचं नुकसान झालंय. नाशिक जिल्ह्यातल्या निफाड तालुक्यातलं चांदोरी गावातील नितीन हिंगोले नावाचे शेतकरी पिढ्यानपिढ्या द्राक्षाची शेती करतात. पण यंदा त्यांचं द्राक्षाचं पीक अवकाळीने हिरावून नेलंय

जिथं प्रतिकिलो 60 ते 70 रुपये इतका भाव मिळाला असता, तिथं हा माल अवघ्या 10 रुपये किलोने विकण्याची वेळ त्यांच्यावर आलीय. अशीच काही परिस्थिती राहूल हिंगोले यांची देखील आहे. गेल्या वर्षी देखील द्राक्ष पिकाचं नुकसान झाल्याने सरकारने पंचनामा करण्याचे आदेश दिले होते. मात्र गेल्यावर्षीची देखील मदत त्यांना अजून मिळाली नाही.

अवकाळी पावसाने द्राक्षमण्यांना तडे गेले आहेत. द्राक्ष माल अक्षरश: सडला आहे. अवकाळी पावसामुळं नुकसान झालेल्या शेतीचे पंचनामे कुठे सुरु झालेयत. तर कुठे अद्यापही प्रशासन बांधावर पोहोचलेलं नाही. अहमदनगर, धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यात पंचनाम्यांना सुरुवात झालीय. तर नाशिक, जळगाव, सांगलीत पंचनामे सुरु झालेले नाहीत..

नंदुरबार जिल्ह्यात अवकाळी पावसानं सतराशे हेक्टर क्षेत्राचं नुकसान झालंय. सर्वाधिक नुकसान रब्बी हंगामातील गहू आणि ज्वारीचं झालंय. पपई आणि केळीचं पीकही शेतकऱ्याच्या हातचं गेलंय. आसमानी संकटात शेतकरी भरडलाय. जीवतोड मेहनत करुन फुलवलेली शेती मातीमोल झालीय.. त्यामुळं सरकारनं लवकरात लवकर पंचनामे करुन शेतकऱ्याला मदत देणं गरजेचं झालंय.