आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल, भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीचं प्रकरण, एका एसीपीविरोधातही एफआयआर

| Updated on: Dec 11, 2021 | 10:48 AM

आणि आता मुंबई क्राईम ब्रँचनं रेश्मा खान, देवेन भारती आणि दीपक फटांगरे (Deepak Phatangre) यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आधी सांगितल्याप्रमाणे रेश्मा खान फरार आहे.

आयपीएस देवेन भारतीविरोधात गुन्हा दाखल, भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीचं प्रकरण, एका एसीपीविरोधातही एफआयआर
अप्पर पोलीस महासंचालक देवेन भारती यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Follow us on

अप्पर पोलीस महासंचालक आणि सीनिअर आयपीएस देवेन भारती (IPS Deven Bharti) यांच्या अडचणीत वाढ झालीय. कारण भारतींसह दोन पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करण्यात आलाय. एका भाजप नेत्याच्या बांगलादेशी पत्नीविरोधातलं बोगस पासपोर्टचं हे प्रकरण आहे. विशेष म्हणजे तक्रार एका माजी पोलीस निरिक्षकाने केलेली होती आणि त्याच्याच पाठपुराव्यानंतर आता एफआयआर दाखल करण्यात आलाय. याच प्रकरणात ज्या इतर एका पोलीस अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल झालाय, त्यात एसीपी दीपक फटांगरे यांचा समावेश आहे.

नेमकं प्रकरण काय आहे?
भाजपच्या नेते आहेत हाजी हैदर आजम. ते भाजपच्या मौलाना आझाद मायनॉरीटी आर्थिक विकास महामंडळाचे उपाध्यक्ष आहेत. त्यांच्या पत्नीचं नाव आहे रेश्मा खान. ती सुद्धा बनावट पासपोर्ट प्रकरणी आरोपी असून फरार आहे. 2017 साली मुंबईत रहाणाऱ्या बांगलादेशींविरोधात पोलीसांनी एक मोहीम हाती घेतली होती. त्याच दरम्यान रेश्मा खाननं जे कागदपत्रं देऊन पासपोर्ट मिळवला ते बोगस असल्याचं दिसून आलं. रेश्मा खानचा जन्मदाखला, आधार अशा इतर कागदपत्रांच्या पडताळणीसाठी स्पेशल ब्रँचनं पश्चिम बंगाल सरकारकडे रितसर चौकशी केली. त्यासाठी तीन पोलीस बंगालला जाऊन आले. कारण रेश्मा खानचे सर्व कागदपत्रे ही 24 परगना जिल्ह्यातली होती. पण तिच्या कागदपत्रात काही तरी घोळ असल्याचं तपासाअंती सिद्ध झालं. तिच्यावर बनावट कागदपत्र सादर करुन भारतीय पासपोर्ट मिळवल्याचा ठपका ठेवला गेला. आणि रितसर कारवाई करावी म्हणून त्यावेळेस मालवणी पोलीस स्टेशनला सांगण्यात आलं. मालवणी पोलीस ठाण्याचा चार्ज त्यावेळेस दीपक फटांगरे यांच्याकडे होता तर दीपक कुरुळकर यांच्याकडे स्पेशल ब्रँचचा. दीपक कुरुळकर यांनीच फटांगरेंना रेश्मा खानवर कारवाई करण्याचे निर्देश दिले. पण फटांगरेंनी त्याला नकार दिला. तसं करण्याचेच आदेश देवेन भारती यांनी दिल्याचा दावा फटांगरेंनी केला. भारती त्यावेळेस मुंबई ज्वाईंट सीपी होते कायदा आणि सुव्यवस्थेचे. कुरुळकर तेवढ्यावरच थांबले नाहीत. त्यांनी मागोवा सुरुच ठेवला. तेव्हा भारतींना त्यांनाही केसमध्ये फार लक्ष घालू नको. याबाबत तत्कालीन मुख्यमंत्र्यांचा दबाव असल्याचं भारतीनं सांगितल्याचा दावा कुरुळकरांनी चौकशीसमोर केलाय.

सेवानिवृत्तीनंतरही कुरुळकर सक्रिय
दीपक कुरुळकर (Deepak Kurulkar) नंतर पोलीस दलातून रितसर निवृत्त झाले. पण त्यांनी रेश्मा खान बोगस पासपोर्ट प्रकरण सोडलं नाही. निवृत्तीनंतर याच प्रकरणात काय कारवाई केली याची माहिती त्यांनी आरटीआयमधून मागवली. तेव्हा कारवाई तर झालीच नाही उलट रेश्मा खाननं पासपोर्टसाठी दिलेली कागदपत्रे तसच कारवाईचे निर्देश देणारी कागदपत्रं गायब असल्याचं दिसून आलं. नंतर कुरुळकरांनी याच प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांचे दार ठोठावले. त्यांच्याच तक्रारीवर महासंचालकांनी चौकशी नेमली. गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले. आणि आता मुंबई क्राईम ब्रँचनं रेश्मा खान, देवेन भारती आणि दीपक फटांगरे (Deepak Phatangre) यांच्या विरोधात मालवणी पोलीस ठाण्यात वेगवेगळ्या कलमाअंतर्गत गुन्हा दाखल केलाय. आधी सांगितल्याप्रमाणे रेश्मा खान फरार आहे.

हे सुद्धा वाचा:

Video | जिम वेअरमध्ये स्पॉट झाली ‘दिलबर गर्ल’ नोरा फतेही, कारमधून उतरतानाच नेमकी चूक झाली!

मुस्लिम आरक्षणासाठी MIM चा तिरंगा मोर्चा, हजारो कार्यकर्ते औरंगाबादहून मुंबईकडे रवाना

आता आस्मानी नव्हे सुलतानी संकट, रब्बीचे पीक बहरात असतानाच केंद्र सरकारच्या निर्णयाचा फटका