लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिले विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश

| Updated on: May 10, 2020 | 10:54 AM

केंद्र सरकारच्या 'वंदे भारत मिशन' (Vande Bharat Mission) अंतर्गत लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं गेलं आहे.

लंडनला अडकलेल्या भारतीयांचे पहिले विमान मुंबईत दाखल, पुण्यातील 65 नागरिकांचा समावेश
Follow us on

मुंबई : केंद्र सरकारच्या ‘वंदे भारत मिशन’ (Vande Bharat Mission) अंतर्गत लंडनमध्ये अडकलेल्या 325 भारतीयांना सुखरुप मायदेशी परत आणलं गेलं आहे. या प्रवाशांमध्ये 65 पुणे जिल्ह्यातील नागरिकांचा समावेश आहे. लॉकडऊनदरम्यान पहिल्यांदाच मुंबई विमानतळावर लंडन येथून आलेलं विमान दाखल झालं. हे विमान आज (10 मे) पहाटे दीड वाजेच्या सुमारास मुंबई विमानतळावर दाखल झालं. या विमानातून आलेल्या सर्व प्रवाशांना विविध हॉटेल्समध्ये 14 दिवसांसाठी क्वारंटाईन करण्यात येणार आहे. त्यानंतर त्यांना घरी सोडण्यात येईल (Vande Bharat Mission).

देशात लॉकडाऊन घोषित केल्यानंतर लंडनमध्ये अनेक यात्रेकरी आणि विद्यार्थी अडकले होते. या सर्वांनी केंद्र सरकारकडे भारतात परत घेऊण जाण्यासाठी व्यवस्था करावी, अशी विनंती केली होती. त्यांच्या विनंतीवरुन अखेर केंद्र सरकारने ‘वंदे भारत मिशन’ची आखणी केली. या मिशनमार्फत लंडन येथून आलेलं पहिलं विमान आज सकाळी मुंबई विमानतळावर दाखल झालं. हे विमान लंडनच्या हिथ्रो एअरपोर्टवरुन निघालं होतं. या विमानामार्फत मायदेशी परतलेल्या भारतीयांच्या नातेवाईकांनादेखील मोठा दिलासा मिळाला आहे.

दरम्यान, लंडन येथून आलेल्या विमानात पुणे जिल्ह्याचे एकूण 65 प्रवासी आहेत. या सर्व प्रवाशांची विमानतळावर वैद्यकीय चाचणी करण्यात आली. त्यानंतर चार बसेसमार्फत त्यांची पुण्याकडे रवानगी करण्यात आली आहे. या प्रवाशांच्या क्वारंटाईनची व्यवस्था पुण्याच्या हॉटेल सदानंद रेजन्सी, बालेवाडी- म्हाळुंगे येथे करण्यात आली आहे.

जगभरात थैमान घालणाऱ्या कोरोनानाचा भारतात शिरकाव झाल्यानंतर केंद्र सरकारने लॉकडाऊनची घोषणा केली. त्यामुळे देशातील सर्व रेल्वे, विमानसेवा बंद पडली. या लॉकडाऊन दरम्यान विदेशात जवळपास 2 लाख भारतीय अडकले आहेत. यापैकी 14 हजार 800 भारतीयांना वंदे भारत मिशन अंतर्गत भारतात आणलं जात आहे. जगभरातील एकूण 12 देशातून 64 विमानांद्वारे 14 हजार 800 नागरिकांना भारतात आणलं जात आहे. 1990 च्या खाडीच्या युद्धानंतरचं हे सर्वात मोठं ऑपरेशन आहे.