सायन-पनवेल मार्गावर महापूर, गाड्या पाण्यावर तरंगल्या, अनेक जण अडकले

| Updated on: Jul 09, 2019 | 4:19 PM

खारघरमधील कोपरा पुलाजवळ पाऊस पडल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी ही परिस्थिती झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये अनेक गाड्या बंद पडून पाण्यावर तरंगलेल्याही दिसत आहेत.

सायन-पनवेल मार्गावर महापूर, गाड्या पाण्यावर तरंगल्या, अनेक जण अडकले
Follow us on

नवी मुंबई : पावसाने थैमान घातल्यामुळे नवी मुंबईतील परिस्थिती भीषण झाली आहे. सुनियोजित बसवलेल्या शहराकडे दुर्लक्ष केल्यास त्याची काय परिस्थिती होते याचा अनुभव सध्या नवी मुंबईकर घेत आहेत. खारघरमधील कोपरा पुलाजवळ पाऊस पडल्यानंतर पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. सायन-पनवेल मार्गावर अनेक ठिकाणी ही परिस्थिती झाल्याचं पाहायला मिळतंय. विशेष म्हणजे यामध्ये अनेक गाड्या बंद पडून पाण्यावर तरंगलेल्याही दिसत आहेत.

खारघरमधील पांडवकडा धबधब्यातून कोसळणारं पाणी सिडको प्रशासनाने चार ते पाच किमीचा वळसा देत कोपरा गावाच्या पलीकडे असणाऱ्या खाडीत एका नाल्यातून सोडलं आहे. त्या नाल्याची व्यवस्थित साफसफाई केली नसल्याने पाण्याचा विसर्ग व्यवस्थितरित्या होऊ शकला नाही. पनवेलचे भाजप आमदार प्रशांत ठाकूर अध्यक्ष असलेल्या सिडको प्रशासनाच्या हलगर्जीपणाचा फटका वाहनधारकांसह स्थानिकांनाही बसतोय.

नवी मुंबईतील ऐरोली, वाशी, तुर्भे, नेरुळ, बेलापूर आणि एपीएमसी मार्केटमध्ये मोठ्या प्रमाणात पाणी तुंबलं होतं. त्याचबरोबर खारघर कोपरा येथे नाला पाच दिवसांपूर्वीही तुंबला होता. स्वच्छता आणि आरोग्यावर कोट्यवधी रुपये खर्च करूनही महापालिकेचे सत्ताधारी आणि ठेकेदार यांच्या कारभारामुळे सायन-पनवेल महामार्गावर ही परिस्थिती होत आहे. दुचाकी यामधअये सापडल्यास वाहून जाण्याचीच परिस्थिती आहे. तर छोटी वाहनं पाण्यावर तरंगण्याएवढा पूर येत आहे.

2005 सालच्या महापुरात पांडवकड्याच्या नाल्यातील पाण्यामुळे खारघरसह कोपरा गावाला पाण्याचा वेढा पडला होता. या घटनेतही कोपरा गावात काही प्रमाणात पाणी शिरलं होतं. त्यामुळे नागरिकांच्या मनात धडकी भरली आहे. महामार्गावर पाणी भरल्याने जवळपास तीन ते चार किमी अंतरावर दोन्ही मार्गिका बुडाल्याने वाहनांच्या रांगा लागल्या होत्या. काही प्रवाशांना वाहनात अडकून पडावं लागलं. तर काही जण वाहनातून उतरून पाणी ओसरण्याची वाट पाहत होते. महापालिकेच्या कर्मचाऱ्यांनी पाण्याचा निचरा होण्यासाठी प्रयत्न केले. मात्र आपत्कालीन यंत्रणा पुन्हा कोलमडून गेल्याचा प्रत्यय अनेकांनी अनुभवला.

गेल्या वर्षी खड्डे, यावर्षी महापूर

हजारो कोटी रुपये खर्चून बांधलेल्या सायन-पनवेल महामार्गाची दुरावस्था हा नवीन विषय नाही. यापूर्वी पावसाळ्यात दरवर्षी खड्ड्यांमुळे वाहतूक कोंडी प्रवाशांनी अनुभवली आहे. वाहतूक कोंडी हा अत्यंत गंभीर विषय बनल्यानंतर तात्पुरती डागडुजी केली जात होती. पण खड्डे भरण्यासाठी कोट्यवधींचं टेंडर काढलं जायचं आणि पुन्हा खड्डे पडायचे. पण यावर्षी खड्डे पडणाऱ्या ठिकाणचे रस्तेच नव्याने बांधण्यात आले आहेत. त्यामुळे खड्ड्यांचा त्रास नसला तरी रस्त्यावर महापूर येत आहे. यामध्ये गाड्या अडकून लोकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.