सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू; महाजनांचा टोला

| Updated on: Jan 15, 2021 | 7:53 PM

सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे.

सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आम्ही त्यांना टोप्या पुरवू; महाजनांचा टोला
Follow us on

मुंबई: केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना पराभूत करत नाही तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही, या महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांच्या विधानाचा भाजप नेते गिरीश महाजन यांनी समाचार घेतला आहे. सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, हवं तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असा टोला गिरीश महाजन यांनी लगावला आहे. (girish mahajan reaction on abdul sattar statements)

‘टीव्ही9 मराठी’शी खास संवाद साधताना गिरीश महाजन यांनी अब्दुल सत्तार यांना हा टोला लगावला आहे. अब्दुल सत्तार हे युतीतून निवडून आले आहेत. याचं त्यांनी भान ठेवावं. रावसाहेब दानवे यांचं काम मोठं आहे. त्यांच्या मतदारसंघात त्यांनी प्रचंड काम केलं आहे. अनेक वर्षांपासून ते निवडून येत आहेत. त्यांना पराभूत करणं तेवढं सोप नाही. त्यामुळे सत्तार यांनी आयुष्यभर टोपी लावूनच ठेवावी, आणखी टोप्या लागत असतील तर आम्ही त्यांना टोप्या पुरवू, असा चिमटा महाजन यांनी काढला.

बोलाची कढी आणि बोलाचा भात

भाजपचे नेते खासगीमध्ये मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचं कौतुक करत असतात, या सत्तार यांच्या विधानाचाही त्यांनी समाचार घेतला. भाजपचे लोक असं काहीही म्हणत नाही. भाजपच्या कोणत्याही नेत्याने असं कधीही विधान केलं नाही. खासगीतही कोणी बोलत नाही. ही सत्तारांची बोलाची कढी आणि बोलाचाच भात आहे. सत्तार यांच्या या कल्पोकल्पित गोष्टी आहेत, असंही ते म्हणाले.

राम मंदिराचा विषय जुना झालाय

भाजपचं राजकारण म्हणजे मुँह में राम बगल में छुरी, अशी टीका सत्तार यांनी केली होती. त्यावरही महाजन यांनी पलटवार केला. राम मंदिराचा विषय आता जुना झाला आहे. आता तर निवडणुकाही नाहीत. त्यामुळे राम मंदिरावर बोलण्यापेक्षा आता तुम्ही तुमच्याविषयी बोला, असं महाजन म्हणाले. (girish mahajan reaction on abdul sattar statements)

आंदोलन सुरू आहे म्हणून शेतकऱ्यांना पैसे देत नाही

संकट आलं किंवा अडचणीत आल्यावर भाजप सरकार शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे वळते करतं, या राष्ट्रवादीचे नेते नवाब मलिक यांच्या टीकेचाही त्यांनी समाचार घेतला. मलिक यांचा काही तरी गैरसमज झाला आहे. आता कोणतीही निवडणूक नाही. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे टाकण्याचा आणि निवडणुकीचा काहीच संबंध येत नाही. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना त्यांनी अनेकवेळा शेतकऱ्यांना मदत केली आहे. पण तुमचं सरकार आल्यानंतर शेतकऱ्यांना काय मिळालं ते सांगा? असा सवाल करतानाच ठाकरे सरकारने असे निकष लावले की त्यामुळे एकाही शेतकऱ्याला मदत मिळत नाहीये, असं ते म्हणाले. एमएसपीचा लाभ महाराष्ट्रातील कपास, ऊस उत्पादक शेतकऱ्यांना मिळत आहे का हे जरा एकदा तपासून पाहा. मगच बोला, असं सांगतानाच शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू झालंय म्हणून आम्ही मदत करतोय असं नाही, असंही ते म्हणाले.

भाजपला जनतेचं समर्थन मोठ्या प्रमाणावर मिळत आहे. अगदी जम्मू-काश्मीरमध्येही भाजपला लोकांनी भरभरून पाठिंबा दिला आहे. त्यामुळे ही लोकशाही आहे की ठोकशाही आहे हे सांगण्यासाठी आम्हाला तुमच्या कुणाच्याही प्रमाणपत्राची गरज नाही. ही ठोकशाही असती तर देशाचे निकाल वेगळे लागले असते. काश्मीरमध्ये 70 कलम रद्द केल्यानंतरही लोक भाजपला निवडून देत आहेत, असंही त्यांनी सांगितलं. (girish mahajan reaction on abdul sattar statements)

 

संबंधित बातम्या:

मोदींनी आणलेल्या कृषी कायदे शेतकऱ्यांचे फायद्याचे, विरोधकांकडून शेतकऱ्यांची दिशाभूल : देवेंद्र फडणवीस

रावसाहेब दानवेंचा पराभव करत नाही, तोपर्यंत डोक्यावरची टोपी काढणार नाही; सत्तार गरजले

ऑनलाईन बिघाड; मुक्ताईनगर ग्रामपंचायतीसाठी एकाही उमेदवाराचा अर्ज नाही!

(girish mahajan reaction on abdul sattar statements)