कोरोनावर विजयी पताका फडकविण्यात देश अग्रेसर, राज्यपालांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सन्मान

| Updated on: Nov 04, 2020 | 6:38 PM

धारावी येथील कोरोना नियंत्रणाचे शिलेदार सहायक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला.

कोरोनावर विजयी पताका फडकविण्यात देश अग्रेसर, राज्यपालांच्या हस्ते कोरोनायोद्ध्यांचा सन्मान
Follow us on

मुंबई : राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी आज कोरोना योद्ध्यांचा सत्कार केला. विशेष म्हणजे धारावी येथील कोरोना नियंत्रणाचे शिलेदार सहायक आयुक्त किरण दिघावकर (Kiran Dighavkar) यांचा यावेळी सन्मान करण्यात आला. धारावी तसेच इतरत्र कोरोना प्रकोपाच्या काळात समाजकार्य करणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा राज्यपाल कोश्यारी यांच्या हस्ते राजभवन येथे सत्कार करण्यात आला, त्यावेळी ते बोलत होते. भामला फाउंडेशन या संस्थेच्यावतीने कोरोना योद्ध्यांच्या या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. (Governor Bhagat Singh Koshyari felicitated Covid Warriors)

यावेळी राज्यपाल कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने देश अग्रेसर आहे, असं म्हणत जागतिक कोरोना स्थितीवर भाष्य केलं. मात्र राज्यपालांच्या भाषणात ना मुंबईचं कौतुक होतं ना महाराष्ट्राचा उल्लेख.

देशात सर्वाधिक कोरोना रुग्ण महाराष्ट्रात होते. महाराष्ट्रातील कोरोना नियंत्रणावर राज्य सरकारने केलेल्या कामकाजाचा उल्लेख राज्याचे प्रमुख या नात्याने राज्यपालांनी करणे अपेक्षित आहे, असं विरोधकांचं म्हणणं आहे. मात्र त्यांनी राज्याचा उल्लेख टाळून कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने देश अग्रेसर असल्याचं म्हटलं.

वाचा :  अमित देशमुखांच्या खांद्यावरुन राज्यपालांचा मुख्यमंत्र्यांवर निशाणा?

यावेळी राज्यपालांनी जर्मनी, फ्रान्स यांसह काही देशात करोनाची दुसरी लाट आल्याचं नमूद केलं. राज्यपाल म्हणाले, “जगात काही देशात नव्याने लॉकडाऊन जाहीर झाले आहे. मात्र डॉक्टर्स, नर्सेस, समाजसेवी संस्था, संशोधक आणि परोपकारी व्यक्ती यांच्या सामूहिक प्रयत्नांमुळे भारत कोरोनावर विजय पताका फडकविण्याच्या दिशेने सातत्याने वाटचाल करीत आहे.”

सेवा हा शब्द बोलण्यास अतिशय सोपा आहे; परंतु सेवा करणे अतिशय कठीण आहे. मात्र भारतातील डॉक्टर्स, परिचारिका आणि इतर समाजसेवकांनी कोरोना काळात समाजाच्या रूपाने आपण प्रत्यक्ष भगवंताची सेवा करीत आहो, या भावनेने कार्य केल्याचे राज्यपालांनी सांगितले.

‘धारावी करोना नियंत्रण : लोकसहभागाचे उदाहरण’

धारावी येथील कोरोनाची बिकट स्थिती सामूहिक प्रयत्नांतून नियंत्रणात आणल्याबद्दल राज्यपालांच्या हस्ते मुंबई महानगर पालिकेचे सहायक आयुक्त किरण दिघावकर यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

शासन कार्यासोबतच लोकसहभाग तसेच स्वयंसेवी संस्थांचे योगदान यामुळे धारावी येथील करोना संसर्ग नियंत्रित करणे शक्य झाले असे दिघावकर यांनी यावेळी सांगितले.

उदयपुरचे युवराज लक्ष्यराज सिंह मेवाड, बांधकाम व्यावसायिक तसेच शिक्षण संस्था चालक निरंजन हिरानंदानी, पार्श्वगायक शान व गायिका पलक मुच्छल, अभिनेते अलि फजल आणि भामला फाउंडेशनचे अध्यक्ष आसिफ भामला यावेळी उपस्थित होते.

नानावटी रुग्णालयाचे डॉ समद अन्सारी, हिरानंदानी रुग्णालयाचे मुख्याधिकारी डॉ सुजित चटर्जी, विजय कारिया, सायन रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. मोहन जोशी, कमल खुशलानी, विनीत गौतम, त्रिवनकुमार कर्नानी, रोमांचक अरोरा, निक्सन जोसफ, नेल्सन कोएल्हो, बैद्यनाथचे आयुर्वेदचे अध्यक्ष सिद्धेश शर्मा, आर डी नॅशनल कॉलेजच्या प्राचार्या डॉ. नेहा जगतियानी, समाजसेवी एहसान गडावाला, अनुराग कत्रियार, धारावी पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक रमेश नागरे यांचा यावेळी कोरोना काळातील कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

(Governor Bhagat Singh Koshyari felicitated Covid Warriors)

संबंधित बातम्या 

Rajyapal | ‘जो डरा सो मरा’, कोरोनाला घाबरु नका, त्याच्याशी लढा, राज्यपालांचं आवाहन