शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी सभागृहात पेट्रोल अंगावर ओतून घेतलं, हर्षवर्धन पाटलांनी विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं!

| Updated on: Aug 13, 2021 | 7:23 AM

सुदैवाने सभागृह पेटले नाही पण सभागृह पेटले असते तर चुकीचा संदेश जाऊन सभागृहाच्या प्रतिमेस हानी पोहोचली असती. | Harshvardhan Patil saved the Maharashtra Legislature from burning

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांनी सभागृहात पेट्रोल अंगावर ओतून घेतलं, हर्षवर्धन पाटलांनी विधिमंडळ जळण्यापासून वाचवलं!
हर्षवर्धन पाटील
Follow us on

अक्षय आढाव, टीव्ही 9 मराठी, मुंबई : हर्षवर्धन पाटील… काँग्रेसमधील एकेकाळचं मोठं नावं… महाराष्ट्राच्या राजकारणात सुसंस्कृत राजकारणी म्हणून त्यांची ओळख. पहिल्यांदा युती सरकारमध्ये त्यांनी मंत्रिपदाची जबाबदारी सांभाळली. नंतर आघाडी सरकारमध्येही त्यांनी अनेक खात्यांचं मंत्रिपद सांभाळलं. यामध्ये पणन, सहकार अशा महत्त्वाच्या खात्यांचा समावेश पण या सगळ्यांमध्ये त्यांनी संसदीय कार्यमंत्रीपदाची जबाबदारी उत्तम पेलली… जी सगळ्यांच्या लक्षात राहणारी आहे. त्यांनी 10 वर्ष संसदीय कार्यमंत्री असताना अनेक आमदारांची निलंबने केली… काही काळ तर ‘निलंबन मंत्री ‘म्हणून त्यांची ओळख राहिली. पण ज्यांची निलंबनं केली तेच पाटील यांचे जवळचे ‘दोस्त’ बनले. पाटील यांनी लिहिलेल्या ‘विधानगाथा’ या पुस्तकात त्यांनी खास आठवणी लिहिल्या आहेत. अशीच एक आठवण म्हणजे हर्षवर्धन पाटील यांच्या धाडसीपणाने आणि प्रसंगावधानाने महाराष्ट्राचं विधिमंडळ जळण्यापासून वाचलं…!  (Harshvardhan Patil saved the Maharashtra Legislature from burning over Gulabrao gawande Action)

शिवसेनेच्या राज्यमंत्र्यांचा आक्रमक पवित्रा

विधीमंडळाच्या अधिवेशन कालावधीमध्ये खऱ्या अर्थाने महाराष्ट्रातील ज्वलंत प्रश्नांवर चर्चा होत असते. लोकप्रतिनिधी आपले प्रश्न पोटतिडकीने मांडत असतात. गुलाबराव गावंडे हे शिवसेनेकडून निवडून आलेले राज्यमंत्री होते. ते प्रत्येक अधिवेशनात सावकारी प्रथेच्या विरोधात भूमिका घ्यायचे. सावकार विरोधी कायदा आणलाच पाहिजे, अशी त्यांची आग्रही मागणी असायची. एके दिवशी विधिमंडळ सभागृहामध्ये प्रश्नोत्तराचा तास सुरु होता. प्रश्नोत्तरे सुरु असताना अचाकनपणे गुलाबराव गावंडे उभे राहिले व अध्यक्षांचे आपल्याकडे लक्ष वेधून घेण्यासाठी प्रयत्न करु लागले. पण अध्यक्षांचे त्यांच्याकडे दुर्लक्ष झाले.

सभागृहाच्या संकेताप्रमाणे कोणत्याही सदस्याला बोलण्यालापूर्वी अध्यक्षांची परवानगी घ्यावी लागते. अध्यक्षांनी परवानगी दिली तरच सदस्याला बोलण्याची परवानगी मिळते. अन्यथा त्याला बोलता येत नाही. सभागृह अध्यक्षांचे आपल्याकडे लक्ष नसल्याने गुलाबरावांचा पारा चढला.. ते तडक वेलमध्ये (अध्यक्षांसमोरच्या मोकळ्या जागेत) आले आणि मोठमोठ्याने घोषणा देऊ लागले. अध्यक्षांनी त्यांना तत्काळ त्यांच्या जागेवर बसण्याची सूचना केली, पण गावंडे यांनी अध्यक्षांच्या सूचनेचे पालन केले नाही…..

गुलाबराव गावंडेंनी पेट्रोलच्या दोन्ही बाटल्या स्वत:च्या अंगावर ओतून घेतल्या

गुलाबराव गावंडे यांचे व्यक्तिमत्व जरा हटके होते. त्यांच्या व्यक्तिमत्वाचे आणखी एक वैशिष्ट म्हणजे दाढी वाढवलेली, कपाळावर भगवा टिळा आणि भगवा उपरणे असायचे. त्यावर जॅकेट परिधान केलेले असायचे. त्यांनी जॅकेटच्या खिशात हात घालून दोन्ही बाटल्या बाहेर काढल्या. त्या दोन्ही बाटल्यांत पेट्रोल होतं. सभागृहातील कोणालाही काही अंदाज येण्यापूर्वी त्यांनी पेट्रोलच्या दोन्ही बाटल्या स्वत:च्या अंगावर ओतून घेतल्या आणि दुसऱ्या खिशातून लायटर बाहेर काढला. गावंडे रागाच्या भरात होते. ते लायटर पेटवणार इतक्यात प्रसंगावधान व उद्भवणाऱ्या परिस्थितीचे भान हर्षवर्धन पाटील यांना आले. त्यामुळे परिस्थितीचे गांभीर्य ओळखून त्यांनी तत्काळ क्षणाचाही विलंब न करता गुलाबरावांकडे धाव घेतली.

हर्षवर्धन पाटलांची समयसूचकता

हर्षवर्धन पाटील यांचं सर्व लक्ष गावंडे यांच्या लायटरकडे होते. त्यांनी पहिल्यांदा गावंडे यांच्या हातातील लायटर धरला आणि तो लायटर गावंडे यांच्या हातातून बाजूला करुन त्यांना घट्ट पडकले. त्यानंतर सभागृहात एकच गोंधळ सुरु झाला. गुलाबरावांना पकडलेले पाहून सभागृहातील कर्मचारी मदतीला धावून आले. त्यांनी सोडवासोडव केली. गुलाबरावांना शांत केले. यामुळे मोठा अपघात आणि अनर्थ टळला….

सर्व सभागृहामध्ये पेट्रोलचा वास पसरला होता. त्यातच भर म्हणजे सभागृहामध्ये सर्व लाकडी फर्निचर होते. जर अशावेळी लायटर पेटला असता तर कोणालाही कसलाही अंदाज येण्याअगोदर सभागृह पेटले असते. त्यामुळे समाजामध्ये, राज्यामध्ये तसंच संपूर्ण देशामध्ये चुकीचा आणि नकारात्मक संदेश गेला असता. गुलाबरावांची ही कृती सत्ताधारी पक्षासहित विरोधी पक्षासाही आवडलेली नव्हती. या कारणामुळे सभागृह तहकूब करावे लागले.

अधिवेशकाळापुरते गावंडेंचं निलंबन

गुलाबरावांची ही कृती अशोभनीय आणि सभागृहाच्या प्रतिमेला तडा जाणारी होती. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई करणे भाग होते. काय कारवाई करावी, याबाबत मतमतांतरे होती. पण हर्षवर्धन पाटील यांनी संसदीय कार्यमंत्री म्हणून अधिवेशकालापुरते त्यांचे निलंबन करण्याचा निर्णय घेतला. एवढंच नव्हे तर त्या निर्णयाची अंमलबजावणीही केली.

…त्यानंतर सभागृहामध्ये कडक सुरक्षा

सभागृहातील पेट्रोलचा वास काढण्यासाठी नानाविध उपाय करावे लागले. हर्षवर्धन पाटील यांच्याकडेही कपडे बदलण्याशिवाय पर्याय उरला नव्हता. कारण पेट्रोलचा वास त्यांच्या अंगालाही लागला होता. तहकुबीनंतर सभागृहाचे कामकाज सुरु झाले. मग तावातावाने गुलाबराव गावंडेंच्या प्रकरणावर चर्चा सुरु झाली. त्यामध्ये अनेक सदस्यांनी आपापली मतं मांडली. पेट्रोलच्या बाटल्या आणि लायटर सभागृहात आलेच कसे यावर चर्चा होऊन यातील चर्चा होऊन यातील सत्य शोधण्याासाठी समिती नेमली गेली आणि या चर्चेतून सभागृह सुरक्षिततेचे काही नियम केले पाहिजेत, यावर सर्वांमध्ये एकमत झाले.

सुदैवाने सभागृह पेटले नाही पण सभागृह पेटले असते तर चुकीचा संदेश जाऊन सभागृहाच्या प्रतिमेस हानी पोहोचली असती. प्रसंग बाका होता. हर्षवर्धन पाटील यांनी धाडस केले. गुलाबरावांना मिठी मारली. जर का त्यांच्या हातातून लायटर सोडवला गेला नसता, तर अनर्थ ओढवला असता. हर्षवर्धन पाटील यांच्या प्रसंगावधानाने हा अनर्थ टळला आणि विधिमंडळ जळण्यापासून वाचले.

(Harshvardhan Patil saved the Maharashtra Legislature from burning over Gulabrao gawande Action)

हे ही वाचा :

शनिवार स्पेशल : राणेंनी जयंतरावांसाठी शिवलेला कोट, विलासराव- गोपीनाथरावांचा दिलदारपणा, महाराष्ट्राच्या सुसंस्कृतपणाचे 6 लाजवाब किस्से

Special Story : मुस्लिम साबीर शेख, दलित बाळा नांदगावकर ते चंद्रकांत खैरे, बाळासाहेबांच्या हिंदुत्वाची धार!