लोकचळवळ : सावित्रीबाईंच्या जयंतीला उत्सवाचं रुप देणारी चळवळ, काय आहे इतिहास?

| Updated on: Mar 03, 2021 | 10:56 AM

महाराष्ट्रात नव्या वर्षातला पहिला उत्सव म्हणून सध्या महाराष्ट्रात सावित्री उत्सव साजरा केला जातो. मात्र, यामागील चळवळीचा इतिहास तुम्हाला माहिती आहे का?

लोकचळवळ : सावित्रीबाईंच्या जयंतीला उत्सवाचं रुप देणारी चळवळ, काय आहे इतिहास?
Follow us on

मुंबई : नव्या वर्षातला पहिला उत्सव म्हणून सध्या महाराष्ट्रात सावित्री उत्सव साजरा केला जातो. शेणा, दगडाचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड पाऊलवाट सावित्रीबाई फुले चालत राहिल्या. म्हणूनच आज आपला विकासाचा प्रशस्त मार्ग तयार झाला, ही भावना मनात घेऊन राष्ट्र सेवा दलाच्यावतीने ही चळवळ सुरु झाली. शिक्षणाच्या वाटेवरून चालताना सावित्रीबाई फुले यांची आठवण जागवायला हवी म्हणून सावित्रीबाई यांचा जन्म दिवस असलेल्या 3 जानेवारी हा उत्सव महाराष्ट्रभरात साजरा करण्याची लोक चळवळ सुरु आहे. याच्याचविषयीचा हा खास आढावा (History of Movement to make Savitribai Birth Anniversay as a Festival in Maharashtra).

सावित्रीबाई फुले जयंती हा दिवस सावित्री उत्सव म्हणून साजरा करावा याची सुरुवात राष्ट्र सेवा दलाच्या काही निवडक कार्यकर्त्यांनी केली. यात आघाडीवर होते सेवा दलाचे मुंबईचे कार्यकर्ते शरद कदम. त्यांनी 7-8 वर्षांपूर्वी आपल्या काही सहकाऱ्यांसोबत सामाजिक कृतज्ञतेच्या भावनेतून या जयंतीच्या दिवसाला उत्सवाचं रुपांतर करण्याचा निर्णय घेतला. यात सामाजिक कार्यकर्ते सुभाष वारे, राज असरोंडकर, सिरत सातपुते, पत्रकार रवी आंबेकर अशा अनेकांचा समावेश होता. सुरुवातीला मुंबई-पुण्यासारख्या मोजक्या शहरांमध्ये सुरु झालेली ही चळवळ काही वर्षातच संपूर्ण महाराष्ट्रभरात पसरली आहे.

सावित्री उत्सवाच्या चळवळीचा उद्देश काय?

आपल्याकडे काही गोष्टी आपण सार्वजनिक ठिकाणी करतो. स्वतःला, घराला याची झळ लागू देत नाही. अनेक महापुरुषांच्या जयंत्या,स्मृतिदिन आपण बाहेर साजरे करतो, व्याख्याने आयोजित करतो, कोण रोषणाई, डिजे आपापल्या आकलनानुसार साजरा करतो. सावित्रीबाई यांची जयंती देखील कित्येक वर्ष अशाच पद्धतीने साजरी होत होती. गावात, शहरात फोटो लावून, भाषणे देवून ही जयंती साजरी केली जायची. मात्र, राष्ट्र सेवा दलाच्या या कार्यकर्त्यांनी विचार केला की ज्या सावित्रीबाईंमुळे माझी आई, बहीण, बायको, मुलगी आणि समाजातील प्रत्येक महिला शिकू शकली, त्या सावित्रीबाईंचा जन्म दिवस सर्वांसाठीच विशेष असला पाहिजे.

|| सावित्रीची लेकरं आम्ही ||
|| आता मागे राहणार नाही ||

यातूनच मग हा दिवस महाराष्ट्रात नव्यावर्षातील पहिला मोठा उत्सव झाला पाहिजे यासाठी प्रयत्न सुरु झाले. जसा आपण आपल्या आईचा वाढदिवस घरामध्ये साजरा करतो, तसाच सावित्रीचा जन्म दिवस घराघरात साजरा केला पाहिजे. शेणा दगडांचा मारा झेलत स्त्रियांच्या शिक्षणाची आणि सार्वजनिक सत्यधर्म पुढे नेण्याची अवघड पाऊल वाट चालवणाऱ्या सावित्रीबाईंमुळेच आज आपला विकासाचा प्रशस्त मार्ग तयार करु शकलो, ही भावना तयार झाली. तसेच या वाटेवरून चालताना सावित्रीबाई यांची आठवण घराघरातून जागविण्यासाठी मोहीम सुरु झाली. आता 3 जानेवारी हा सावित्रीबाई फुले यांचा जन्म दिवस हा अख्या महाराष्ट्राचा सावित्री उत्सव झाला आहे.

सावित्री उत्सव कसा साजरा केला जातो?

3 जानेवारीला घराघरांतून आकाश कंदील, दारात रांगोळी, दरवाज्याला फुलांचे आणि लाईटचे तोरण, घरात गोडधोड, उंबऱ्यावर विवेकाची एक पणती, सावित्रीच्या ओवी म्हणत, महात्मा फुले यांचा एखादा अखंड म्हणत आणि त्याचा अर्थ समजावून घेत हा दिवस दिवाळी सणासारखा साजरा केला जातो. शहरी आणि ग्रामीण भागात खूप मोठ्या प्रमाणात हा दिवस आता साजरा केला जातो. हा उत्सव घरात आणि व्यक्तिगत पातळीवर साजरा करीत असताना आता तो गावातील, शहरातील मध्यवर्ती ठिकाणी ही साजरा केला जातो. आपआपल्या नोकरीच्या ठिकाणी, शाळा, कॉलेजमध्ये आधुनिक पद्धतीने सावित्री उत्सव साजरा केला जातो. सामाजिक क्षेत्रात वेगळे काम करणाऱ्या तरुण स्त्रियांना सावित्रीच्या लेकी पुरस्कार देवून गौरवण्यात येते.

दिग्गजांचा या लोकचळवळीत सहभाग

अनेक तरुण मुलींनी सावित्री उत्सव का आणि कशासाठी याचे स्वतःचे 2-3 मिनिटांचे व्हिडीओ बनवून ते सोशल मीडियावर टाकले. याची लोक चळवळ बनली आहे. यात अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, चिन्मयी सुमीत, सुहिता थत्ते, अश्विनी कासार, पूर्वा निलिमा सुभाष, विशाखा सुभेदार या कलाकारांचाही महत्त्वाचा सहभाग आहे. सिनेमा, मालिकांमध्ये काम करणाऱ्या अभिनेत्रींनी सावित्री उत्सव साजरा करण्याचं आवाहन सोशल मीडियावर केलं. महाराष्ट्र टाइम्स, सकाळ, नवराष्ट्र, दिव्य मराठी, मॅक्स महाराष्ट्र या सारखी वर्तमानपत्रे,चॅनल गेली काही वर्ष वेगवेगळ्या स्त्रियांच्या बाईट घेवून त्यास प्रसिध्दी देवून सावित्री उत्सवाची दखल घेत आहेत.

यंदा तर महाराष्ट्र शासनाच्या महिला आणि बालकल्याण विभागाच्या मंत्री नामदार यशोमती ठाकूर यांनी 3 जानेवारी हा दिवस सावित्री उत्सव शासनाच्या वतीने साजरा करण्याचा अध्यादेश काढला. खासदार सुप्रिया सुळे यांनी सावित्री उत्सवाचे आवाहन करणारा स्वतःचा व्हिडीओ सोशल मीडियावर टाकून आपला पाठिंबा जाहीर केला. तीन वर्षांपूर्वी अभिनेत्री सोनाली कुलकर्णी, सुहीता थत्ते आणि अंधश्रद्धा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर या मुंबईतील सावित्री उत्सवाच्या कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. त्यावेळी त्यांनी असं आवाहन केले की, “सावित्रीबाई जशी आपल्या कपाळावर आडवी चिरी (आडव कुंकू) लावत तशी आडवी चिरी आपण 3 जानेवारीला आपल्या नोकरी, कॉलेज, घरात किंवा बाहेर जाताना लावून जावू आणि सावित्री प्रती कृतज्ञता व्यक्त करू.”

या आवाहनाला खूप सकारात्मक प्रतिसाद मिळाला आणि चिरीची आणि उंबऱ्यावर विवेकाची पणती ही चळवळ सावित्री उत्सवाची ओळख बनू पाहते आहे.

सावित्री उत्सवावरील आक्षेप

या सावित्री उत्सवावर काही आक्षेप ही आहेत. सावित्री बरोबर फातिमा यांचा ही जन्म दिवस एकत्रित साजरा का करीत नाही. सावित्रीचा जन्म दिवस कपाळावर चिरी आणि पणती, रांगोळी या प्रतिकांमध्ये का अडकवून टाकता. सावित्री ते जिजाऊ असा संयुक्त कार्यक्रम का केला जात नाही हे तीन आक्षेप सध्या तरी घेतले जातात.

यावर बोलताना या चळवळीचे प्रणेते शरद कदम सांगतात, “मुळात सावित्री आणि फातिमा ही प्रतिकं सामाजिक कार्यक्रमात आपण नेहमीच वापरत असतो. पण आपण जन्म दिवस साजरा करतो आहोत. 3 जानेवारी हा सावित्रीचा जन्म दिवस असतो. फातिमाचा जन्म दिवस या दिवशी नसतो. आपण व्यक्तिगत आयुष्यात आपला, बायकोचा, मुलाचा वाढदिवस एकत्र साजरा करतो का? ते वेगवेगळे साजरे करतो ना? ती स्वतंत्र व्यक्ती आहेत हे मान्य केलेले असते. म्हणून सावित्री, जिजाऊ, रमाई यांचे जन्मदिवस स्वतंत्रपणे आणि घराघरांतून साजरे झाले पाहिजेत ते संयुक्तपणे साजरे होता कामा नयेत.”

‘भारतीय लोकांना सण, उत्सव या वातावरणात वावरायला आवडते’

“भारतीय लोकांना सण, उत्सव या वातावरणात वावरायला आवडते. भाषणे, वाचणे यात सर्वच लोक सहभागी होत नाहीत. सर्वाचा सहभाग वाढवायचा असेल आणि देशाच्या एकूण लोकसंख्येच्या 53 टक्के लोक पंचविशीच्या आतील असतील तर या तरुण मुलांना अपील होईल,त्यांच्या भाषेतील त्यांना समजेल असाच कार्यक्रम द्यावा लागेल ना? सावित्री उत्सवाचा आजचा कार्यक्रम हा या तरुण मुले, मुली यांना समोर ठेवून डिझाईन केलेला आहे. म्हणूनच सावित्री उत्सव तरुण मुले मोठ्या प्रमाणात महाराष्ट्रात साजरा करीत आहेत आणि हेच सावित्री उत्सवाचे यश आहे,” असंही शरद कदम नमूद करतात.

शरद कदम आवाहन करतात की, “दरवर्षी महाराष्ट्रातील प्रत्येकाने गोडधोड आणि घरासमोर ज्ञानाची/विवेकाची एक पणती लावून ‘सावित्री उत्सव’ साजरा करावा. लवकरच हा उत्सव देशपातळीवर जावा. या दिवशी सावित्रीच्या ओवी गाऊन, महात्मा फुले यांचा एखादा अखंड म्हणत त्याचा अर्थही समजावून घेवूया. महात्मा फुले यांचं “शेतकऱ्यांचा आसूड” हे पुस्तक लिहिलं आहे. शक्य झालं तर त्याचे वाचन करून शेतकरी आंदोलनाला पाठिंबा देवू या. घराघरात आणि मनामनात सावित्री जागवू या.”

हेही वाचा :

Special story | आजच्या भाषेत सावित्रीबाई फुले याच पहिल्या ‘प्लेग योद्धा’: हरी नरके

‘दारासमोर रांगोळी, घरावर आकाश कंदील आणि उंबऱ्यावर ज्ञानाची पणती’, महाराष्ट्रात घरोघरी सावित्री उत्सव साजरा

Photos : ‘घराला तोरण, दारात पणती आणि गोडधोड जेवण’, महाराष्ट्रात ‘सावित्री उत्सवाला’ जोरदार प्रतिसाद

व्हिडीओ पाहा :

History of Movement to make Savitribai Birth Anniversay as a Festival in Maharashtra