IMD Weather Update : बंगालच्या खाडीत काय घडतंय? विदर्भाला अलर्ट, महाराष्ट्रात पाऊस कधी?
बंगालच्या खाडीतील कमी दाबाच्या क्षेत्रामुळे ओडिशा, छत्तीसगडसह अनेक राज्यांना 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. उत्तर भारतातही जोरदार पावसाची शक्यता आहे. विदर्भात 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान मध्यम ते जोरदार पाऊस अपेक्षित आहे. मात्र, महाराष्ट्रात पुढील चार दिवस मान्सून कमकुवत झाल्याने पाऊस नसेल, ज्यामुळे तापमानात वाढ होईल.

उत्तर पश्चिम बंगालची खाडी आणि त्याच्या आसपासच्या परिसरात कमी दाबाचं क्षेत्र बनलं आहे. त्यामुळे आज 10 आणि 11 तारखेला ओडिशा आणि छत्तीसगडमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याचा इशारा देण्यात आला आहे. याशिवाय या दोन्ही दिवशी पश्चिम बंगाल आणि आंध्रप्रदेशमध्येही काही ठिकाणी जोरदार पाऊस होणार असून तसा अलर्टही जारी करण्यात आला आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान पश्चिम उत्तर प्रदेश आणि 10 ते 12 तारखे दरम्यान पूर्व मध्यप्रदेशात जोरदार पाऊस होणार आहे. तसेच विदर्भालाही अलर्ट जारी करण्यात आला आहे.
उत्तर भारतात मात्र पुढचे चार दिवस म्हणजे 11 ते 14 सप्टेंबरमध्ये अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. उत्तराखंडमध्ये वादळी वाऱ्यासहीत पाऊस कोसळणार आहे. या ठिकाणी विजा कडाडण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 13 ते 15 सप्टेंबरच्या दरम्यान राजस्थानच्या मोठ्या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार आहे. उत्तर पश्चिम भारतील काही भागात मोठा पाऊस होणार आहे. 10 ते 13 सप्टेंबरच्या दरम्यान उत्तराखंड, 14 ते 15 सप्टेंबर दरम्यान हरियाणा, चंदीगड, दिल्ली, पंजाब आणि 13 ते 14 सप्टेंबर दरम्यान पूर्व राजस्थानात तुफान पाऊस होणार आहे.
विदर्भाला अलर्ट
मध्य भारतातही मोठा फाऊस होणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज आहे. 12 ते 14 सप्टेंबर दरम्यान मध्य प्रदेश आणि 11 ते 15 सप्टेंबर दरम्यान विदर्भात मोठा पाऊस होणार आहे. या भागात विजांच्या कडकडाटासह वादळी पाऊस होणार असल्याचा अंदाज आहे. याशिवाय आज आणि उद्या छत्तीसगडमध्ये अतिमुसळधार पाऊस होण्याची शक्यताही वर्तवण्यात आली आहे.
11 तारखे नंतर बंगालच्या खाडीत कमी दाबाचा पट्टा निर्माण होऊन विदर्भात सर्वत्र ढगाळ वातावरण तयार होणार आहे. दिलासादायक बाब म्हणजे 12 ते 14 सप्टेंबर रोजी विदर्भातील काही जिल्ह्यात मुसळधार तर काही जिल्ह्यात साधारण पावसाचा अंदाज आहे. सध्या 11 तारखेपर्यंत पावसाचा अंदाज नसून तापमानात वाढ होणार आहे. विदर्भातील तापमानात साधारणतः 3 ते4 अंश सेल्सियस पर्यंत वाढ होऊन तापमान 32 अंशापर्यंत पोहचण्याचा अंदाज आहे. विदर्भात साधारणतः 30 टक्क्यापर्यंत पावसाची तूट निर्माण झाली असून कमी पावसामुळे ही तूट सध्या तरी भरून निघण्याचा अंदाज नाही, अशी माहिती नागपूर हवामान विभागाचे शास्त्रज्ञ डॉ. प्रवीण कुमार यांनी दिली आहे.
चार दिवस पाऊस नाहीच
दरम्यान, महाराष्ट्रात पुढचे चार दिवस पाऊस नसल्याचं हवामान खात्याने स्पष्ट केलं आहे. महाराष्ट्रातील मान्सूनचे वारे कमकुवत झाले आहेत. त्यामुळे हवेतील आद्रतेचे प्रमाणही घटलं आहे. तसेच राज्यात कोणतीही हवामान प्रणाली सक्रिय नसल्याने पुढचे चार ते पाच दिवस राज्यात पाऊस पडणार नाही, अशी माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख एस. डी. सानप यांनी दिली आहे. राज्याच्या बहुतांश भागात हवामान देखील कोरडे राहणार आहे. एल निनोचा वाढता प्रभाव असला तरी परतीच्या पावसात तूट भरून निघेल, असा अंदाजही सानप यांनी वर्तवला आहे.