मी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलेली नाही : जितेंद्र आव्हाड

| Updated on: Feb 06, 2020 | 4:06 PM

माझी सुरक्षा वाढवा अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत केली नाही, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे.

मी सुरक्षा वाढवण्याची मागणी केलेली नाही  : जितेंद्र आव्हाड
Follow us on

मुंबई : माझी सुरक्षा वाढवा अशी मागणी मी मंत्रिमंडळ बैठकीत केली नाही, असं राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्ट केलं आहे. जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Ministers security) यांनी जीवाला धोका असून सुरक्षा वाढवण्याची मागणी मंत्रिमंडळ बैठकीत केल्याचं वृत्त सर्वत्र प्रसारित झालं. त्या पार्श्वभूमीवर जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करुन स्पष्टीकरण दिलं. (Ministers security)

“माझी सुरक्षाव्यवस्था वाढविण्यात यावी किंवा माझ्या जीवाला धोका आहे असं मी मंत्रिमंडळाच्या बैठकीत बोललेलो नाही. ही बातमी सत्यतेला धरुन नाही आणि अतिरंजीत आहे. कृपया महाराष्ट्राच्या जनतेला चुकीची माहिती मिळू नये म्हणून मी हे स्पष्टीकरण देत आहे”, असं जितेंद्र आव्हाड म्हणाले.

दरम्यान, गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड आणि मदत व पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार (Ministers security) यांनी आपल्या जिवाला धोका असल्याचे मंत्रिमंडळाच्या बैठकीत सांगितल्याचं वृत सर्वत्र प्रसारित झालं होतं. या दोन्ही मंत्र्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडे सुरक्षाव्यवस्था वाढवण्याची मागणी केल्याचं या वृत्तात नमूद होतं. मात्र जितेंद्र आव्हाड यांनी आता त्यामध्ये तथ्य नसल्याचं म्हटलं आहे.

आव्हाडांच्या सुरक्षेत घट

गेल्या वर्षी जानेवारी 2019 मध्ये फडणवीस सरकारने जितेंद्र आव्हाड यांची सुरक्षाव्यवस्था काढली होती. निवडणुकीच्या कारणामुळे आधी सुरक्षा काढली होती. ठाणे पोलीस दलाकडून आव्हाडांना सुरक्षा दिली जात होती. त्याआधी 2018 मध्येही आव्हाडांच्या सुरक्षेत कपात करण्यात आली होती. मात्र आव्हाड हे सनातन संस्थेच्या हिटलिस्टवर असल्याचं गुप्तचर यंत्रणेने स्पष्ट करुनही तत्कालिन भाजप सरकार राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीने फडणवीस सरकारवर केला होता.