Maharashtra Weather Update : आज तो धो धो कोसळणार, अतिमुसळधार पावसाचा इशारा, 18 राज्यात..
Maharashtra Weather Update : राज्यात मुसळधार पाऊस सुरू आहे. त्यामध्येच भारतीय हवामान विभागाने अनेक भागात आज पावसाचा मोठा इशारा दिला. तब्बल 18 राज्यांना आज हवामान विभागाने दक्षतेचा अलर्ट जारी केला.

मोठ्या विश्रांतीनंतर राज्यभरात पाऊस होत आहे. हा मोठा दिलासा शेतकऱ्यांना आहे. नाशिकसह राज्यातील अन्य भागात पावसाने हाहाकार माजवला आहे. गोदावरी नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली. कोकणसह घाटमाथ्यावर जोरदार पाऊस होत आहे. पावसाचा ऑरेंज अलर्ट हवामान विभागाने जारी केला. विदर्भासह मराठवाड्यात आज पाऊस होण्याची शक्यता आहे. ओराई, सिधी आणि रांचीमध्ये कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला. महाबळेश्वर येथे नीचांकी 18.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. सातारा, रायगड, रत्नागिरी येथे घाटमाथ्यावर अतिजोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे. मुंबई, ठाणे, सिंधुदुर्ग, चंद्रपूर, कोल्हापूर घाटमाथा आणि गडचिरोली येथे जोरदार वाऱ्यासह पावसाचा अंदाज आहे. मराठवाड्यातही आज पाऊस हजेरी लावणार आहे. जवळपास जिल्ह्यामध्ये आज पावसाचा अलर्ट देण्यात आला.
मुंबईसह उपनगरांमध्ये मुसळधार पाऊस होत आहे. रात्रीपासून पाऊस सुरू असून सकाळीही संततधार बघायला मिळाली. राज्यात पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज आहे. देशभरात मान्सूनचा जोर वाढतच चालला आहे. भारतीय हवामान विभागाने (IMD) आणखी एक महत्त्वाचा इशारा जारी केला असून पुढील 12 तासांत 18 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस वादळी वाऱ्यासह असेल.
ताज्या अंदाजानुसार, 27 जुलै रोजी उत्तर भारतापासून ते पूर्व आणि मध्य भारतापर्यंतच्या अनेक राज्यांमध्ये हवामानाची स्थिती तीव्र राहण्याची शक्यता आहे. अनेक राज्यात जोरदार पावसाला सुरूवात झाली. यादरम्यानच अनेक भागात ताशी 80 किमी वेगाने वारे वाहण्याची देखील शक्यता आहे. काही भागात गारपीट होण्याचीही शक्यता हवामान विभागाने वर्तवली.
हवामान विभागाच्या अंदाजानुसार, 27 जुलै रोजी महाराष्ट्र, उत्तर प्रदेश, बिहार, दिल्ली, राजस्थान, पंजाब, उत्तराखंड, हरियाणा, हिमाचल प्रदेश, जम्मू-काश्मीर, झारखंड, पश्चिम बंगाल, ओडिशा, गुजरात, मध्य प्रदेश, छत्तीसगड, अरुणाचल प्रदेश आणि आसाम या 18 राज्यांमध्ये मुसळधार पाऊस, वादळ आणि विजांच्या कडकडाटाचा इशारा देण्यात आला आहे. पुढील काही तास धोक्याची असणार आहेत. विजांच्या कडकडाटासह पाऊस होण्याची शक्यता आहे. या पावसामुळे शेती पिकांना जीवनदान मिळाले.