Jayant Patil on Raj Thackeray: जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना खोचक टोला

| Updated on: Apr 29, 2022 | 4:04 PM

Jayant Patil on Raj Thackeray: शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून?

Jayant Patil on Raj Thackeray: जोपर्यंत भाऊ मुख्यमंत्री आहेत, तोपर्यंत ते महाराष्ट्राचं कौतुक करणार नाहीत; जयंत पाटलांचा राज ठाकरेंना खोचक टोला
जयंत पाटलांचा राज ठाकरेंना खोचक टोला
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: ठाण्यातील सभेतून चकीत चंदू म्हणून हिणवणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्यावर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) यांनी खोचक शब्दात टीका केली आहे. जोपर्यंत त्यांचे बंधू महाराष्ट्रात मुख्यमंत्री आहेत तोपर्यंत महाराष्ट्राचे कौतुक करायचं नाही असं त्यांनी ठरवलं असेल. त्यामुळे दुसर्‍या राज्याचे कौतुक ते करणारच, असा खोचक टोला जयंत पाटील यांनी राज ठाकरे यांचे नाव न घेता लगावला. राज ठाकरे यांनी यूपीचे कौतुक केले आहे? यूपीचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ (cm yogi adityanath) यांचंही कौतुक करण्यात आलं आहे, याकडे मीडियाने पाटील यांचं लक्ष वेधलं असता त्यांनी आपल्या शैलीत उत्तरे दिली. एकदा गुजरातचं कौतुक करून झालं. आता यूपीचं कौतुक करतील आणि महाराष्ट्र सोडून सर्व राज्याचं कौतुक करायला दौरे करतील. दुसर्‍या राज्यात जाऊन त्या राज्यांचे कौतुक राज ठाकरे करतच राहणार आहेत, असा चिमटाही त्यांनी काढला.

मुंबईतील हिंदी भाषिक मनसेच्या मागच्या वागण्यामुळे कितीतरी लांब जातील याची भाजपला माहिती आहे. त्यामुळे भाजपकडून संघाने केलं म्हणून आम्ही करतोय अशी स्टोरी तयार व्हायला लागलेली दिसते, असं ते म्हणाले.

तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली?

शिवसेना होती म्हणून विरोध करण्याचा प्रश्न नव्हता. मुळात चर्चा झालीच नाही तर विरोध करण्याचा प्रश्न येतो कुठून? आमची काँग्रेसबरोबर आघाडी होती. आमची आघाडी विरोधी पक्षाचे काम करत होती. त्यामुळे भाजपला आमच्याशी चर्चा करायची गरज का वाटली? असा उलट सवाल करत त्यांनी भाजपकडून सुरू असलेल्या युतीच्या चर्चेला उत्तर दिलं. आमच्याशी भाजपने चर्चा का केली? त्यातून शिवसेनेला बाजूला करा असं म्हणत असू तर या सगळ्या हवेतील गप्पा आहेत. तुम्ही सत्तेत असताना, तुमच्याबरोबर तुमचा मित्र पक्ष असताना तुम्ही राष्ट्रवादीबरोबर चर्चा का केली? हा प्रश्न माझ्यावतीने भाजपला विचारा, असा सल्लाही त्यांनी मीडियाला दिला.

हे सुद्धा वाचा

महागाईचे मूळ केंद्रातच आहे

भारतात प्रचंड महागाई वाढलेली आहे. त्याचे दुष्परिणाम शेजारच्या देशात म्हणजे श्रीलंका आणि पाकिस्तानमध्ये पाहायला मिळत आहेत. त्यामुळे देशातील महागाईची जबाबदारी राज्याराज्यावर टाकून हात झटकण्याचा प्रयत्न आहे. खरे महागाईचे मूळ केंद्रात आहे हे विसरता येणार नाही, अशा शब्दात त्यांनी केंद्रावर निशाणा साधला.

देशाचे पंतप्रधान म्हणून लोक ऐकून घेतात

केंद्रसरकार कुठल्याही राज्याला आऊट ऑफ वे जाऊन फारशी मदत करू शकत नाही. योजना असतात त्या योजनांवर पैसे येत असतात. असे एकाच राज्याला जास्त पैसे देणे या ज्या घोषणा पंतप्रधान नरेंद्र मोदी वेगवेगळ्या राज्यात जाऊन करतात मात्र तसं ते देऊ शकत नाहीत. पण काय करणार देशाचे पंतप्रधान बोलत असल्याने लोकं ऐकून घेतात, असा टोलाही जयंत पाटील यांनी लगावला.