Jitendra Awhad : मुंबई पोलीसच खरे भाई… म्हणूनच दाऊद दुबईला पळाला; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप

Jitendra Awhad on Mumbai Police : राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी एका मागून एक बॉम्ब टाकले. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले.

Jitendra Awhad : मुंबई पोलीसच खरे भाई... म्हणूनच दाऊद दुबईला पळाला; जितेंद्र आव्हाडांचा गंभीर आरोप
जितेंद्र आव्हाड, मुंबई पोलीस
| Updated on: Jan 25, 2025 | 1:56 PM

शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांची तोफ आज पुन्हा धडाडली. त्यांनी मुंबई पोलिसांवर एका मागून एक तोफगोळे डागले. त्यांच्या गौप्यस्फोटामुळे मुंबई पोलिसांच्या कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यांनी पोलिसांच्या कारभारावर ताशेरे ओढले. मुंबई पोलीसच खरे भाई असल्याचा चिमटा त्यांनी काढला. त्यांनी दाऊद दुबईला कशामुळे पळाला याविषयी मुंबई पोलिसांनाच कटघऱ्यात उभे केले.

दाऊद मुंबईला का पळाला?

बलात्कार प्रकरणातील अक्षय शिंदे हा निर्दोष असल्याचा मोठा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला. कोणाला तरी वाचवण्यासाठी त्याला मारल्याचा ठपका त्यांनी ठेवला. जजने साांगितलं हे एन्काऊंटर नाही, मर्डर आहे. अजूनपर्यंत गुन्हा दाखल नाही अक्षय शिंदे प्रकरणात. ज्येष्ठ पोलीस अधिकारी पोलीस व्हॅनमध्ये जाऊन बसतो. मुंबईचे पोलीस काय करू शकतात हे दाऊदला माहीत आहे. त्यामुळे तो दुबईत आहे. मुंबईचे पोलीस हेच खरे भाई. त्यामुळे तो दुबईत जाऊन बसला. ज्या दिवशी हे ठरवतील त्या दिवशी आपलं जीणं मुश्किल होईल. त्यापेक्षा आपणच गेलेलं बरं म्हणून तो निघून गेला, असे आव्हाड म्हणाले.

पोलीस खात्याची बदनामी कशामुळे?

मागच्या पाच वर्षात या सत्ताधाऱ्यांनी पोलीस खात्याची बदनामी केली आहे. पोलीस एकही काम स्वतंत्रपणे करत नाही. त्यांच्या कामात हस्तक्षेप केला जात आहे, असा आरोप आव्हाडांनी केला. त्यांनी त्यासाठी एक उदाहरण दिले. आमच्याकडे मर्डर झाला. इमानदार पोलीस अधिकारी होता नितीन ठाकरे. तो आरोपी पर्यंत पोहोचला. अटक करणार तोच मंत्रिमंडळातील मंत्र्याने त्या इन्स्पेक्टरला आई बहिणीवरून शिव्या घातल्या. दुसर्‍या दिवशी सकाळी त्या इन्स्पेक्टरची बदली झाली. आरोपीने त्या बदलीची ऑर्डर स्वत:च्या स्टेट्सला ठेवली. त्यानंतर कोणताही अधिकारी केस हातात घेत नाही. प्रत्येकाला वाटतं आपली बदली होईल. पोलीस खात्यावर किती दबाव आहे, हे त्यांनी सदोहारण स्पष्ट केले.

राज्यात आका संस्कृती

महाराष्ट्रात ही आका संस्कृती जन्माला आली आहे. हा इथला आका, तो तिथला आका… या सर्व आकांना काकांकडे पाठवा वरती. बंद करा हे, असे ते म्हणाले. महाराष्ट्राचा सत्यानाश होणार आहे यातून. वंजारी समाजाचे मागच्या पाच वर्षात ४० आयपीएस अधिकारी निर्माण झाले. ही वंजारी समाजाची ताकद आहे. मुंबई सेंट्रलवरील ७० ते ८० टक्के लोक वंजारी आहे. कष्टाळू लोक आहे. पण दोन ते चार लोकांनी ठेका घेतला आहे वंजारी लोकांचा. त्यांनीच वाट लावली, असा आरोप आव्हाड यांनी केला.

मीही वंजारी आहे. मला अभिमान आहे. माझी आई आणि बाप या ठिकाणी भाजी विकायचे. जाती काही नसतात. माणुसकी धर्म मोठा आहे. ज्याच्यावर अन्याय झाला त्याच्या पाठी राहा. त्यांना मदत करा. सर्वच ठिकाणी राजकीय असलं पाहिजे असं नाही. कराड सारखी वृत्ती आणि सोमनाथ सूर्यवंशीला मारणारी प्रवृत्ती ही विकृती आहे. त्याविरोधात लढलं पाहिजे, असे आवाहन त्यांनी केले.