“आरेचं झालं, आता माझ्या सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घ्यावेत”

| Updated on: Dec 02, 2019 | 12:14 AM

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगावमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचं म्हणत महाविकासआघाडी सरकारकडे हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Jitendra Awhad on Bhima Koregaon Cases).

आरेचं झालं, आता माझ्या सरकारनं भीमा कोरेगाव प्रकरणातील खोटे गुन्हे मागे घ्यावेत
Follow us on

मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आणि आमदार जितेंद्र आव्हाड यांनी भीमा कोरेगावमध्ये दाखल करण्यात आलेले गुन्हे खोटे असल्याचं म्हणत महाविकासआघाडी सरकारकडे हे गुन्हे मागे घेण्याची मागणी केली आहे (Jitendra Awhad on Bhima Koregaon Cases). त्यांनी ट्विट करत ही मागणी केली. या ट्विटमध्ये त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि कॅबिनेट मंत्री जयंत पाटील यांना देखील टॅग केले आहे (Jitendra Awhad on Bhima Koregaon Cases).

जितेंद्र आव्हाड म्हणाले, “आरेसाठी आंदोलन करणाऱ्यांवरील गुन्हे मागे घेण्यात आले. ते आंदोलक सुटले. भीमा कोरेगावमध्ये मागील सरकारने खोटे गुन्हे दाखल केले. आता माझ्या या सरकारने ते गुन्हे मागे घ्यावेत. होय हे आपलं सरकार.”

काय आहे प्रकरण?

पुणे पोलिसांनी शहरी नक्षलवादाचा आरोप करत मानवाधिकार कार्यकर्ते आणि लेखक आनंद तेलतुंबडे यांच्यासह 21 जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. यातील 5 जणांविरोधात न्यायालयात आरोपपत्रही दाखल करण्यात आलंय. पुण्यातील शनिवार वाडा येथे झालेल्या एल्गार परिषदेमुळे कोरेगाव भीमा येथे हिंसाचाराची व्याप्ती वाढल्याचा संबंधितांवर आरोप करण्यात आला आहे.

शनिवारवाडा येथे 1 जानेवारी 2018 रोजी एल्गार परिषद आयोजित करण्यात आली होती. यात सर्वोच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश पी. बी. सावंत, माजी न्यायमुर्ती बी. जी. कोळसे पाटील, अॅड. प्रकाश आंबेडकर, गुजरातचे आमदार जिग्नेश मेवाणी यांच्यासह अनेक मान्यवरांचा सहभाग होता. एल्गार परिषदेत यापैकी अनेकांनी भाषण करत सरकारविरोधात जोरदार टीका केली. त्यामुळेच भीमा कोरेगावचा हिंसाचार झाला असा आरोप पुणे पोलिसांनी केला आहे. पुण्यात कोरेगाव भीमा शौर्य प्रेरणा दिनानिमित्त एल्गार परिषदेचं आयोजन करण्यात आलं होतं.

आरोपपत्रात कुणाचा समावेश?

आरोपपत्राममध्ये रोना विल्सन, अॅड. सुरेंद्र गडलिंग, प्रा. शोमा सेन, महेश राऊत, सुधीर ढवळे, भूमिगत असलेले मिलिंद तेलतुंबडे, प्रशांत बोस, रितुपण गोस्वामी, कॉ. दिपु, कॉ. मंगलु यांचाही उल्लेख आहे. पोलिसांनी आरोपींवर भारतीय दंड विधान कलम 153 (अ), 505 (1) (ब), 120 (1), 121, 121 (अ), 124 (अ), 34, बेकायदेशीर कृत्ये (प्रतिबंध) कायदा 1967 सुधारित अधिनियम 2012 कलम 13, 16,17,18,18 (ब), 20, 38, 39, 40 ही कलमे लावली आहेत. यातील पाच आरोपींना 6 जून 2018 रोजी सुरुवातीला अटक करण्यात आली.

संबंधित बातम्या :

भीमा कोरेगाव : डॉ. आनंद तेलतुंबडेंना सोडण्याचे पुणे कोर्टाचे आदेश

एल्गार परिषद : आनंद तेलतुंबडेंसाठी बी. जी. कोळसे पाटील मैदानात