उभा चेहरा, काळ्या रंगाचा बुरखा… एकाच शाळेतील 4 विद्यार्थिनी एकाच वेळी गायब, कल्याण हादरले
कल्याणमधून एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. एकाच शाळेतीन चार विद्यार्थिनी बेपत्ता झाल्याचे समोर आले आहे. या प्रकरणी पोलिसात तपास सुरु आहे.

कल्याण बाजारपेठ पोलिस ठाण्याच्या हद्दीत एका नामांकित उर्दू हायस्कूलमध्ये शिक्षण घेणाऱ्या चार अल्पवयीन विद्यार्थिनी एकाच वेळी बेपत्ता झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या प्रकरणामुळे संपूर्ण शहरात खळबळ उडाली असून, मुलींच्या सुरक्षित परतीसाठी सर्व स्तरातून चिंता व्यक्त केली जात आहे. त्या चौघी कुठे गेल्या होत्या? काय करत होत्या? कोणाच्या संपर्कात होत्या का? याचा शोध पोलिस घेत आहेत.
नेमकं काय घडलं होतं?
२९ जून रोजी सकाळी चारही मुली शाळेत जाण्यासाठी घरातून निघाल्या होत्या. मात्र संध्याकाळी घरी परत न आल्याने कुटुंबीयांनी त्यांचा शोध घेण्यास सुरुवात केली. रात्री उशिरापर्यंत मुलींचा काहीही संपर्क न झाल्याने कुटुंबीयांनी बाजारपेठ पोलिस ठाण्यात चौघींच्या बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली. पोलिसांनी तक्रार दाखल झाल्याबरोबर तातडीने कारवाई सुरू केली.
पोलिसांचा तपास सुरु
शाळेच्या परिसरात, रेल्वे स्टेशन, बस स्टँड आणि आसपासच्या भागातील सीसीटीव्ही फुटेजची तपासणी सुरू करण्यात आली. बातमीदारांची माहिती, मोबाईल लोकेशन, कॉल डिटेल्स आणि इतर तांत्रिक माहितीच्या आधारे राज्यभर विविध पथके तयार करून मोठ्या शोधमोहिमेला सुरुवात करण्यात आली आहे.
पोलिस अपहरणाच्या संशयावरही तपास करत आहेत. मुली स्वतःहून कुठे गेल्या असतील का? कोणीतरी त्यांना फूस लावून नेले असावे? यासह सर्व शक्यता तपासल्या जात आहेत. एकाच शाळेतील चार अल्पवयीन मुली एकदम बेपत्ता झाल्याने पालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. कल्याण पोलिस आयुक्तालय आणि ठाणे जिल्हा पोलिस यंत्रणा या प्रकरणाचा गांभीर्याने तपास करत आहे. मुलींच्या शोधासाठी राज्यातील विविध भागांत पथके कार्यरत आहेत.