Flood | गिरीश महाजन पळवा-पळवी करतील की पुराची पाहणी? पृथ्वीराज चव्हाणांचा टोला

| Updated on: Aug 07, 2019 | 2:42 PM

गिरीश महाजन काय काय करणार, पळवा पळवी करणार की पाहणी करणार, असा टोमणा पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

Flood | गिरीश महाजन पळवा-पळवी करतील की पुराची पाहणी? पृथ्वीराज चव्हाणांचा टोला
Follow us on

मुंबई :  पश्चिम महाराष्ट्रातील महाप्रलयावरुन माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण (Prithviraj Chavan) यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) आणि भाजप नेत्यांवर टीकास्त्र सोडलं. “मुख्यमंत्र्यांचा प्रचार दौरा सुरू आहे. पण त्यांनी कोल्हापूर, सांगलीचा दौरा केला असता तर लोकांना दिलासा मिळाला असता” असं पृथ्वीराज चव्हाण म्हणाले.

याशिवाय दोन मंत्र्यांना चंद्रकांत पाटील (Chandrakant Patil) आणि गिरीश महाजन (Girish Mahajan) यांना सरकारने पूरग्रस्त भागात पाठवले आहे. ते आधीच पाठवायला हवे होते. गिरीश महाजन काय काय करणार, पळवा पळवी करणार की पाहणी करणार, असा टोमणा पृथ्वीराज चव्हाणांनी लगावला.

कोल्हापूर आणि सांगली, कराड परिसराला पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. गेल्या काही दिवसांपासून सतत बरसणाऱ्या पावसाने एक दिवसही उघडीप दिली नाही. त्यामुळे नदी- नाले, धरणं तुडुंब झाली आहेत. आधीच पात्रं सोडलेल्या नद्यांमध्ये धरणातील पाणी सोडल्याने पूरस्थिती गंभीर झाली आहे. कोल्हापुरात परिस्थितीवर नियंत्रण मिळवण्यासाठी लष्कर आणि नौदलाला पाचारण करण्यात आलं आहे.

पृथ्वीराज चव्हाण म्हणाले, “2005 नंतर एवढा मोठा पूर आला आहे.  मोठ्या प्रमाणात लोकांना स्थलांतरीत करण्यात आले. कराड परिसरात मी काल रात्रीपर्यंत होतो. अनेक गावं पाण्यात आहेत. लोकांना बोटीद्वारे बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. बोटी कमी आहेत त्या वाढवण्याची जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली आहे”.

मुख्यमंत्र्यांचा इतर कुठल्या मंत्र्यांवर विश्वास नाही

यावेळी पृथ्वीराज चव्हाणांनी मुख्यमंत्र्यांचा इतर कुठल्या मंत्र्यांवर विश्वास नसल्याचा आरोप केला. “मुख्यमंत्र्यांचा दौरा सुरू आहे, पण त्यांनी कोल्हापूर, सांगलीचा दौरा केला असता तर लोकांना दिलासा मिळाला असता.  दोन मंत्र्यांना सरकारने पाठवले ते आधीच पाठवायला हवे होते. गिरीश महाजन काय काय करणार, पळवा पळवी करणार की पाहणी करणार. मुख्यमंत्र्यांचा इतर कुठल्या मंत्र्यांवर विश्वास नाही”, असं चव्हाण म्हणाले.

पूर रेषेजवळच्या लोकांचे कायमस्वरूपी पुनर्वसन करायला हवे. पुरामुळे अनेक भागाचा संपर्क तुटला आहे. एनडीआरएफला हेलिकॉप्टर उपलब्ध करून दिली असती तर त्यांना मदतकार्य जलद करता आलं असतं. कराडमध्ये 36 तास वीज आणि पिण्याचे पाणी उपलब्ध नाही. दूरसंचार यंत्रणा बंद आहेत.  मला पुराचे राजकारण करायचे नाही, आज लोकांना मदत करून दिलासा देण्याची गरज आहे, असं पृथ्वीराज चव्हाण यांनी नमूद केलं.

तसंच मुख्यमंत्र्यांनी दोन दिवसांपूर्वी पूरस्थिती गंभीर असतानाच मंत्र्यांना पाठवायला हवं होतं, आपत्ती व्यवस्थापन सक्षम करायला हवं. माझी मुख्यमंत्र्यांना विनंती आहे त्यांनी आपली यात्रा दोन दिवस बाजूला ठेवून हवाई दौरा करावा त्यातून सरकार आपल्याबरोबर आहे हा दिलासा लोकांना मिळेल, असा सल्ला पृथ्वीराज चव्हाणांनी देवेंद्र फडणवीस यांना दिला.