‘अदानींना कवडीमोल किंमतीत जमीन, त्यामुळेच तुकाराम मुंढेंची बदली’; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोर्चाही निघाला. अशातच याचाच धागा पकडत विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी गंभीर आरोप केलेत.

अदानींना कवडीमोल किंमतीत जमीन, त्यामुळेच तुकाराम मुंढेंची बदली; वडेट्टीवारांचे गंभीर आरोप
vijay wadettiwar
Image Credit source: TV9MARATHI
Harish Malusare | Updated on: Jul 04, 2024 | 10:56 PM

धारावीच्या पुनर्विकासाठी, कुर्ल्यातली सरकारी जमीन कवडीमोल किंमतीनं अदानींच्या घशात घातल्याचा आरोप विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी केला. कुर्ल्यातील दुग्ध शाळेची साडे 8 हेक्टर अर्थात 21 एकर जमीन अदानींना देण्यात आली. जमिनीची किंमत अंदाजे 20 हजार कोटी रुपये आहे मात्र अदानींना 25 % सवलतीच्या दरानं देण्यात आली. म्हणजेच 20 हजार कोटींची जमीन अवघ्या 5 हजार कोटींना अदानींना देण्यात आली.

10 जूनला एकाच दिवशी जमीन पुशसंवर्धन विभाग, महसूल विभाग ते अदानींना हस्तांतरीत झाली. त्यामुळं कोणाला पैसे दिले ? असा थेट सवाल करत वडेट्टीवारांनी चौकशीची मागणी केलीय. जमिनीच्या हस्तांतरणाबाबत तत्कालीन पशुसंवर्धन विभागाचे अतिरिक्त सचिव तुकाराम मुंढेंनी विरोध केला. त्यामुळंच त्यांची बदली केल्याचा आरोपही वडेट्टीवारांनी केला.

25 % सवलतीच्या दरात ज्या पद्धतीनं एका दिवसात जमीन हस्तांतरणासाठी तत्परता दाखवली. तो जीआरच रद्द करण्याची मागणी वडेट्टीवार आणि आदित्य ठाकरेंनी केलीय. तर धारावी पुनर्वसन प्रकल्पात अदानींकडून तब्बल 1 लाख धारावीकरांना अपात्र करण्यात येणार असल्याची भीती आदित्य ठाकरेंनी व्यक्त केलीय.

धारावीच्या पुनर्विकास प्रकल्पावरुन अदानींना विरोध करण्यासाठी उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात गेल्या वर्षी डिसेंबरमध्ये मोर्चाही निघाला. जगातला सर्वात मोठा टीडीआर घोटाळ्याचा आरोप त्यावेळी ठाकरेंनी केला होता. आता सरकारी जमिन आणि तीही 25 टक्क्यांच्या सवलतीच्या दरात दिल्यानं विरोधक आक्रमक झालेत.

Follow Us