मुंबई: ठाकरे सरकारने दुकाने आणि व्यापारावरील निर्बंध शिथील न केल्यास आम्ही निवडणुकांवर बहिष्कार टाकू, असा निर्वाणीचा इशारा मुंबईतील व्यापाऱ्यांकडून देण्यात आला आहे. दादरमध्ये सोमवारी व्यापाऱ्यांकडून आंदोलन करण्यात आले. त्यावेळी व्यापाऱ्यांनी शनिवारी आणि रविवारी सकाळी 10 ते संध्याकाळी 7 वाजेपर्यंत दुकाने उघडी ठेवण्याची परवानगी द्यावी, अशी आग्रही मागणी केली.
मुंबईत बेस्टच्या एका बसमध्ये एकाचवेळी 50 ते 60 प्रवासी प्रवास करतात. तेव्हा कोरोनाचा प्रसार होत नसेल तर आमच्या दुकानातील पाच-सहा लोकांमुळेच कोरोना कसा काय पसरतो, असा सवाल व्यापाऱ्यांनी उपस्थित केला. गेल्या वर्षभरापासून व्यापारी केवळ खर्च करत आहेत. त्यांना कोणतेही उत्पन्न मिळालेले नाही. परिणामी सध्या बहुतांश व्यापाऱ्यांची आर्थिक स्थिती वाईट आहे. त्यामुळे कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नाही. आताही उत्पन्न मिळाले नाही तर आम्हाला आत्महत्या करावी लागेल, असे व्यापाऱ्यांकडून सांगण्यात आले. त्यामुळे आता ठाकरे सरकार मुंबईतील निर्बंध शिथील करणार का, हे आता पाहावे लागेल.
खासगी कंपन्यांमधील कर्मचारी आणि लसीकरणासाठी मुंबईत येणाऱ्या नागरिकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची मुभा द्यावी, अशी मागणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी केली. डोंबिवली आणि कल्याणहून मुंबईत खासगी वाहनाने यायचे असेल तर लोकांना साधारण 700 रुपये मोजावे लागतात. मुंबईत सध्या कोरोनाचा पॉझिटिव्हिटी रेट कमी आहे. त्यामुळे खासगी कर्मचारी आणि लसीकरणासाठी येणाऱ्या लोकांना लोकल ट्रेनने प्रवास करण्याची परवानगी द्यावी, असे दरेकर यांनी म्हटले. प्रविण दरेकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांना तसे पत्रही पाठवले आहे. त्यामुळे आता रेल्वे खाते आणि राज्य सरकार यावर काय निर्णय घेणार, याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत.
संबंधित बातम्या:
मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी, 1 लाख 35 हजार लसींचे डोस उपलब्ध, लसीकरणाला पुन्हा सुरुवात
मुंबईकरांना दिलासा, म्युकोरमायकोसिसच्या सक्रीय रुग्णांमध्ये घट, 436 रुग्णांना डिस्चार्ज
मुंबईत कोरोना लसीकरणाला वारंवार ब्रेक, तिसरी लाट कशी रोखणार?