आता मविआच्या वज्रमूठ सभा होणार नाहीत? शरद पवार यांच्या राजीनाम्याशी संबंध?

शरद पवार यांनी अचानक राष्ट्रवादीच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिल्यानंतर महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभेवर परिणाम होण्याची शक्यता असल्याची चर्चा आहे. मविआची मुंबईतील वज्रमूठ सभा पार पडल्यानंतर आगामी सभा पुढे ढकलण्यात आल्याची माहिती समोर आलेली. या वृत्ताला प्रफुल्ल पटेल यांनी दुजोरा दिला आहे.

आता मविआच्या वज्रमूठ सभा होणार नाहीत? शरद पवार यांच्या राजीनाम्याशी संबंध?
Image Credit source: tv9
Chetan Patil | Updated on: May 03, 2023 | 6:34 PM

मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात कधी काय होईल याचा काहीच भरोसा नाहीय. आगामी महापालिका, लोकसभा आणि विधानसभेच्या निवडणुकांमध्ये महाविकास आघाडी एकत्रितपणे निवडणुका लढणार असल्याची चर्चा होती. विशेष म्हणजे महाविकास आघाडीच्या अनेक दिग्गज नेत्यांकडून तरी तसंच सांगितलं जात होतं. पण अचानक राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी वेगळी भूमिका मांडली. त्यानंतर विविध चर्चांना उधाण आलं. शरद पवार यांनी नंतर आपल्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ घेऊ नये, असं स्पष्टीकरणही दिलं. पण आता वज्रमूठ सभांबद्दल महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते प्रफुल्ल पटेल यांनीच याबाबत महत्त्वाची अपडेट दिली आहे.

महाविकास आघाडीच्या आतापर्यंत तीन वज्रमूठ सभा पार पडल्या आहेत. पहिली वज्रमूठ सभा ही छत्रपती संभाजीनगर येथे पार पडली. त्यानंतर नागपूर येथे सभा पार पडली. या दोन्ही सभांना प्रचंड प्रतिसाद मिळाला. त्यानंतर 1 मे महाराष्ट्र दिनी मविआची मुंबईत सभा पार पडली. या सभेलाही चांगला प्रतिसाद मिळाला. पण त्यानंतर मविआची सभा होणार नाही, अशा चर्चा सुरु झाली. याबाबत मविआची बैठक पार पडल्याची देखील माहिती समोर आली.

प्रफुल्ल पटेल यांच्याकडून महत्त्वाची माहिती

या बैठकीत मविआच्या पुढच्या सभा पुढे ढकलण्याचा निर्णय झाल्याचं वृत्त समोर आलं आहे. विशेष म्हणजे या वृत्ताला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते प्रफुल्ल पटेल दुजोरा दिला आहे. “वज्रमूठ सभा किंवा महाविकास आघाडीची चर्चा करायला आम्ही बसलेलो नाहीत. वज्रमूठ सभेचा 1 मे ला निर्णय झाला होता. उन्हाच्या तडाख्यामुळे पुढच्या वज्रमूठ सभा पुढे ढकलण्याचा निर्णय तेव्हाच झाला. त्या सभांचा आणि शरद पवार यांच्या राजीनाम्याचा काहीच संबंध नाही”, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर?

दरम्यान, शरद पवार यांनी राजीनाम्याची घोषणा केल्यानंतर राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील नाराज असल्याची माहिती समोर आली आहे. त्यावर प्रफुल्ल पटेल यांनी प्रतिक्रिया दिली. “जयंत पाटील यांचा नाराजीचा सूर नाही. तुम्ही काल स्वत: किती भावनिक होते ते पाहिलं. ते आज त्यांच्या कारखान्याच्या मिटिंगसाठी पुण्यात गेले होते. मी आलो ते स्वच्छेने आलो. आम्ही मुंबईला असल्याने साहजिकच आहे की साहेबांबरोबर राहावं. म्हणून आम्ही सगळे आलो. जयंत पाटील संध्याकाळी पुन्हा मुंबईला येतील. पदाधिकाऱ्यांनी राजीनामा देऊ नये. कारण आमच्या मनातही तीच भूमिका आहे. आपण सगळ्यांनी धीर ठेवावा”, असं आवाहन प्रफुल्ल पटेल यांनी केलं.

“पक्षात आम्ही सुरवातीपासून काम करतोय. शरद पवारांनी जी जबाबदारी आमच्यावर दिली ती आम्ही पार पाडली. शरद पवार यांच्या राजीनाम्याबाबत अंतिम निर्णय होत नाही तोपर्यंत नवी जबाबदारी कोण असेल ते समोर येत नाही. मी पक्षाच्या अध्यक्षपदासाठी इच्छूक नाही. मला माझ्या पक्षाने भरपूर दिलं आहे. शरद पवार यांचा जो निर्णय होईल त्यानंतरच पुढच्या अध्यक्षाबाबत विचार होईल”, असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं.

Loading...
Unable to load recommendations.
Follow Us